नोटाबंदीच्या वर्धापनदिनाला ग्रामीण भागात कॅशलेसचे वारे

नोटाबंदीच्या वर्धापनदिनाला ग्रामीण भागात कॅशलेसचे वारे

तळेगाव स्टेशन : वर्षभरापूर्वी अंमलात आणलेल्या नोटाबंदीमुळे काही काळ मंदावलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असून, कधी काळी बड्या दालनांत अथवा मॉलमध्ये दिसणारी स्वाईप मशीन आता चहा नाश्त्याच्या टपरीपासून ते ढाबेवाल्याकडेही दिसू लागली आहेत. नोटाबंदीच्या पहिल्या वर्धापनदिनाला  ग्रामीण आणि निमशहरी भागातही वर्षभरात कॅशलेस व्यवहारांचे वारे वाहू लागल्याने आर्थिक व्यवहारांत काही अंशी पादर्शकता आल्याचे चित्र आहे.

काळा पैसा बाहेर काढून अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणण्या हेतूने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली. त्यानंतर कॅशलेस भारताचे स्वप्न साकार करण्या हेतूने केंद्र सरकारने चेक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पे-टीएम, मोबाईल वॉलेट आणि तत्सम डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत चलनविरहित विनिमयाच्या साधने अर्थव्यवस्थेत रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यालाच प्रतिसाद देत क्षेत्रातील बँकांनीदेखील त्याबाबत खातेदारांना आवाहन केले. नोटाबंदीनंतर सुरुवातीला रोकड अचानक कमी झाल्याने रोखीचे व्यवहार आणि व्यवसाय काहीकाळ थंड होऊन सामन्यजनांचे  हाल झाले. मात्र रिझर्व्ह बँकेने जसजशा दोन हजार, पाचशे, पन्नास आणि दोनशे रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या तसतशी बाजरपेठेत मंदावलेलया उलाढालीला तेजी येत गेली. मात्र दरम्यानच्या काळात चालनविरहित व्यवहारांची समाजमनाला लागलेली लत नव्या नोटा चलनात येऊनही कायम असल्याचे चित्र आहे.

नोटाबंदीनंतर ग्राहक आणि व्यवसायिकांना काळानुरुप बदलण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यामुळेच तळेगावसारख्या निमशहरी भागात कधीकाळी केवळ बड्या दालनांत अथवा मॉलमध्ये दिसणारी स्वाईप मशीन्स हळूहळू सार्वत्रिक होत जाऊन, अलीकडील चहा नाश्त्याच्या टपरीपासून ते रस्त्याकडेच्या ढाबेवालयाकडेही दिसू लागली आहेत. ठिकाठिकाणी "इथे डेबिट, क्रेडिट कार्ड स्वीकारली जातील" असे फलक प्रथमदर्शनीच नजरेस पडतात. मेडिकल, हॉस्पिटल, पेट्रोल पंपापासून ते दूधवाले, किराणा दुकानदार तसेच भाजीवाला आदींसारख्या दैनंदिन गरजा पुरविणाऱ्या विक्रेते, व्यावसायिक देखील गळ्यात स्वाईप मशीन अडकून फिरताना जागेवरच देणंघेणं उरकतात. स्कुलबस, लाईटबील, सोसायटी वर्गणी ते पेपरच्या बिलापर्यंत मासिक रतिबाचे चेक स्वीकारले जातात. रोखीच्या व्यवहारांमुळे उधारी देखील काहीअंशी कमी झाल्याचे व्यवसायिक सांगतात. मात्र काही स्वाईप मशिनवाले व्यवसायिक अद्यापही २ टक्के चार्ज आकारात असल्यामुळे बरेचजण भुर्दंड वाचविण्यासाठी तिकडे पाठ फिरवताना दिसतात. बँका आणि सरकारने याबाबत ग्राहकांना दिलासा दिल्यास अपवाद वगळता कॅशलेस अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण होण्यास अडचण नसावी.

●"नोटाबंदीनंतर रोकड आणि सुट्या पैशांच्या तुटवड्यामुळे जवळपास सहा महिने हॉटेलचे भाडे आणि नोकरांचा पगार देखील देणे दुरापास्त झाले होते. मात्र शेवटी स्वाईप मशीनचा पर्याय अवलंबिल्याने धंदा बऱ्यापैकी पूर्ववत झाला आहे. "
- विजय कडू (हॉटेल व्यवसायिक तळेगाव दाभाडे)

"अत्यावश्यक सेवा असल्याने नोटबंदीनंतर पैशाची अडचण असलेल्या नेहमीच्या ग्राहकांना औषधे देऊ केली. महिनाभरातच स्वाईप मशीन आणि पेटीएम आणल्याने सध्या जवळपास २५ टक्के व्यवहार कॅशलेस होतात. तुलनेने बँकेत रोकड भरण्याचा वेळ वाचतो आहे. आम्ही कुठल्याही ग्राहकाला २ टक्के अतिरिक्त चार्ज आकारत नाहीत."
- सुनील जैन, मेडिकल व्यवसायिक (तळेगाव स्टेशन)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com