पुणे - 'जीएसटी करप्रणाली ही मागील 26 वर्षांमधील सर्वांत मोठी आर्थिक सुधारणा आहे. राज्य आणि केंद्राच्या 15 विविध करांचे एकत्रीकरण करून जीएसटीचा अमृतमय कलश तयार केला आहे. यामुळे कर सुलभीकरण होऊन व्यापार व गुंतवणुकीला अनुकूल वातावरण तयार होणार आहे,'' असे मत चार्टर्ड अकाउंटंट व अर्थतज्ज्ञ डॉ. दिलीप सातभाई यांनी व्यक्त केले.
जीएसटीला एक महिना पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी व नागरिकांच्या मनात जीएसटी बद्दल असलेले समज व गैरसमज या विषयावर प्राधिकरण येथील "आयआयसीएमआर'मध्ये चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी डॉ. सातभाई बोलत होते. संस्थेचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. सातभाई म्हणाले, 'पूर्वी केंद्राचे सेवाकर, केंद्रीय विक्रीकर, अबकारी कर, सुरक्षा उलाढाल, राज्यांचे मूल्यवर्धित कर (व्हॅट), विक्री कर, जकात कर, अबकारी कर, मालमत्ता कर, प्रवेश कर, कृषी कर, करमणूक कर, लॉटरी कर, वाहतूक कर यांसारख्या 15 करांच्या बदल्यात एकच कर लागणार आहे. जगभरातील सुमारे 142 देशांनी जीएसटी कर प्रणाली स्वीकारली आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर बहुतांश देशात वस्तू व सेवांच्या किमती वाढल्या आणि मर्यादित कालावधीनंतर त्या स्थिरदेखील झाल्या.''
"एक देश एक कर' असे धोरण असल्याने केंद्राच्या महसूल उत्पन्नात मागील वर्षाच्या तुलनेत तीन लाख कोटींची वाढ होणार आहे. येत्या एक-दोन वर्षांमध्ये दुचाकी गाड्यांच्या किमती वाढणार असून चारचाकी गाड्यांच्या किमती कमी होणार आहेत. तसेच काम सुरू असलेले घरे व सदनिकांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु काम पूर्ण झालेल्या घरांवर कोणताही कर लागणार नसल्याने बांधकाम पूर्ण झालेली घरे स्वस्तात मिळणार आहे.
- डॉ. दिलीप सातभाई, अर्थतज्ज्ञ |
|