'महाराष्ट्रात बारावीपर्यंत मराठी अनिवार्य करा'

'महाराष्ट्रात बारावीपर्यंत मराठी अनिवार्य करा'

पुणे - ‘‘पुण्या-मुंबईतच नव्हे; तर आता इतर लहान-सहान शहरांतसुद्धा मराठी बोलणारे लोक कमी होत आहेत. सर्वसामान्यांच्याही घरातून मराठी हद्दपार होऊ लागली आहे. पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे वाढतो आहे. रस्त्यावरची भाषा हिंदी झाली आहे. त्यामुळे मराठी भाषेचा प्रश्‍न अत्यंत गंभीर बनला आहे. अशा स्थितीत मराठी भाषेला वाचविण्यासाठी राज्य सरकारने सर्व माध्यमांच्या शाळा-महाविद्यालयांत बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करावी,’’ अशी मागणी नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी रविवारी केली.

बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देशमुख विजयी झाले. निकाल जाहीर होताच ‘श्रीनिवास गार्डन’ या त्यांच्या निवासस्थानी देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. कोणी पुष्पगुच्छ देऊन, तर कोणी पेढे देत त्यांना शुभेच्छा देत होते. प्रत्येकाच्या शुभेच्छा देशमुख आपुलकीने स्वीकारत होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी मुक्त संवाद साधला. मराठी भाषा संपली तर आपली संस्कृतीच धोक्‍यात येईल. त्यामुळे ती जपली पाहिजे. तसे वातावरण निर्माण झाले पाहिजे. त्यादृष्टीने मराठी अनिवार्य करण्यासाठी पाऊल उचलायला हवे, असे ते म्हणाले.

निवडणूक प्रक्रिया बदलायला हवी
देशमुख म्हणाले, ‘‘ही निवडणूक पंचरंगी झाली असली, तरी आम्ही सगळे एकमेकांचे चांगले मित्रच आहोत. कोणीही कोणावर चिखलफेक केली नाही. आपापले कार्य समोर ठेवून आम्ही मतदारांना सामोरे गेलो. अधिक मतदारांनी माझ्या बाजूने कौल दिला. तो मी आनंदाने आणि नम्रपणाने स्वीकारतो; पण ही निवडणूक प्रक्रिया आतून-बाहेरून पाहिल्यानंतर आता ती बदलायला हवी, असे माझे स्पष्ट मत झाले आहे. काळानुसार बदल हा झालाच पाहिजे. इतकी मोठी निवडणूक आणि एक हजारच मतदार का, सर्व आजीव सभासद मतदार का नको, असे वेगवेगळे मुद्दे मांडले जात आहेत. ठोस पर्याय आता पुढे आला पाहिजे.’’

ही एक शोकांतिकाच बनलीय
अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल देशमुख म्हणाले, ‘‘हा प्रश्‍न अधिक गंभीर होत चालला आहे. विचारवंतांचे खून होत आहेत. बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. ही एक शोकांतिकाच बनली आहे. 
तरीही लेखक-कलावंतांने या वातावरणाविरोधात बोलले पाहिजे. प्रश्‍न उपस्थित केले पाहिजेत. ते माझ्या अध्यक्षीय भाषणातसुद्धा दिसतील.’’ लेखकाने लोकांसाठी व्यक्त व्हायलाच हवे. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहताना माझी भूमिकासुद्धा हीच होती आणि पुढे तीच राहणार आहे. याच भूमिकेतून मी वर्षभर कार्यरत राहीन. मराठीसाठी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

आता मिळून काम करू
संमेलनाध्यक्षपदाचा निकाल जाहीर होताच देशमुख यांच्या निवासस्थानी गर्दी झाली. दूरध्वनीही सारखा खणखणत होता. माजी संमेलनाध्यक्षांपासून ते साहित्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनीही दूरध्वनीद्वारे देशमुख यांचे अभिनंदन केले. ‘आता आपण मराठी भाषेसाठी मिळून काम करू’, असेही त्यांनी देशमुख यांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com