बंदला अपेक्षित प्रतिसाद नाही 

बंदला अपेक्षित प्रतिसाद नाही 

पुणे - शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पुण्यात प्रतिसाद मिळाला नाही. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड येथील बाजारात आवक कमी झाली होती, परंतु व्यवहार सुरळितपणे पार पडले. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काही संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 

शेतमालाला हमीभाव आणि कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सोमवारी जाहीर केलेल्या राज्यव्यापी बंदला पुण्यात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. किसान क्रांती मोर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भूमाता ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात (बालगंधर्व चौक) राज्य सरकारचा निषेध केला. "कर्जमुक्ती झाली पाहिजे', "शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे' "स्वामिनाथन समितीच्या शिफारसी लागू करा', "शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करा' अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. या आंदोलनाला शिवसेने पाठिंबा दिला 

असला तरी त्यांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित नव्हते. शांताराम कुंजीर, योगेश पांडे, संतोष शिंदे, विठ्ठल पवार आदी यात सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता आदी भागात दुकानदारांना गुलाबाचे फूल देऊन दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. 

शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष ऍड. वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाठिंब्याचा ठराव मंजूर करण्यात आला, अशी माहिती उपाध्यक्ष अशोक राठी यांनी कळविली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली मार्केट यार्ड येथे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीस श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, तोलणार संघटना, टेंपो पंचायत आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात ठोस भूमिका घ्यावी, निर्णयाची अंमलबजावणी करावी, बाजार समित्यांमध्ये हमीभावाचे फलक लावावेत, अशा मागण्यांसंदर्भात सर्व संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढील काळात काम बंद ठेवण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला. 

भाव उतरू लागले 
मार्केट यार्ड येथील भाजीपाल्याच्या घाऊक बाजारातील व्यवहार सुरळीत झाले. नियमित आवकेच्या तुलनेत केवळ 35 टक्के इतकीच आवक झाली. सलग 
दुसऱ्या दिवशी बाजारात आवक झाल्याने भाजीपाल्याचे भाव कमी होण्यास मदत झाली आहे. खरेदीदारांकडून माल खरेदीला प्रतिसाद न मिळाल्याने भाव कमी झाले. रविवारी बाजारात आवक चांगली झाली होती. त्या वेळी खरेदीदारांनी माल खरेदी केला, महाराष्ट्र बंदची हाक शेतकऱ्यांनी दिली होती. त्यामुळे संभ्रमावस्थेत असलेला खरेदीदार सोमवारी बाजारात खरेदीसाठी कमी प्रमाणात आला होता. मालाला उठाव नसल्याने भावात घट झाली होती. मंगळवारी आवक सुधारेल असा विश्‍वास व्यापारी विलास भुजबळ यांनी व्यक्त केला. बाजारातील व्यवहार सुरळीत पार पडले, अशी माहिती समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी दिली. सलग दुसऱ्या दिवशी बाजारात आवक झाल्याने भाजीपाल्याचे गेल्या चार दिवसांत वधारलेले भाव कमी होण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com