जनतेतून सरपंच निवडणे घातक - अजित पवार

जनतेतून सरपंच निवडणे घातक - अजित पवार

वडगाव निंबाळकर - ‘‘सरपंच जनतेतून निवडला गेला आणि सदस्य मंडळाचे बहुमत नसेल, तर विकासकामे होतील का? जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री, पंतप्रधान जनतेतून निवडत नाहीत? मग सरपंचांची निवडणूक जनतेतून का?  सरकारचा हा निर्णय लोकशाहीला घातक आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.  

कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथे ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते होते.  

पवार म्हणाले, ‘‘ग्रामीण भागाकडे सरकारचे लक्ष नाही. सर्व पदे शहरी भागात आहेत. कामाचे नियोजन नाही. कर्जमाफीच्या बाबत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसली. ऑनलाइनच्या जाचक अटी टाकल्या. पाच लाख कर्ज असेल, तर तीन साडेतीन लाख शेतकऱ्यांनी भरायचे मग सरकार दीड लाख देणार आहे. शेतकऱ्याकडे साडेतीन लाख रुपये असते तर कर्ज थकले नसते. दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कर्जमाफीची मागणी केली; पण सरकारने अडचणीत भरच टाकली. नोटाबंदीतून काय साधले.’’ 

कोऱ्हाळे गावाला शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून फिल्टर देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. फलटण बारामती रेल्वेचा मार्ग आपल्या परिसरातून जाणार आहे. यासाठी सहकार्याची भूमिका ठेवा. जमिनीला चांगला भाव देण्यात येईल सर्वांत स्वस्तातला प्रवास रेल्वेचा असल्याने हा मार्ग होणे महत्त्वाचे आहे, असे पवार यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविकांना न्याय मिळाला पाहिजे
अजित पवार म्हणाले, ‘‘साखर आयात करण्याचा सरकारचा मनसुबा आहे. यामुळे साखरेचे भाव पडतील. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल. चांगले पैसे शेतकऱ्यांना मिळाल्यावर सरकारच्या पोटात गोळा का येतो कळत नाही. अंगणवाडीच्या सेविकांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी योग्य उपाययोजना सरकारने केली पाहिजे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com