पुणे - 'भारतीय लष्कराची मदार असलेल्या "अर्जुन मार्क 2' हा स्वदेशी बनावटीचा रणगाडा लष्करात दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे,'' अशी माहिती "संरक्षण संशोधन आणि विकास संघटने'चे (डीआरडीओ) अध्यक्ष डॉ. ख्रिस्तोफर यांनी रविवारी येथे दिली.
'डीआरडीओ'मध्ये नव्याने दाखल होणाऱ्या अभियंत्यांना संघटनेची माहिती देण्यासाठी "पॉंइंट्स' हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. "डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी'मार्फत (डीआयएटी) हा कार्यक्रम घेतला जातो. त्याच्या 21व्या तुकडीचे उद्घाटन डॉ. ख्रिस्तोफर यांनी केले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
अर्जुन हा भारतीय लष्करातील मुख्य रणगाडा आहे. यात अत्यावश्यक बदल करून "अर्जुन मार्क 2' हा रणगाडा विकसित करण्यात येत आहे. या बाबत बोलताना डॉ. ख्रिस्तोफर म्हणाले, 'अर्जुन मार्क 2 या रणगाड्यासाठी लष्कराने काही बदल सुचविले होते. त्यानुसार "डीआरडीओ'ने आवश्यक बदल करून त्याची चाचणीही केली आहे. त्यात "डीआरडीओ'ला यश मिळाले आहे. त्यामुळे भारतीय लष्करातील दोन रणगाडा रेजिमेंटने अर्जुन मार्क 2 स्वीकारण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे लवकरच तो लष्करात दाखल होईल.''
इस्रायली बनावटीचे क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता या रणगाड्यात निर्माण करणे हे सध्याचे मोठे आव्हान आहे. त्याबाबत अद्याप प्रयत्न सुरू आहेत. पण त्याची पर्यायी व्यवस्था म्हणून भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. ख्रिस्तोफर म्हणाले, 'तेजस हे भारतीय बनावटीचे वजनाने हलके लढाऊ विमान तयार केले आहे. ते हवाई दलाने स्वीकारले आहे. या विमानाला एकच इंजिन आहे. त्यामुळे तातडीने विमान उतरविण्याची वेळ आली, तर ते दिल्ली-आग्रा या यमुना द्रुतगती मार्गावरही उतरविण्याची हवाई दलाची क्षमता त्याने सिद्ध केली आहे. पण अशावेळी नौदल हे विमान उतरविणार कुठे, असा प्रश्न नौदलाच्या अधिकाऱ्यांपुढे आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना दोन इंजिन असलेल्या तेजस विमानाची गरज आहे. ती योग्यही आहे. तेजस विमानांमध्ये भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकांवरून उड्डाण करण्याची क्षमता आहे. मात्र या विमानाला दोन इंजिन हवी आहेत, या आधारावर ते नौदलाने नाकारले आहे.''
"डीआरडीओ'मध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. या बाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, 'केंद्र सरकारने दोन हजार शास्त्रज्ञांच्या जागा भरायला परवानगी दिली आहे. त्यापैकी 436 शास्त्रज्ञांची नियुक्ती पहिल्या टप्प्यात होणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित पदे तीन टप्प्यांमध्ये भरण्यात येतील. त्यासाठी त्यांचे कामाचे स्वरूप आणि उपयुक्तता याची माहिती पंतप्रधान कार्यालयाला द्यावी लागणार आहे. ते काम सध्या सुरू आहे.''
लेफ्टनंट जनरल दत्तात्रेय शेकटकर (निवृत्त) यांच्या समितीने दिलेल्या अहवालात "डीआरडीओ'च्या काही प्रयोगशाळा बंद करण्याची शिफारस केली आहे. त्या बाबत बोलताना डॉ. ख्रिस्तोफर म्हणाले, 'या समितीने "डीआरडीओ'बद्दल सुचविलेल्या शिफारशी केंद्र सरकारने स्वीकारलेल्या नाहीत. त्यामुळे या प्रयोगशाळा बंद होतील, अशी सध्या स्थिती नाही. पण या आधारावर काही प्रयोगशाळांचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे.''
|