वालचंदनगर : भोरकरवाडी (ता.इंदापूर) येथील नीरा नदीवरील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यातुन नीरा नदीमध्ये पाणी सोडल्यामुळे निमसाखर, निरवांगी परीसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.
निमसाखर, निरवांगी, खोरोची, पिठेवाडी परीसरातील नीरा नदी गेल्या पाच-सहा महिन्यापासुन कोरडी पडली होती. नदीमध्ये पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच शेतीच्या, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर झाला होता.
नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी मार्च महिन्यामध्ये परीसरातील शेतकऱ्यांनी आठ दिवस उपोषण करुन रास्तारोको आंदोलन, काळ्या गुढ्या उभारणे, मुंडन करण्याची आंदोलने केली होती. मात्र, प्रशासनाने पाणी सोडण्यास नकार दिला होता. गेल्या आठवड्यामध्ये बारामती, फलटण तालुक्यामध्ये चांगला पाऊस झाल्याने इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरील काही बंधाऱ्यामध्ये समाधानकारक साठा झाल्याने बंधाऱ्याची ढापे काढल्यामुळे भोरकरवाडरीच्या बंधाऱ्यात पाणी साठा झाला होता.
निमसाखर, निरवांगी, खोरोची परीसरातील शेतकऱ्यांनी भोरकरवाडीच्या बंधाऱ्यातुन पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर नीरा नदीमध्ये बंधाऱ्याची ढापे काढून पाणी सोडण्यात आले. सध्या निरवांगी परीसरामध्ये बंधाऱ्यातील पाणी पोचले असून निमसाखर व निरवांगी परीसरातील नदीकाठचे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. पाच-सहा महिन्याने नीरा नदीमध्ये पाणी आल्यामुळे पाण्यासाठी उपोषण करणारे शेतकरी दोन दिवसामध्ये नदीतील पाण्याचे जलपूजन करणार आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.