सरकारी धोरणांमुळेच शेतकरी अडचणीत - राजू शेट्टी

मोढवे (ता. बारामती) - खासदार राजू शेट्टी यांना मुक्ता-जगन्नाथ पुरस्कार देऊन सन्मानित करताना मान्यवर.
मोढवे (ता. बारामती) - खासदार राजू शेट्टी यांना मुक्ता-जगन्नाथ पुरस्कार देऊन सन्मानित करताना मान्यवर.

वडगाव निंबाळकर - 'सरकारच्या धोरणांमुळेच शेतकरी अडचणीत आला आहे. मोदींनी "अच्छे दिन' आणण्याचे मृगजळ दाखवून सत्ता मिळविली. गेल्या चार वर्षांत पाच लाख कोटींचे कर्ज वाढले आहे.

शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचे राहिले बाजूला कर्ज मात्र दीडपट वाढले. आज देशात मर जवान; मर किसान अशी अवस्था आहे,'' अशा शब्दांत भाजप सरकारवर खासदार राजू शेट्टी यांनी हल्ला चढविला.

मुर्टी-मोढवे (ता. बारामती) येथील यशवंतराव मोरे-पाटील आश्रमशाळेत बारामतीच्या पंडित रमाबाई समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने (स्वा.) जगन्नाथअण्णा कोकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शेट्टी यांना मुक्ता-जगन्नाथ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. त्यात शेट्टी बोलत होते. या वेळी कॉ. अजित अभ्यंकर, सुभाष लोमटे, अविनाश गोफणे, सतीश जगदाळे, ऍड अजित कोकरे, शशिकांत कोकरे, लालासाहेब नलवडे, हनुमंत बालगुडे, राजेंद्र ढवाण, प्रशांत सातव उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, 'ऊसवगळता कोणत्याही पिकाला हमीभाव नाही. हमीभाव व बाजारात प्रत्यक्ष शेतीमालाला मिळालेली किंमत याचा फरक काढला, तर चार वर्षांत सहा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना कमी मिळाले आहेत. एका बाजूला साडेपाच लाख कोटी कर्ज वाटलं असलं तरी सरकारनं आपली जबाबदारी न पाळल्यामुळं ही परिस्थिती ओढावली आहे.

सरकाने नैतिक जबाबदारी स्वीकारून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी आहे. घर वापसीची चर्चा आम्ही फार ऐकतो, ती कधी करायची ती करा. पहिल्यांदा लूटवापसी करा. लुटलेले परत करा. नको तिकडं लोकांना नेलं जातंय.''

माजी आमदार विजयराव मोरे यांनी प्रास्ताविक, तर ऍड अनिल होळकर यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेच्या अध्यक्ष अलका मोरे यांनी आभार मानले.

माध्यमांवर टीका
शेतकरी संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीत देशातील शेतकरी मोठ्या संख्येने जमले होते. न्याय द्यावा म्हणून सरकारला साकडे घातले जात होते. पण, आमचा आक्रोश माध्यमाने दाखविला नाही. त्यावेळी पद्मावती चित्रपटाची चर्चा चालली होती. या देशात अजून किती दिवस जुनी थडगी उकरून लोकांना वेडं करणार आहात? पहिल्यांदा जिवंत लोकांचा विचार करा; अन्‌ मग मुडद्यांचा विचार करा. एवढेच आमचे म्हणणे आहे. परभणीत गेल्या चार दिवसांपासून एक जण स्वतःची चित्ता रचून त्यावर बसून उपोषण करतोय, याच्यापेक्षा वाईट ते काय? हे चित्र बदलायचा असेल तर वज्रमूठ आवळलीच पाहिजे. सरकारला जागं केलं पाहिजे, असे राजू शेट्टी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com