पाण्याच्या बाबतीत आपला व्यवहार पाखंडी - बोकील

पाण्याच्या बाबतीत आपला व्यवहार पाखंडी - बोकील

पुणे - ‘‘राज्याच्या १९७६ च्या जलाधिनियमाची नियमावली अद्याप झालेली नसल्याने जलसिंचन क्षेत्रात घोटाळ्यांना वाव मिळत आहे. पाण्याच्या बाबतीत आपले समाजमन आणि आपला व्यवहारही पाखंडी झाला आहे,’’ अशा कठोर शब्दांत लेखक मिलिंद बोकील यांनी मत व्यक्त केले. 

‘रोटरी जलोत्सव’मध्ये आयोजित व्याख्यानात ‘पाणी आणि समाजमन’ या विषयावर बोकील बोलत होते. या वेळी जलबिरादरीचे विनोद बोधनकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे महादेव घुमारे आणि उल्हास परांजपे यांनी जलसंधारणातील यशस्वी प्रयोगांची माहिती दिली. जलोत्सवाचे संयोजक सतीश खाडे, रोटरीच्या अध्यक्षा शलाका देशपांडे, अलका कोहली उपस्थित होत्या. 

बोकील म्हणाले,‘‘ ही नियमावली नसल्याने अधिकारी आणि पुढाऱ्यांच्या संगनमताने होणारे घोटाळे चालूच राहणार आहेत. दुष्काळी भागाला पाणी पुरविण्यासाठी पश्‍चिम घाटात धरणे बांधण्यात आली. मात्र, त्याचा उपयोग ऊस शेतीसाठी करण्यात आला. बुद्धिमान मंडळीचा घाबरटपणा ही या देशाची मोठी समस्या आहे. सध्या मोठ्या शहरात राहिले, तरच पाणी मिळण्याची शाश्वती मिळत आहे. आपण बाटलीबंद पाण्याचे दास झालो आहोत. हे आपण समाजाला स्वच्छ पाणी पुरविण्यात अपयशी झाल्याची कबुलीच आहे.’’

 येथील राम नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हाती घेत आहोत, अशी माहिती घुमरे यांनी दिली. ‘‘प्लॅस्टिकमुळे नद्या आणि समुद्राचे प्रदूषण होऊ नये, यासाठी ‘सागरमित्र’ या उपक्रमात शहरातील दीड लाख मुले सहभागी झाली आहेत,’’ असे बोधनकर यांनी सांगितले. दिलीप देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com