अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा - लक्ष्मीकांत देशमुख

Samelanadhyaksh
Samelanadhyaksh

मांजरी : "सामान्य माणसाच्या दु:खाची कहाणी सांगण्यासाठी साहित्यिकाने लिहिले पाहिजे. व्यवस्थेतील वाईट प्रकारांवर भाष्य करण्याची तसेच उदात्त विचारांची पेरणी करण्याची संधी लेखकाला असते. व्यवस्थेतील वाईट प्रकारांमुळे आजच्या परिस्थितीत सामान्य माणूस जगण्यासाठी हतबल आहे. त्यासाठी लेखन करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असेल तर लेखकांनी आवाज उठवलाच पाहिजे.'' असे प्रतिपादन बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शन, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, रक्तदान शिबीर, ग्रंथ प्रदर्शन, वैविध्यपूर्ण पुष्परचना कार्यशाळा, फिरते तारांगण प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, भित्तीचित्र प्रदर्शन आदी विविध उपक्रमांचे उदघाटन संमेलनाध्यक्ष देशमुख यांच्या हस्ते झाले. तसेच संमेलनाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल संस्थेच्या वतीने त्यांच्या संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांच्या हस्ते विशेष सत्कारही यावेळी करण्यात आला, त्यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ते बोलत होते. 

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ए. एस. सरकार, डॉ. किल्ली राव, प्राचार्य नितीन सावळे, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. आनंद महाजन, प्रा. अनिल जगताप, प्रा. एस. एम. महाजन, एम. एन. कदम आदी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष देशमुख म्हणाले, "साहित्यातून आलेल्या चांगल्या विचारांवर जग चालते. समाजाच्या निकोप वाढीसाठी साहित्य महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत लेखक म्हणून सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी साहित्यिकांनी प्रयत्न करायला पाहिजे. साहित्य चळवळ व वाचन चळवळ वाढविण्यासाठी साहित्यिकांबरोबर वाचकांची जबाबदारी मोठी आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात ग्रंथ व्यवहार होण्यासाठी आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पाठपुरावा करणार आहे. कला, संस्कृती, साहित्य, शिक्षण, कृषी, सहकार, क्रीडा, महिला कल्याण अशा अनेक क्षेत्रात शरद पवार यांचे योगदान समाजाभिमुख व भरीव स्वरूपाचे आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो. 

राजेंद्र घाडगे म्हणाले, "युवकांनी सोशल मिडीयात वेळ वाया घालवण्यापेक्षा ग्रंथ वाचावेत. वाचनाने ज्ञान वाढते व व्यक्ती बहुश्रुत बनतो. वाचन चळवळ वाढविण्यासाठी प्रत्येकाकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. प्रा. नितीन लगड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नाना झगडे यांनी आभार मानले. संदीपान पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com