आदिवासींच्या समृद्ध परंपरा कळू शकल्या नाहीत 

आदिवासींच्या समृद्ध परंपरा कळू शकल्या नाहीत 

पुणे - ""आजवर देशात आदिवासींना कुठल्याही सरकारने "तुम्हाला काय हवे' असे आपणहून विचारलेले नाही. आदिवासींविषयी कोणतेही स्पष्ट आणि सकारात्मक धोरण आपल्याकडे कधीही नव्हते आणि नाही! आजही आदिवासींना शहरात आल्यानंतर तुच्छतेने वागविण्यात येते. आदिवासींना यामुळे 

शहरी संस्कृतीचा तिटकारा आहे. त्यांना एकटे राहायचे आहे. स्वतःला "नागरी' म्हणवून घेणाऱ्या आपल्याला आदिवासींच्या समृद्ध परंपरा कधी कळूच शकल्या नाहीत,'' अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय पातळीचे भाषातज्ज्ञ आणि अलीकडच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देशभर आंदोलन उभे करणारे डॉ. गणेश देवी यांनी आदिवासींविषयी भाष्य केले. 

अक्षर मानव आयोजित गप्पांच्या कार्यक्रमानिमित्त डॉ. देवी आणि त्यांच्या पत्नी तथा ख्यातनाम रसायनशास्त्रज्ञ डॉ. सुरेखा देवी या उभयतांना गुरुवारी ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळाली. या वेळी भाषा, संस्कृती, शिक्षण, विज्ञान, समाजशास्त्र, मानवी उत्क्रांती अशा अनेक विषयांवर देवी दांपत्य मनमोकळे बोलले. 

डॉ. देवी म्हणाले, ""आजही जिथे आदिवासी आहेत, तिथेच जंगले शिल्लक आहेत. आदिवासी हे खरंतर आपल्यासाठी भविष्यातील लोक आहेत. आपण त्यांना भूतकाळातील म्हणून मोठी चूक करत आहोत. लोकशाहीस जर खरोखर स्थिर करायचे असेल, तर आपल्याकडे खऱ्या अर्थाने या "डायव्हर्सिटी'ची अर्थात सांस्कृतिक वैविध्याची लोकशाही असायला हवी.'' 

व्यक्तीसाठी "अपरिग्रह' हे ध्येय तर, समाजासाठी "लोकशाही' हे ध्येय असायला हवे. अशा ध्येयांची कास धरली जाते, तिथे सकारात्मक समाजव्यवस्था टिकत असते. अपरिग्रही व्यक्तींच्या समूहात लोकशाही अधिक सुरक्षित राहते. नुसते आपले पुतळे आणि फोटो लावत बसून ते प्रत्यक्षात आणणे शक्‍य नाही, असेही त्यांनी सांगितले. 

डॉ. सुरेखा देवी म्हणाल्या, ""आपल्या शिक्षणपद्धतीत आवश्‍यक मानले गेलेले चांगले मार्क्‍स हे शिक्षणाची पातळी आणि गुणवत्ता तोलण्याचे माप होऊ शकत नाही. व्यक्तीची गुणवत्ता ही मार्कांच्या पलीकडे असते. कुठलाही विषय घ्या, त्यात नक्कीच प्रगती करू शकाल... फक्त त्या विषयात आपले मन असायला हवे.'' 

असंसदीय व्यासपीठांची गरज! 
डॉ. देवी म्हणाले, ""आज देशाला खरी गरज आहे ती असंसदीय व्यासपीठांची. सत्तास्थानासाठी वाट्टेल त्या पातळीवर जाण्याच्या आजच्या काळात आता खरी सत्ता संसदेच्या बाहेर निर्माण व्हायला हवी आहे! संसदेच्या बाहेर आता सत्तास्थाने निर्माण व्हायला हवीत. "सिव्हिल सोसायटी'चे मूल्य आता वाढायला हवे. सिव्हिल सोसायटीचे कार्यकर्तेच बाविसाव्या शतकाला घडवतील.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com