मधुमेह टाळायचाय? मग हवा योग्य व्यायाम आणि सकस आहार!

Representational Image
Representational Image

पुणे : 'नोकरी, व्यावसाय व कामाचा आपल्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. जीवन व कार्यशैलीमुळे तणाव वाढतोच. त्यातुनच मधुमेहाला निमंत्रण मिळते. त्यादृष्टीने तरुणांनी जीवन व कार्यशैलीत बदल करुन योग्य व्यायाम, सकस आहार, वेळेचे नियोजन पाळावे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मधुमेह टाळता येईल', असा सल्ला विविध कंपन्यांचे अधिकारी, मधुमेही तज्ज्ञांनी आज (शनिवार) दिला.

जागतिक मधुमेहदिनानिमित्त डायबेटीक असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे शाखेतर्फे 'वर्क अॅण्ड लाईफ बॅलन्स' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. ह. वि. सरदेसाई, मर्सिडीझ बेंझचे उपाध्यक्ष सुहास कडलासकर, सारंग जोशी, किर्लोस्कर ऑइल इंजिनचे आर. आर. देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टिमच्या कॉर्पोरेट यूनिटचे अध्यक्ष अतुल खाडिलकर, विलास काटे, सारस्वत बँकेचे सरव्यवस्थापक अभय लिमये, डॉ. भास्कर हर्षे उपस्थित होते. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले.

कडलासकर म्हणाले, 'सध्या काम जीवन हे वेगळे करता येणार नाही. सुट्टीच्या दिवशी काम कधीच केले जात नाही. सुट्टी घेणे आम्ही बंधनकारक केले आहे. योगा, झुंबाचे वर्ग घेतले जातात. तरुणांनी ताण कमी करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरविले पाहिजे.'

'आयटी'तील कार्यशैलीबद्दल बारहाते म्हणाले, 'अनियमितता कायम असतेच. आयटीयन्स 36 लाख कामगार आहेत. त्यापैकी 20 टक्के जणांना मधुमेह आहे. 'फास्ट फूड' घेणार्‍यांचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी 'आयटी'मध्ये घरी बसून काम करण्याची व्यवस्था आहे. आयटीत व्यायामशाळा, ध्यानधारणा यांसारख्या सुविधा दिल्या जातात.'

देशपांडे म्हणाले, 'कामामध्ये नियमित अनियमतता असते. मात्र किर्लोस्कर ऑइल इंजिनमध्ये वार्षिक आरोग्य तपासणी वेळेवर होते. जास्त वय असणाऱ्यांची विशेष काळजी आम्ही घेतो. आपण वेळेचे योग्य नियोजन केले, तर तणाव वाढणार नाहीत. नियमित व्यायाम केला पाहिजे.' 

खाडीलकर म्हणाले, 'कामाचा ताण नक्कीच आहे. विशेषत: अन्य देशांच्या 'टाईम झोन'मुळे तर त्यात आणखी भर पडते. मात्र प्रत्येक दिवसाचे काम आणि आनंद कसा घेता येईल, यादृष्टिने आम्ही प्रयत्न करतो.'

लिमये म्हणाले, 'बँकेतील लोकांवर आर्थिक व्यवहार, स्पर्धा, ग्राहक व दिवसाचे लक्ष्य यामुळे तणाव वाढतो. नोटाबंदीवेळी हा तणाव वाढला होता. बँका हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करतात.'

डॉ.हर्षे म्हणाले, 'आम्ही काही वर्षांपूर्वी सर्वेक्षण केले. त्यामध्ये 100 पैकी 13 जणांना मधुमेह आढळला. त्यापैकी जीवनशैली, कार्यशैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण आहे. काम आणि जीवनशैली ही संकल्पना खूप वर्षांपूर्वी मांडली गेली होती. व्यवसाय व कामाच्या ताण-तणावाचा आरोग्यावर होणार परिणाम वाढत आहे.'

मागील 25 वर्षांपेक्षा जास्त काळ मधुमेहाशी यशस्वीपणे लढा देणाऱ्या प्रल्हाद उपासनी, काका कोयटे, उषा रासकर, मनीषा भावे, डॉ.सुनंदा पालकर, कृष्णा दंडे, विलास बेहरे, त्रिवेणी मोकाशी, शरीफ शेख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

मी मुंबईकर. मला 40 वर्षापासून मधुमेह. मला पाहण्याची आवड होती. पोहणे, चालणे आणि चांगल्या आहारामुळे मी मधुमेहावर नियंत्रण मिळवु शकलो. मधुमेह होऊ नये, यासाठी या जागरुक रहावे.'
प्रल्हाद उपासनी, (वय 72)

'प्रेम, लोभ, राग अशा भावनांचा अतिरेक झाला तर तो आरोग्यासाठी अपायकारक ठरतो.म्हणुन मनाचे व्यवहार चांगले ठेवा.मनातील विचार माणसाच्या मेंदुवर परिणाम करतात.साखर नियंत्रीत ठेवन्याची गरज आहे. त्यासाठी मनाची प्रसन्नता आणि व्यायामावर भर द्या. अपेक्षा बदलल्या तर मन प्रसन्न राहील.'
डॉ. ह. वि. सरदेसाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com