पुणे - पर्वती येथील कालवा फुटीचे खापर सत्ताधारी नेते उंदीर, घूस आणि खेकड्यांवर फोडत असले तरी प्रत्यक्षात कालव्याच्या भरावावर केबलसाठी खोदाई केल्याने तो फुटला आहे, असे सांगत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या माहितीची खिल्ली उडविली. प्रमाणाबाहेर खोदाई केल्यानेच ही घटना घडल्याचेही पवार यांनी सांगितले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी पुण्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. खासदार वंदना चव्हाण, पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी आमदार बापू पठारे, कमल ढोले-पाटील, माजी महापौर दत्ता धनकवडे, महिला आघाडीच्या रूपाली चाकणकर आदी उपस्थित होते. कालव्याची दुर्घटना खेकडे, घुशी आणि उंदरांमुळे झाल्याचे महाजन यांनी सांगितले होते. त्या संदर्भात वरील आरोप केला. राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करताना ते म्हणाले,
'सामान्यांसाठी पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करण्याची सरकारची तयारी नाही. मात्र, मोठमोठे उद्योगपती बॅंकांचे हजारो कोटी रुपये बुडवून देशातून पळ काढताना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. या सरकारला सामान्यांचे काहीही देणे-घेणे नाही. केवळ उद्योगपतींचे आणि धनदांडग्यांचे हे सरकार आहे.''
|