#NoisePollution सायलेन्स प्लीज...

Noise-Pollution
Noise-Pollution

पुणे - पुण्यातील प्रमुख रस्त्यांवरून फिरताना तुमच्या कानावर आदळाणाऱ्या वाहनांच्या हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजाची एकूण तीव्रता ही रेल्वेच्या आवाजापेक्षाही जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. तुमच्या कानावर सलग आठ तास ९० डेसिबल आवाज आदळल्यास तुम्ही बहिरे होण्याचा धोका वाढतो.

पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर रात्रंदिवस ८३ डेसिबलपेक्षा जास्त आवाज असतो. ‘नॅशनल एन्व्हायर्न्मेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’ (नीरी) या संस्थेने ध्वनिप्रदूषणाचा शास्त्रीय अभ्यास केला आहे. ‘नीरी’चे संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण झाले आहे. 

ध्वनिप्रदूषण कारणे
कर्णकर्कश हॉर्न वाजविण्याची वाहनचालकांची सवय
बांधकामाच्या ठिकाणी होणारे आवाज
मोठ्या संख्येने रस्त्यावर येणाऱ्या वाहनांचा आवाज
रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज

असा होतो दुष्परिणाम 
बहिरेपणा
चिडचिड होणे
डोके दुखणे
मानसिक ताणतणाव

आवाजाच्या मर्यादा 
    क्षेत्र      दिवसा      रात्री

    औद्योगिक      ७५      ७०
    व्यावसायिक      ६५      ५५
    रहिवासी      ५५      ४५
    शांतता क्षेत्र      ५०      ४०
(सर्व आकडे डेसिबलमध्ये)
(आधार - ध्वनिप्रदूषण कायदा २०००)

असा केला अभ्यास
वेगवेगळ्या ५० ठिकाणी ध्वनिप्रदूषणाचा अभ्यास केला. त्यात तीन राष्ट्रीय महामार्ग, एक राज्य महामार्ग, शहरातील छोटे आणि मोठे मिळून सोळा रस्ते, औद्योगिक, व्यावसायिक आणि शांतता क्षेत्रातील प्रत्येकी सहा ठिकाणी, आठ निवासी भागांत कामाच्या वेळेत आणि सुटीच्या दिवशी दिवस-रात्र होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची नोंद घेतली.

विश्‍लेषणाचा निष्कर्ष
रेल्वेच्या परिसरापेक्षाही शहरातील प्रमुख रस्त्यांवर होणारे ध्वनिप्रदूषण भयंकर आहे. रेल्वेच्या परिसरात दिवसा ८४.२ आणि रात्री ८१.१ डेसिबल आवाज होत असतो. शहरातील प्रमुख रस्त्यांवर आवाजाची पातळी दिवसा ८७.६, तर रात्री ८३.५ डेसिबलपर्यंत वाढते. 

धोकादायक पातळीवर सलग आठ तास 
९० डेसिबलपेक्षा जास्त आवाज कानांवर पडल्यास बहिरेपणाचा धोका वाढतो. आवाजाची तीव्रता ही धोकादायक पातळीच्या वर आहे. 
रुग्णालये, न्यायालय आणि शाळांचा परिसर हे शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. पण तेथेही दिवसा ७७.६ डेसिबल आवाज असतो.

पुण्याच्या रस्त्यांवरील वाहन आणि त्यांच्या हॉर्नचे आवाज यातून ध्वनिप्रदूषणाची पातळी धोक्‍याच्या वर गेली आहे. शांतता क्षेत्रातही नागरिकांना शांतता मिळू शकत नाही, हे यातून स्पष्ट झाले आहे. हॉर्नचा योग्य वापर, सायरनच्या आवाज मर्यादित ठेवणे, सिग्नलवर वाहने बंद करणे यातून ध्वनिप्रदूषणाची पातळी कमी करता येईल.
- रितेश विजय, मुख्य शास्त्रज्ञ, नीरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com