मावळ - दुग्धव्यवसायाला जोड मत्स्यव्यवसायाची

शेततळे
शेततळे

टाकवे बुद्रुक (पुणे) : आंदर मावळातील वडेश्वर, लष्करीवाडी, कुसवली आणि किवळेतील शेतकऱ्यांनी शेती, दुग्ध व्यवसायाला मत्स्य व्यवसायाची जोड दिली आहे. सुरूवातीला वैयक्तिक पातळीवर हा व्यवसाय सुरू केला असून कालांतराने समूह गट मत्स्य शेतीवर भर दिला जाणार आहे.

यासाठी टाटा पाॅवर सामाजिक विकास संस्थेने व्यवसाय मार्गदर्शन शिबीर घेतले होते. वडेश्वरचे तुकाराम लष्करी, बबन हेमाडे, नारायण हेमाडे, सुरेश वाघमारे, शैलेश हेमाडे, लष्करीवाडीचे छगन लष्करी, कुसवलीचे नाथा चिमटे, नागाथलीचे नारायण ठाकर, बबन खांडभोर, किवळेचे दिलीप शिंदे, सुभाष पिंगळे आदि शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायाशी नाळ जोडली आहे.

प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार २० गुंठे पासून दीड हजार एकरावर हा व्यवसाय केला आहे. शासनाच्या शेततळे योजनेतून पन्नास ते शंभर टक्के अनुदानातून शेततळे खोदले आहे. त्यावर काहीनी पाॅलीथीनचा पेपर अंथरून पाणी साचवले आहे. त्यात बाजारात मागणी असलेल्या रोहा, कटला जातीचे मत्स्य बीज या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात टाकले आहे. एका शेतकऱ्यांनी किमान पाच हजार मत्स्य बीजापासून पुढे पंचवीस हजार मत्स्य बीज पाण्यात सोडले आहे. प्रथिनयुक्त आहार वेळेवर मत्स्य वाढीसाठी आवश्यक असल्याने शेतकरी त्याची काळजी घेत आहे. 

लष्करीवाडीचे छगन लष्करी यांनी त्यांच्या मत्स्यशेतीत सप्टेंबर महिन्यात रोहा, कटला वाणाचे पंचवीस हजार मासे सोडले आहे. येत्या सहा महिन्यात सहा ते सात टन उत्पन्नाची अपेक्षा असून सहा लाख रूपये उलाढाल यातून होईल, खर्च वगळता पन्नास टक्के नफ्यात हा व्यवसाय आहे. अशाच प्रकारे वेगवेगळ्या संख्येने शेतकऱा्यांनी मत्स्य बीज सोडून आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढविले.

टाटा पाॅवर सामाजिक व ग्रामीण विकास  संस्थेने निवडक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन मासेच्या जातीची निवड, खाद्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, बाजारपेठेतील माहिती, मागणी नुसार पुरवठा, शेतकरी ते ग्राहक हे विक्री तंत्र या विषयावर मार्गदर्शन दिले आहे. ठोकळवाडी धरणाच्या भोवतीच्या मोकळ्या वावरात कोणी शेततळे खोदून तर कोणी दगडासाठी खोदलेल्या खाणीत हा व्यवसाय सुरू केला आहे. याचे अनुकरण इतर शेतकरी करीत असून यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे. 

शेतकरी छगन लष्करी म्हणाले, "पूर्वी बांधकामा साठी दगड व खडी पुरविण्याचा व्यवसाय होता, त्यात बदल करून बाजारातील मागणी नुसार मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे. यासाठी कृषी विभाग, टाटा पाॅवर सामाजिक विकास संस्थेने मदत केली आहे, कोकण कृषी,मत्स्य विकास केंद्राचे  शास्त्रज्ञ डाॅ. विवेक वर्तक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या वर्षी सप्टेंबर मध्ये पंचवीस मत्स्य बीज टाकले असून मे पर्यत या व्यवसायातून सहा लाख रूपये उलाढाल अपेक्षित आहे.

आंदर मावळातील अकरा शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले असून यातून एक कोटी वार्षिक उलाढाल होईल. कोकण कृषी व मत्स्य विकास केंद्राचे शास्त्रज्ञ डाॅ. विवेक वर्तक म्हणाले, 'मत्स्य व्यवसाय आंधळेपणाने करू नये, बाजारातील मागणी प्रमाणे मत्स्य बीज टाकावे. काही शेतकऱ्यांनी मत्स्य बीज निर्मिती करावी. किमान बोटाच्या आकाराचे मत्स्य बीज पाण्यात सोडले पाहिजे. त्यांना प्रथिनयुक्त आहार दिला पाहिजे. खाद्याचे प्रमाण आणि वेळ निश्चितवर भर द्यावा. बीज लहान असताना त्याला योग्य प्रथिनांची गरज असते. शासनाच्या नीलक्रांती योजनेतून या व्यवसायासाठी ४० ते ५० टक्के अनुदान उपलब्ध आहे. याचा लाभ शेतक-यांनी घेतला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात मत्स्य विकास अधिकारींची स्वतंत्र नेमणूक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com