कात्रज नवीन बोगद्याजवळ चार जणांचा मृत्यू 

कात्रज नवीन बोगद्याजवळ चार जणांचा मृत्यू 

पुणे/ कात्रज - ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकला पाठीमागून धडक बसल्याने मोटारीतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये मुंबईच्या सायन येथील येथील डॉक्‍टर कुटुंबीयाचा समावेश आहे. हा अपघात पुणे-बंगळूर महामार्गावर जांभूळवाडीजवळ सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास झाला. 

अपघातात डॉ. यशवंत पांडुरंग माने (वय 56, रा. चुनाभट्टी, सायन) यांच्यासह त्यांच्या पत्नी शारदा यशवंत माने (वय 47), मुलगा हृषीकेश यशवंत माने (वय 20) आणि चालक रामचंद्र कृष्णा सुर्वे (वय 71, रा. सायन) यांचा मृत्यू झाला. हे सर्व जण सातारा जिल्ह्यातील काळचौंडी (ता. माण) येथील मूळ रहिवाशी असून, गावी यात्रेसाठी गेले होते. डॉ. माने यांनी त्यांच्या मुलीला सातारा जिल्ह्यातील मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात सोडले. तेथून हे चौघे जण मुंबईला जात होते. डॉ. माने यांनी चालक रामचंद्र सुर्वे यांना सोबत घेतले होते; परंतु माने यांचा मुलगा हृषीकेश मोटार चालवत होता. 

बोगदा संपल्यानंतर उतारावर ट्रकला ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात त्याला उतारावर वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे मोटार लोखडांने भरलेल्या ट्रकला पाठीमागून धडकली. मोटार ट्रकच्या लोखंडी बारमध्ये अडकून काही अंतरावर फरफटत गेली. ही बाब ट्रकचालकाच्या लक्षात आल्यानंतर तो थांबला. त्या वेळी पाठीमागून येणारे वाहनचालक अंकुश वीर, रणजित गडदरे आणि दीपक खुडे यांनी पोलिसांना माहिती दिली. या अपघातात मोटारीचा चक्‍काचूर झाल्यामुळे जखमींना बाहेर काढणे अशक्‍य होते. भारती विद्यापीठ पोलिस रुग्णवाहिका आणि क्रेन घेऊन घटनास्थळी पोचले. मोटारीतून धूर येत असल्यामुळे कात्रज अग्निशामक दलाचा बंबही दाखल झाला होता. क्रेनच्या साहाय्याने मोटार बाहेर काढण्यात आली. त्यानंतर पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह मोटारीतून बाहेर काढले. 

नौदलात अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले 
डॉ. माने यांची सायन येथे पॅथॉलाजी लॅब आहे. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, भाऊ आणि मुलगी असा परिवार आहे. हृषीकेश हा बारावी उत्तीर्ण झाला होता. त्याचे नौदलात अधिकारी होण्याचे स्वप्न होते. येत्या काही दिवसांत प्रशिक्षणासाठी तो जाणार होता. 

वळणावर सात वर्षांत 25 जणांचा बळी 

जांभूळवाडी बोगद्यातून पुण्याकडे येताना महामार्गावर तीव्र उतार असलेल्या या धोकादायक वळणावर गेल्या सात वर्षांत 25 जणांचा बळी गेला आहे. सातारा जिल्ह्यातील एक कुटुंबीय सात वर्षांपूर्वी जीपमधून मुंबईकडे निघाले होते. याच वळणावर पहाटे कंटेनरला पाठीमागून धडकून या कुटुंबातील दहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर उतारावर वाहनांचा वेग कमी व्हावा, यासाठी केलेल्या उपाययोजनाही अपुऱ्या असल्याचे या अपघाताने पुन्हा सिद्ध झाले आहे. मात्र, अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांकडून आवश्‍यक उपाययोजना करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com