सांडपाणी वाहिनीचा प्रस्ताव अखेर मंजूर 

सांडपाणी वाहिनीचा प्रस्ताव अखेर मंजूर 

पुणे - महापालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेत मांगडेवाडी, भिलारेवाडी आणि गुजर निंबाळकरवाडीत सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) टाकण्याचा ना मंजूर झालेला प्रस्ताव शुक्रवारी अखेर मंजूर झाला. याकरिता भाजप सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत, विरोधकांच्या उपसूचना मंजूर केल्यास सभागृहातून बाहेर पडण्याचा इशारा दिला. उपसूचना फेटाळत सत्ताधाऱ्यांनी अखेर मूळ प्रस्ताव मंजूर केला. 

शहरातील प्रकल्पांसाठी पैसे नसताना हद्दीबाहेरच्या गावांना एवढा निधी देणे योग्य नसल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी आपली उपसूचना मागे घेतली. दरम्यान, या प्रस्तावावरून भाजप आणि मनसेच्या सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. 

या तिन्ही गावांमध्ये सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा नाही. त्यामुळे तेथील मैलापाणी कात्रज तलावात येत असल्याने या गावांमध्ये सांडपाणी वाहिन्या टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरिता वर्गीकरणाद्वारे दहा कोटी रुपये देत स्थायी समितीने प्रस्ताव मंजूर केला. मागील सभेत तांत्रिक कारणांमुळे हा प्रस्ताव ना मंजूर झाल्याने भाजपवर नामुष्की ओढविली होती. त्याबाबतचा फेरप्रस्ताव शुक्रवारी मांडण्यात आला. तेव्हा "कामाला विरोध नाही, पण महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असतानाही हद्दीबाहेरील कामांना निधी कसा द्यायचा' असा प्रश्‍न विरोधकांनी मांडला आहे. तेवढ्यात, या कामाच्या दहा कोटींतून दोन कोटी रुपये कात्रज तलाव आणि अन्य कामांसाठी देण्याची उपसूचना मनसेचे वसंत मोरे यांनी दिली. त्यापाठोपाठ काही गावांनाही निधी देण्याची मागणी उपसूचनेद्वारे दत्तात्रेय धनकवडे आणि युवराज बेलदारे यांनी केली. प्रस्ताव मंजूर होईल, या आशेने उपसूचना स्वीकारण्याची तयारी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी केली. पण, त्या स्वीकारल्यास सभागृहातून बाहेर पडण्याचा इशारा भाजपच्याच काही सदस्यांनी दिला. तेव्हा उपसूचना स्वीकारणार नसल्याचे भिमाले यांनी सांगितले. 

दरम्यान, राजकारण बाजूला सारून हा प्रस्ताव मंजूर व्हावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे प्रकाश कदम यांनी व्यक्त केली. मोरे यांनी उपसूचना मागे घेतली. त्यानंतर धनकवडे आणि बेलदरे यांची उपसूचना बहुमताने फेटाळली गेली. मूळ प्रस्ताव मंजूर झाला. 

"राजकारण करीत नाही' 
सांडपाणी वाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव भाजपच्या नगरसेविका मनीषा कदम यांनी मांडला. मात्र, उपसूचना देत दहा कोटींमधून दोन कोटी रुपये कात्रज तलाव अन्य कामांसाठी देण्याची मागणी केली. परंतु, उपसूचना योग्य नसल्याचे सांगत, काही मंडळी राजकारण करीत आहे. लोकांनी सूचविलेल्या कामांची अडवणूक करीत असल्याचे कदम यांनी आपल्या भाषणात मोरे यांच्या नावाचा उल्लेख टाळून सांगितले. त्यानंतर कामाला विरोध नाही पण, कात्रज तलावाची कामे झाली पाहिजेत. राजकारण करीत नसून, कोणाचीही कामे अडविली नाहीत आणि अडविणार नाही, असे मोरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com