भक्तिरसात चिंब अवघी अलंकापुरी

भक्तिरसात चिंब अवघी अलंकापुरी

आळंदी - माउलींच्या संजीवन समाधीवरील पवमान अभिषेक... इंद्रायणीत पवित्र स्नान... आणि दिवसभर माउलींच्या पालखीसमवेत केलेल्या नगरप्रदक्षिणेत सामील लाखो वैष्णवांच्या भजनामुळे अवघी अलंकापुरी भक्तिरसात चिंब न्हाली. सुमारे तीन लाख वारकऱ्यांनी समाधीचे दर्शन घेतले.

दरम्यान, बुधवारी (ता. १५) द्वादशीनिमित्त माउलींचा रथोत्सव होणार आहे. गोपाळपुरा येथून रथ नगरप्रदक्षिणेसाठी निघणार आहे.

सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ही भावना ठेवून लाखो वारकरी कार्तिकी वारी सोहळा अनुभवण्यासाठी आळंदीत दाखल झाले होते. कार्तिक वद्य अष्टमीपासून माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमास सुरवात झाली. तेव्हापासून आळंदीत वारकरी दाखल होत आहेत. सोमवारी दुपारनंतर पुन्हा गर्दीत वाढ झाली. शहरातील प्रदक्षिणा रस्त्याबरोबरच नगरपालिका चौक, चाकण रस्ता, गोपाळपुरा, वडगाव रस्ता, पद्मावती रस्ता, देहू-आळंदी रस्ता, नवीन पुलाकडील रस्ता वारकऱ्यांच्या गर्दीने भरून गेला होता. महाद्वार तसेच इंद्रायणीकाठी अलोट गर्दी झाली होती. वारकऱ्यांची रांग दर्शनबारी पूर्ण भरून देहू फाट्यावरून जुन्या पुलाकडे वळविली होती. एकादशीमुळे मंगळवारी दिवसभर महापूजा बंद होत्या. दर्शनबारीतून सहा तासांपेक्षा अधिक वेळ लागत होता. यामुळे देउळवाड्याच्या पश्‍चिम बाजूकडील दर्शन मंडपातून आत प्रवेश करताच प्रत्येक वारकऱ्याला आळंदी देवस्थान आणि चोपदार फाउंडेशनच्या वतीने खिचडी, चहाचे मोफत वाटप करण्यात येत होते. टाळ मृदंगाचा गजर आणि माउलीनामामुळे अवघी अलंकापुरी माउलीमय झाली होती. आळंदी परिसरातील एक-दीड किलोमीटरचा परिसर भाविकांच्या गर्दीने भरून गेला. चऱ्होली खुर्द, केळगाव, डुडुळगाव हद्दीत वारकऱ्यांची गर्दी होती. आळंदीत येणारे सर्व रस्ते वाहनांसाठी बंद ठेवण्यात आले होते.

कार्तिकी एकादशीनिमित्त घाटावर पहाटेपासून वारकऱ्यांनी स्नानासाठी गर्दी केली होती. दुपारनंतर माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी निघाली. दुपारी दीडच्या सुमारास हजेरी मारुती येथे पालखीने विसावा घेतला. या वेळी तेथे संत नामदेव महाराजांची पालखीही होती. तेथे संत नामदेव आणि माउलींच्या पालखीसमोर चोपदारांनी दिंड्यांच्या हजेऱ्या घेतल्या. त्यानंतर माउलींची पालखी प्रदक्षिणा रस्त्याने हरिहरेंद्र स्वामी मठमार्गे मंदिरात साडेसहा वाजता पोचली. 

दरम्यान, पोलिस आणि पालिका कर्मचारी दिवसभर प्रदक्षिणा रस्ता आणि महाद्वारात अतिक्रमणांवर कारवाई करत होते. अतिक्रमणविरोधी पथकाची पाठ वळताच पुन्हा दुकाने थाटली जात होती.

गाभाऱ्यात रंगले मानपान नाट्य 
कार्तिकी एकादशीच्या पहाटपूजेनिमित्त आळंदी देवस्थानने मानकरी आणि सेवेकऱ्यांना पूजेनंतर मानाचा नारळ प्रसाद दिला आणि देवस्थानच्या विश्वस्तांनी लगेच समाधी मंदिराचा गाभारा सोडला. या वेळी आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांना मात्र मानपान दिला नाही, यावरून त्यांचे पती अशोक कांबळे यांनी किरकोळ हुज्जत घातली. यावर पुजारी राजाभाऊ चौधरी यांनी त्यांना नारळ प्रसाद दिला. देऊळवाड्यातील उपस्थित विश्वस्तांना त्यांनी आम्हाला मुद्दाम नारळ प्रसाद दिला नाही, असे सांगितले. यावर विश्वस्तांनी पुन्हा त्यांचा मान राखत नारळ प्रसाद देऊ केला. पहाटेच्या वेळी मानपानाचे हे नाट्य चांगलेच रंगले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com