पुणे - वसंत ऋतूच्या आगमनामुळे निसर्ग बहरतो, तर संतांच्या आगमनामुळे संस्कृती बहरते, असे प्रतिपादन जैन संत प्रशांतऋषीजी महाराज यांनी येथे केले. प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज, प्रशांतऋषीजी, अलोकऋषीजी यांच्यासह साध्वी विनीतदर्शनाजी, तिलकदर्शनाजी महाराज यांचे चातुर्मासार्थ औंध येथे मिरवणुकीने आगमन झाले, त्यानंतर ते बोलत होते. तत्पूर्वी सर्व संतांची सिद्धार्थनगर येथून मिरवणूक काढण्यात आली.
प्रशांतऋषीजी म्हणाले, ‘‘ज्याचे भाग्य असते त्याला संतांचा एका दिवसाचा सहवास लाभतो, अहोभाग्य असणाऱ्याला आठ दिवस, सौभाग्य असणाऱ्याला महिनाभर, तर परमसौभाग्य असणाऱ्याला चार महिन्यांचा सहवास लाभतो. असे परमसौभाग्य या चातुर्मासाच्या निमित्ताने तुम्हाला लाभले आहे.’’
कुंदनऋषीजी महाराज म्हणाले, ‘‘चातुर्मासामध्ये अहिंसा, संयम आणि तपश्चर्ये इतकेच सुसंस्कारांनाही महत्त्व आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहू.’’ या वेळी प्रवीण चोरबेले, आनंद छाजेड, बाबूशेठ बोथरा, अभय छाजेड, पारस मोदी आदी उपस्थित होते. शिरीष चोपडा, रमणलाल लुंकड, नितीन बांठिया आदींनी परिश्रम घेतले.
महापौरांकडून साध्वीजींचे स्वागत
प्रियदर्शनाजी महाराज यांचे रत्नज्योतीजी, किरणप्रभाजी, विचक्षणश्रीजी, अर्पिताश्रीजी, वंदिताश्रीजी, मोक्षदाश्रीजी यांच्यासह सादडी सदन येथे आगमन झाले. तत्पूर्वी शनिवारवाडा येथे महापौर मुक्ता टिळक यांनी साध्वीजींचे स्वागत केले. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. सादडी युवक मंडळ, सादडी बहू मंडळ, सादडी स्वाध्याय मंडळ, सादडी महिला मंडळ, मेवाड संघ, तसेच वीतराग सेवा संघाचे कार्यकर्ते मिरवणूक आणि प्रवचनाला उपस्थित होते. नगरसेवक विशाल धनवडे उपस्थित होते. अध्यक्ष खुबीलाल सोलंकी, नरेंद्र सोलंकी, केवलचंद तेलीसरा आदींनी परिश्रम घेतले. याशिवाय पद्मऋषीजी महाराज यांचेही आगमन झाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.