अपघाताचा  महामार्ग

अपघाताचा  महामार्ग

महामार्गांवरील अर्धवट रस्त्यांवरील खड्डे, संरक्षक कठड्यांची दुरवस्था, सेवा रस्ताच नसल्यामुळे ग्रामस्थांची विरुद्ध दिशेने वाहतूक, उड्डाण पूल, भुयारी मार्ग आणि नदीवरील पर्यायी पुलांच्या रखडलेल्या कामांमुळे पुणे ते बंगळूर राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. याठिकाणी किरकोळ ते भीषण अपघातांची मालिका सुरूच असून, त्यामध्ये हजारो निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत.

रस्त्याची चाळण अन्‌ अतिक्रमण!
जुन्या कात्रज घाटात प्रवेश करण्यापूर्वी मांगडेवाडी, भिलारेवाडी येथे रस्त्याची चाळण झाली आहे. घाटातील संरक्षक कठडे मोडकळीस आले आहेत. पथदिव्यांचा अभाव, दिशादर्शक, ‘रिफ्लेक्‍टर’ नसल्यामुळे वाहनचालकांना घाटामध्ये जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. शिंदेवाडी येथे संरक्षक कठडे आणि उड्डाण पुलाचे काम सुरू आहे; मात्र ‘अंडरपास’ नसल्याने एकाच रस्त्यावरून दोन्हीकडून धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू आहे. खेड शिवापूर येथील टोल नाक्‍याजवळ हॉटेलचे अतिक्रमण, टपऱ्या, खासगी वाहनांचे बेशिस्त पार्किंग, फळे आणि विविध वस्तूंची विक्री होत असल्याने टोल नाक्‍यापासून अडथळ्यांची शर्यत सुरू होते.

रस्ता सहापदरी; पूल दोनपदरी!
सहापदरी रस्ता आणेवाडी येथील पुलावर अरुंद होऊन दोनपदरी होतो. या पुलावर स्थानिक नागरिकांसाठी पदपथ आणि सेवा रस्त्याची सोय नसल्याने येथून नजीकच्या गावांतील वाहने, जनावरे विरुद्ध दिशेने येतात, त्यामुळे अपघात होत आहेत. याठिकाणी गेल्या पाच वर्षांत हजारो लोकांचा जीव गेला असून, पाचशेहून जास्त नागरिक अपंग झाले आहेत.
   
‘ग्रेड सेपरेटर’ की खड्डा!
नीरा नदी ओलांडून पुढे गेल्यानंतर पंढरपूर फाटा येथे ‘ग्रेड सेपरेटर’चे काम सुरू आहे. त्यामुळे ये-जा करण्यासाठी रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी, नजीकच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थांना शंभर फूट खड्ड्यातून रस्ता ओलांडावा लागत आहे. लोणंद- फलटणमार्गे पंढरपूरला जाण्यासाठी पर्यायी मार्ग असल्याने सर्रास विरुद्ध दिशेने वाहने येतात. यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये एक हजाराहून जास्त जणांना जीव गमवावा लागला आहे.

जाळ्या लावण्याकडे दुर्लक्ष
खंबाटकी घाटातील डोंगराच्या दरडी कोसळण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पावसाळ्यातही येथे पाण्यामुळे वाहतूक ठप्प होते. या दरडींची इतकी धोकादायक स्थिती असल्याने जाळ्या लावणे अत्यावश्‍यक आहे. असे असूनही याकडे अद्याप संबंधित यंत्रणेने लक्ष दिलेले नाही. घाटाच्या पायथ्याला देवस्थानची दहा एकर जमीन आहे. त्यामुळे डोंगर फोडून रस्तारुंदीकरण करण्यास येथील देवस्थानच्या विश्‍वस्तांचा विरोध आहे.

हॉटेलसाठी उड्डाण पुलाला विरोध
महामार्गावर सध्या उड्डाण पुलांचे काम बंद आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रस्तावित केलेल्या उड्डाण पुलाला काही ठिकाणी ग्रामसभेत ठराव करून विरोध केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, बहुतांश गावांमध्ये मूठभर अवैध हॉटेलचालकांच्या आर्थिक स्वार्थासाठी उड्डाण पूल, सेवा रस्ते, भुयारी मार्गासाठी भूसंपादनाला विरोध केला जात आहे.    

नीरा नदीवरील दोन पुलांवर कठडे नसल्यामुळे एक मोटार थेट नदीत पडून सात विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर सिमेंट- काँक्रीटचे कठडे बांधण्यात आले. परंतु, स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार मागणी करून देखील संरक्षक जाळी बसविण्याऐवजी मासे पकडण्याची जाळी बसविल्याची धक्कादायक बाब निर्दशनास आली. वाढती वाहतूक आणि अपघातांची वाढती संख्या पाहता नीरा नदीवरील नवीन पुलाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com