‘इस शहर में हर कोई महफूझ क्‍यों नहीं है’

Accident
Accident

पुणे - घरच्यांना ‘बाय’ करून बाहेर पडलेली व्यक्ती सुखरूप परत येईल ना, अशी धाकधूक कायम असते... सहकाऱ्यांचा निरोप घेऊन कार्यालयातून निघालेली व्यक्ती घरी कधी आणि कशी पोचेल, याचाही काही नेम राहिला नाही... हे असे का होते आहे? कधीकाळी सर्वांत सुरक्षित असलेले तुमचे-आमचे पुणे शहर आज सर्वच बाबतींत एवढे असुरक्षित का झाले आहे? विशेषत: अपघातांच्या बाबतीत. 

‘... इस शहर में हर शख्स परेशान सा क्‍यों है’ अशी ओळ शायर शहरयार यांच्या एका गझलेच्या मुखड्यामध्ये आहे. पुण्यातील प्रत्येक जण वाढत्या आकस्मिक घटनांमुळे ‘परेशान’ तर आहेच; शिवाय ‘इस शहर में हर कोई महफूझ क्‍यों नहैं है’ असाही प्रश्‍न सर्वांना पडलेला आहे. सुबत्ता आली की सर्व काही चांगले होईल म्हणतात; मात्र पुण्यामध्ये सुबत्तेसोबत बेफिकीरपणा वाढीस लागला आहे आणि त्यातून अनपेक्षित घडामोडीही घडू लागल्या आहेत. मुलाला शाळेतून आणायला गेलेली आई तिथपर्यंतच पोचतच नाही, वाटेतच तिचा अपघात होतो आणि तिकडे मूल रडून-रडून कासावीस होते.

पाहुण्याला सोडायला गेलेले यजमान घरी परत येतच नाहीत. आई चिमुरड्या मुलांसह रस्ता ओलांडत असताना कुठली भरधाव कार काळ बनून येते आणि तीन मुलांसह आईला चिरडून जाते. क्षणात होत्याचे नव्हते... स्वत:च्या विवाहाच्या पत्रिका वाटायला गेलेला मोटारसायकलस्वार घरी परततो तो पार्थिव होऊनच. वाटेत त्याला ट्रकने चिरडलेले असते. पत्रिकांवर हळदी-कुंकू पडण्याऐवजी रक्ताचा सडा पडलेला असतो. पीएमपी बसचा ब्रेक निकामी होतो आणि तो एखाद्या कुटुंबाचा कर्दनकाळ बनतो. मोटारींच्या धडकांचे अपघात पूर्वी वाचण्यात यायचे, आता दोन मोटरसायकलस्वार धडकून मृत्यमुखी पडत आहेत. थोडासा कुठे पाऊस झाला, तर गाड्या घसरून पडताहेत किंवा पाण्यात वाहून जाताहेत. सकाळी फिरायला म्हणून जातो तो परततच नाही. सहज चालता-चालता डोक्‍यावर काही तरी पडते आणि थेट जिवावर बेतते. 

एखाद्याचा मृत्यू कशाने येईल काहीही सांगता येत नाही. या शहरात एवढी असुरक्षितता का निर्माण झाली आहे? एवढे अपघात होत आहेत पण त्याचे कोणालाच का सोयरसुतक नाहीये. एवढे आपण का बधिर झालो आहोत. ‘एनसीआरबी’च्या अंदाजानुसार एकट्या पुणे शहरात गेल्या वर्षी अपघातांत मृत्यू पावलेल्यांची संख्या सुमारे सहा हजारांच्या घरात आहे. त्यात तरुणांची संख्या जवळ जवळ निम्मी आहे. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार अपघाती मृत्यूचे प्रमाण अधिक असणे अत्यंत मागासलेपणाचे लक्षण आहे. म्हणजे काय तर आपल्याकडे नुसतीच नावाला सुबत्ता येत आहे, त्यासोबत सुरक्षितता संपत चालली आहे.

