पुणे/औंध - बाणेर-पाषाण लिंक रस्ता परिसरातील बसंत बहार सोसायटीत संगणक अभियंत्याने कुटुंबासह आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. त्यांच्या घरात चार वर्षांच्या मुलासह तिघांचे मृतदेह आढळले. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संगणक अभियंता जयेशकुमार पटेल (वय 34), पत्नी भूमिका पटेल (वय 30) आणि मुलगा नक्ष पटेल (वय 4) अशी मृतांची नावे आहेत. अभियंता जयेशकुमार हे गेली बारा वर्षे पुण्यात स्थायिक असून, ते आयटी कंपनीत अभियंता म्हणून नोकरीस होते. तर पत्नी भूमिका ही गृहिणी होती.
मुलगा नक्ष याच्या सततच्या आजारपणाला कंटाळून नैराश्यातून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. जयेश आणि भूमिका यांच्या गळ्याभोवती दोरीचे व्रण दिसत होते. गळफास घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. मुलगा नक्षचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोसायटीमधील सुरक्षारक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारपासून जयेश हे कंपनीत गेले नव्हते. त्यामुळे सहकारी मित्रांनी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु जयेश यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ते शहानिशा करण्यासाठी घरी आले. त्या वेळी त्यांना दरवाजा बंद असल्याचे आढळले. त्यांनी सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांना ही माहिती दिली. त्यावर त्यांनी रात्री पोलिस नियंत्रण कक्षात कळविले. रात्री अकराच्या सुमारास चतु:शृंगी पोलिस घटनास्थळी पोचले. दरवाजा आतून बंद असल्यामुळे घरात जाणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिस दुसऱ्या इमारतीच्या बाल्कनीतून ते पटेल यांच्या घरात गेले. पोलिसांनी आत प्रवेश केला तेव्हा भूमिका आणि नक्ष यांचे मृतदेह बिछान्यावर, तर जयेश हे खाली मृतावस्थेत आढळून आले. पती-पत्नीच्या गळ्यावर दोरीचे व्रण दिसत होते. त्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. मुलगा नक्ष याच्या तोंडातून फेस येत होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
खून केल्याचा पुरावा नाही
"नक्ष हा सतत आजारी असायचा. त्याला फिट्स येत असत. त्याचा मृत्यू झाल्यामुळे आई भूमिका हिने आत्महत्या केली असावी. या घटनेनंतर पती जयेशकुमार यानेही आपली जीवनयात्रा संपविली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. जयेशकुमार याने कोणाचा खून केल्याबाबत अद्याप काही पुरावा आढळून आलेला नाही,' असे वरिष्ठ निरीक्षक दयानंद ढोमे यांनी सांगितले.
मानसिक आधारासह समुपदेशन आवश्यक
सुखसंपन्न कुटुंबातील जयेशकुमार याने परिवाराला का संपविले, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. एका अभियंत्याने कोणताही गुन्हा नसताना जीवनयात्रा संपविल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आयटी कंपनीतील तणावाच्या वातावरणात बरेच तरुण-तरुणी जीवनात असे टोकाचे पाऊल का उचलत आहेत? याचा विचार करणे गरजेचे बनले आहे. सर्व सुखसोयी असूनही केवळ कमकुवत मानसिकतेमुळे असे प्रकार घडत आहेत. यावर उपाय शोधणे महत्त्वाचे आहे. त्यांना मानसिक आधारासह समुपदेशन गरजेचे बनले आहे.
|