‘डिजिटल फूटप्रिंट’च्या सुरक्षिततेसाठी हवा कायदा - नंदन नीलेकणी

‘डिजिटल फूटप्रिंट’च्या सुरक्षिततेसाठी हवा कायदा - नंदन नीलेकणी

पुणे - '‘आधार कार्ड-मोबाईल-बॅंक’ या सांधणीतून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळतानाच भ्रष्टाचारालासुद्धा आळा बसणार आहे, हे खरेच; मात्र निश्‍चलीकरणानंतरच्या आणि कॅशलेसला पाठबळ देण्याच्या काळात जो माहितीसाठा (डिजिटल डेटा) निर्माण केला जात आहे, त्याच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र कायद्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

सर्वसामान्यांच्या या ‘डिजिटल फूटप्रिंट्‌स’चा कुठल्याही प्रकारे गैरवापर होऊ नये, यासाठी हे पाऊल तातडीने उचलायला हवे,’’ असे मत आधार कार्ड व्यवस्थेचे प्रणेते नंदन नीलेकणी यांनी व्यक्त केले.

नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन झालेल्या टाय, पुणे संस्थेने नीलेकणी यांचे व्याख्यान आयोजिले होते. ‘तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारत विकासाची मोठी झेप घेऊ शकेल काय? ’ या विषयावर ते बोलत होते. 

नीलेकणी म्हणाले, ‘‘भारतात आज अनेक मूलभूत सुविधा नसल्याच्या स्थितीतही आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत मात्र अनेक विकसित देशांच्या बरोबरीने उभे आहोत, असे एक गमतीशीर वास्तव पाहायला मिळते. त्यामुळे अनेकदा आपल्याकडे सामाजिक प्रश्‍नांचा कैवार घेणाऱ्यांकडून ‘आधी मोबाईल हवा की, शौचालय?’ अशा पद्धतीचे प्रश्‍न उपस्थित केले जातात. हे प्रश्‍न महत्त्वाचे आहेत, यात तिळमात्र शंका नाही; मात्र याचे उत्तर खरंतर तंत्रज्ञानाच्या प्रगतीतच दडले आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीचा वापर इतर मूलभूत समस्या सोडविण्यासाठी करून घ्यायला हवा.’’
स्वयंचलित यंत्र आणि तंत्रज्ञानाचा (ऑटोमेशन) रोजगारावर परिणाम होणार नसून, उलट या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याकडील आरोग्य, रोजगार, शेती या क्षेत्रांच्या प्रगतीसाठीच होणार आहे, असेही त्यांनी नमूद 
केले.
 

ज्येष्ठांसाठी बुबुळांच्या प्रतिमा अधिक उपयुक्त
आधार जोडणीत बोटांचे ठसे न जुळल्यामुळे कित्येक ज्येष्ठ नागरिकांचे आधार कार्ड नाकारले गेल्याची वस्तुस्थिती लक्षात आणून देत ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर नीलेकणी म्हणाले, ‘‘वाढत्या वयासोबत ज्येष्ठांच्या बोटांचे ठसे अस्पष्ट होत जातात. त्यामुळे बायोमेट्रिक स्कॅनिंगला अडचणी येतात, हे खरे आहे. यावर उपाय म्हणून बोटांच्या ठशांऐवजी ज्येष्ठ नागरिकांच्या बुबुळांच्या प्रतिमांचा आधार खाते जोडण्यासाठी विचार करायला हवा.’’

क्‍लाउड तंत्रज्ञान, ५-जी ठरेल महत्त्वाचे
महत्त्वाची आणि मोठी माहिती साठवून ठेवण्यासाठी पूर्वी कंपन्या डेटासेंटरचा उपयोग करत. आता मात्र ‘क्‍लाउड’ तंत्रज्ञान उपयोगात आणण्यास सुरवात झाली आहे. लवकरच आपण ‘५-जी’ तंत्रज्ञानात प्रवेश करणार आहोत. इंटरनेट आणि व्हॉइस कॉलिंगचा वापर वेगवान अन्‌ विनाव्यत्यय व्हावा, यासाठी ५-जी उपयोगी ठरेल, असेही नीलेकणी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com