साहित्य हरलं अन्‌ ‘एकगठ्ठा शक्ती’ जिंकली

साहित्य हरलं अन्‌ ‘एकगठ्ठा शक्ती’ जिंकली

पुणे - ‘‘संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत साहित्य हरलं आणि ‘यंदा तुम्हालाच अध्यक्ष करतो’, असे म्हणणारी एकगठ्ठा शक्ती अन्‌ दाम-दंड-भेद जिंकले आहे...’’, अशा शब्दांत साहित्यिक राजन खान यांनी खंत व्यक्त केली. शिवाय, निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवरही त्यांनी बोट ठेवले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत लक्ष्मीकांत देशमुख विजयी होणार की राजन खान?, अशीच चर्चा गेले तीन महिने सुरू होती. देशमुख यांना मराठवाडा साहित्य परिषदेने, तर रवींद्र शोभणे यांना विदर्भ साहित्य संघाने जाहीर पाठिंबा दिला. एकगठ्ठा मतेही दिली; पण खान यांना चारपैकी एकाही घटक संस्थेने जाहीर पाठिंबा दिला नाही. तरीही खान निवडून येतील, अशी शक्‍यता वर्तवली जात होती; पण या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. खान म्हणाले, ‘‘साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत काही ठराविक मंडळींकडील कोऱ्या-एकगठ्ठा मतपत्रिका जिंकतात. तेच यंदाही झाले. ही घृणास्पद प्रक्रिया साहित्य संमेलनालाच नव्हे, तर एकूण साहित्यसृष्टीला मारक होत चालली आहे. अशा प्रकारांमुळे संमेलन आणि साहित्यसृष्टी बदनाम होत आहे. अशा स्थितीतही साहित्यसृष्टीतील जाणकार मतदारांनी मला मत दिले. त्यांचा मी ऋणी आहे. यानिमित्ताने जाणकारांची टक्केवारी किती आहे? हे कळायलाही सोपे गेले. यापुढे साहित्य संमेलनाची निवडणूक प्रक्रिया बदलायला हवी, यासाठी प्रयत्न सुरू राहतील. मूठभरांऐवजी सर्व आजीव सभासदांना मतदानाचा हक्क मिळायला हवा. यामुळे  पदाच्या लालसेने भूमिका नसलेली माणसे संमेलनाध्यक्ष पदासाठी पुढे येणार नाहीत.’’

निवडून आलेल्या उमेदवाराचे अभिनंदन आणि निवडून न आलेल्या इतरही उमेदवारांचे अभिनंदनच करतो. जे जे मी समाजासमोर कबूल केले ते ते सर्व लवकरच पूर्ण करणार आहे. मी काहीही गमावले नाही. उलट अंतर्मुख होऊन विचार करण्याचे आत्मबळ मी कमावले आहे. मला अंतर्बाह्य माणसं कळली. माणसं कळणं आणि वळणं हेच प्रतिभावंताचं धन आहे. तेच मी व्रतस्थपणे माझ्या लेखनातून मांडणार आहे. 
- किशोर सानप

मी माझ्या पद्धतीने काम केले आणि त्याची पावती म्हणून मला ही मते मिळाली. विजयासाठी आवश्‍यक असलेला कोटा पूर्ण न करता निवडून येणारा अध्यक्ष खरा तर विजयी नसतोच. गेल्या तीस वर्षांमध्ये कोटा पूर्ण न करता निवडून येत अध्यक्ष होण्याची ही पहिलीच वेळ आहे. साहित्यसृष्टीने नीरक्षीर न्यायाने या घटनेकडे बघावे आणि गुणात्मकतेची कशी वाढ होईल, याचा विचार करावा. शेवटी मी जिल्हाधिकारी नाही आणि कधी नव्हतोही, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
- डॉ. रवींद्र शोभणे

संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाबाबत आक्षेप नाही; पण आश्‍चर्य आहे. प्रचारानिमित्ताने जेवढा फिरलो, जेवढ्या मतदारांना भेटलो, त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादाच्या आणि माझ्या आजवरील कामाच्या तुलनेने मला मिळालेली मते फारच कमी आहेत. ती पाहून मलासुद्धा धक्का बसला. तरीही निवडून आलेल्‍या संमेलनाध्यक्षांना माझ्या शुभेच्‍छा.
- रवींद्र गुर्जर

ठाले-पाटील विरुद्ध म्हैसाळकर
मराठवाडा साहित्य परिषदेने लक्ष्मीकांत देशमुख, तर विदर्भ साहित्य संघाने रवींद्र शोभणे यांना उभे केले होते. त्यामुळे संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक पाच उमेदवारांमध्ये सुरू असली तरी ती पडद्यामागे ‘मराठवाडा’चे कौतिकराव ठाले-पाटील यांच्याविरुद्ध संघाचे मनोहर म्हैसाळकर, अशीच राहिली. यात ठाले-पाटील विजयी झाले. मात्र, साहित्य संस्थांनी निवडणुकीपासून अलिप्त राहावे, असे संकेत आहेत. तेच गुंडाळून ठेवल्याने ही निवडणूक खरंच लोकशाही पद्धतीने होते का?, असा सवाल काही उमेदवारांनी उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com