छत्रपती शिवाजी महाराज हे ‘आदर्श व्यवस्थापन गुरू’     

छत्रपती शिवाजी महाराज हे ‘आदर्श व्यवस्थापन गुरू’     

पुणे - स्वराज्यासाठी मावळ्यांचे संघटन, कमी सैन्यदलासाठी आखलेली स्वतंत्र युद्धनीती, कौशल्य ओळखून केलेली सैन्यनिवड, शत्रूच्या गोटातील व प्रजेतील माहिती काढण्यासाठी केलेली हेरगिरी, दुर्गम डोंगरकड्यांवरील गड, किल्ले यांची निर्मिती, भविष्यात शत्रू समुद्रमार्गे येणार याची दूरदृष्टी असल्याने केलेली दुर्गनिर्मिती, लढाया जिंकण्यासोबतच परिस्थिती विरोधात असताना केलेले तह अशा अनेक पैलूंमुळे छत्रपती शिवाजी महाराज आदर्श व्यवस्थापन गुरू ठरतात, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया निवृत्त लष्करी अधिकारी व व्यवस्थापनशास्त्रातील तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. 

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले, ‘‘शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठीच्या सर्व लढाया ह्या व्यवस्थापन कौशल्याचे उत्तम उदाहरण आहेत. हवामानशास्त्र, भौगोलिक व प्रादेशिक परिस्थितीचा अभ्यास करून युद्धनीती ठरविणे. कमी सैन्यसंख्येमध्ये ‘गनिमी कावा’ हे युद्धतंत्र शिवाजी महाराजांनी जगाला दिले आहे. लढाया जिंकण्यासोबतच परिस्थिती विरोधात असताना केलेले तह हे देखील त्यांच्या समयसूचकता व परिस्थितिजन्य दूरदृष्टीने घेतलेल्या निर्णयाचा हेवा वाटतो. सैन्य दलात मावळ्यांची त्यांच्या कौशल्याची पारख करून केलेली निवड व वाटून दिलेल्या जबाबदाऱ्या यात त्यांचा हातखंडा दिसून येतो. जात, पंथ, भाषा व प्रदेशाची अस्मिता दूर करून मावळ्यांमध्ये स्वराज्याची दुर्दम्य इच्छा, आकांक्षा निर्माण करणारे नेतृत्व म्हणजे शिवाजी महाराज. पोर्तुगीज व इंग्रज समुद्रमार्गे येत असल्याचे दिसून येताच समुद्र आरमार व दुर्गउभारणी हे त्यांच्या दूरदृष्टीचे द्योतक आहे. केवळ आदेश न देता स्वतः सर्वांच्या पुढे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता, योग्य निर्णय, लढवय्येपणा, अचूक व्यवस्थापन कौशल्याचा सर्व व्यवस्थापनशास्त्र शिकणाऱ्यांसह सर्व विद्यार्थ्यांना आदर्शवत असे आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये झाला पाहिजे.’’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील ध्येयधोरणे, राजनीती, समाजनीती, अर्थकारण, व्यवस्थापन तंत्र, पर्यावरण संवर्धन, मानवतावाद यांचा आजच्या काळातही उपयुक्तता असून, त्यामुळे ते ‘आदर्श व्यवस्थापन गुरू’ ठरतात, असेही त्यांनी या  वेळी सांगितले.

आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचे जनक 
छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, लोककल्याणकारी धोरणे, परकीय शक्तींना थोपविण्याची क्षमता, कौशल्य, मुत्सद्देगिरी आणि शौर्य पाहता ते आधुनिक व्यवस्थापनाचे जनक आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोणतीही लढाई, तह, स्वराज्य विस्तारामधील त्यांचे नियोजन हे व्यवस्थापनशास्त्राला पूरक असेच होते. नेतृत्वगुण, रसद पुरविण्याचे तंत्रज्ञान, दळणवळणाचे व्यवस्थापन, स्वराज्यस्थापनेसाठीचे मंत्रिमंडळाची व सैन्य दलांची उभारणी याची अनेक उदाहरणे व्यवस्थापनशास्त्र शिकविताना होतो. अनेक नामांकित व्यवस्थापन संस्थांनी त्यांच्या जीवनप्रसंगाना अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे.
- डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com