आपल्या बेदरकार आणि नियम गुंडाळून ठेवण्याच्या वृत्तीमुळे पतंगाच्या मांजाही आता लोकांच्या जिवावर उठला आहे. ‘सकाळ’च्या कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांचा काय दोष होता. कार्यालयातून जात असताना नायलॉनच्या धारदार मांजाने त्यांचा गळा कापला गेला, तत्क्षणी त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या; पुन्हा कधीही न उठण्यासाठी. या घटनेनंतरही पुण्याच्या विविध भागांमध्ये पतंग उडतच आहेत अन्‌ दुसरा बळी शोधत आहेत. काय म्हणावे या वृत्तीला. आपण सुधारणार आहोत की नाही?

पुणे बनतेय अपघातांचे शहर
पुण्यातील अपघाती घटनांच्या गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली असता, पुणेकरांचा बेदरकारपणा नजरेत भरतो. २०१४ मध्ये अशा घटनांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या सुमारे ३८८० होती, तर पुढच्याच वर्षी हा आकडा ४६६५ पर्यंत गेला. एका वर्षात केवढी ही अधोगती. या गतीने अपघात वाढत गेले तर भविष्यात काय होईल याची कल्पना करवत नाही. ‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार पुण्यात मृत्युदराचे (अपघाती) म्हणजे दर लाखामागे मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीचे प्रमाण संपूर्ण राज्यातच नव्हे, तर देशात सर्वाधिक आहे. २०१४ ला हे प्रमाण ७६ होते, तर २०१५ ला ते ९२.४ वर गेले. त्याच वेळी देशाच्या राजधानीत ३६.३, तर राज्याच्या राजधानीत म्हणजे मुंबईत ४५ एवढा मृत्युदर होता. देशातील प्रमुख शहरांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता मृत्युदर घटल्याचे दिसते. त्याला अपवाद ठरलेय आपले पुणे. इथला मृत्युदर ७६ वरून ९२ वर पोचला. याला कोण जबाबदार आहे? आपण सारेच!वाहने हळू चालविण्यात, नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात, पादचाऱ्यांचा सन्मान करण्यात, वाहतूक पोलिसांचा सन्मान राखण्यात, सिग्नलचा संदेश ऐकण्यात आपणाला कमीपणा का वाटत आहे? आपण भरधाव अन्‌ बेदरकार झालो आहोत अन्‌ तेही कोणतेच कारण नसताना. एका मोटरसायकलस्वारास मुद्दाम सिग्नलवर गाठून विचारले ‘एवढे वेगात का चालला आहात, काही आपत्कालीन स्थिती?’ याचे उत्तर त्याला देता आले नाही. बहुतांश लोकांची हीच अवस्था आहे. दुचाकीवाला असो किंवा चारचाकीवाला किंवा अजवड वाहनवाला. या गतीला आता आवरा, गती वाढवायचीच तर आयुष्याच्या दर्जाची वाढवा, कामाची वाढवा. अन्यथा, येत्या दहा वर्षांमध्ये तुमचे-आमचे शहर कोलमडून पडलेले असेल.

तिच्या मृत्यूला जबाबदारे कोण?
सुवर्णा मुजुमदारचा चिनी मांजाने बळी घेतला. तिच्या मृत्यूला कोण कोण जबाबदार आहेत? बंदी असतानाही हा मांजा मागवून त्याचा साठा करणारे, साठेवाल्यांकडून घेऊन ‘घातक शस्त्र’ राजरोसपणे विकणारे, बंदी असलेला मांजा घेऊन शहराच्या मध्यवर्ती भागात बिनदिक्कतपणे पतंग उडविणारे, एवढे घडूनही मांजा बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईस टाळाटाळ करणारे पोलिस आणि प्रशासन, की हे सारेच. सर्वांनी विचार करण्याची वेळ आहे. असा मांजा आपल्या शेजारच्या दुकानात कोणी विकत असेल, कोणी साठा करत असेल तर त्यांना उघडे पाडायला हवे. असा मांजा वापरण्यापासून मुलांना रोखायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com