त्रिसूत्रीने प्रदूषण टळेल

त्रिसूत्रीने प्रदूषण टळेल

पुणे - चांगल्या गुणवत्तेचे स्वच्छ रस्ते, वाहनांच्या टायरची देखभाल आणि वाहनांसाठी अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर ही पुण्यातील धूळ कमी करण्याची त्रिसूत्री असल्याचा विश्‍वास प्रदूषण नियंत्रणतज्ज्ञांनी व्यक्त केला. रस्त्यांवर येणाऱ्या खासगी वाहनांची संख्या कमी करण्याबरोबरच रस्त्यावरून दिवस-रात्र उडणारे धुळीचे लोट कमी करण्यासाठीच्या उपाययोजना तातडीने हाती घेणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था (आयआयटीएम) येथील ‘सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च’तर्फे (सफर) नोंदविलेल्या निरीक्षणातून दिल्ली हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथे बुधवारी हवेतील धूलिकणांचे प्रमाण (पीएम १०) २४१ मायक्रोग्रॅम प्रतिघन मीटर आणि अतिसूक्ष्म धूलिकणांचे (पीएम २.५) प्रमाण ३५९ मायक्रोग्रॅम प्रतिघन मीटर असून, त्याने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. 

पुण्यात हे प्रमाण सध्या त्यातुलनेत कमी असले तरी त्यात सातत्याने होणारी वाढ ही धोक्‍याची घंटा आहे. याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. पुण्यात शिवाजीनगर येथे ‘पीएम १०’चे प्रमाण ११३ मायक्रोग्रॅम प्रतिघन मीटर आणि ‘पीएम २.५’चे प्रमाण १७० मायक्रोग्रॅम प्रतिघन मीटर आहे. हवेतील ही स्थिती धोकादायक पातळीवर नसली तरी चांगलीदेखील नाही. त्यामुळे पुण्याची दिल्ली होऊ नये, यासाठी तज्ज्ञांनी या उपाययोजना सांगितल्या आहे. 

प्रदूषण रोखण्याबाबत उद्या ‘सिटी डायलॉग’
शहरातील हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण वेगाने वाढत असून त्यातील धूलिकणाचा धोका गंभीर बनत आहे. अशा प्रदूषणाचा थेट परिणाम पुणेकरांच्या आरोग्यावर होत असून हे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्‍यक आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (ता. २४) ‘सिटी डायलॉग’ आयोजित केला आहे. त्यात नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांच्यासह प्रदूषण विषयातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. टिळक रस्त्यावरील डॉ. नीतू मांडके आयएमए हाऊस येथील सभागृहात सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होईल, अशी माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी कळविली आहे.

कशामुळे वाढताहेत धूलिकण?
रस्त्यांचा दर्जा चांगला नाही
पदपथ नाहीत
रस्त्यांवर असणारे खड्डे
वाहनांच्या टायरच्या होणाऱ्या झिजेतून 
जागोजागी जाळल्या जाणाऱ्या कचऱ्यातून

काय आहेत उपाय?
रस्त्यांची गुणवत्ता सुधारणे हा त्यावरचा प्रभावी उपाय आहे. शहरातील बहुतांश ठिकाणचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे झाले आहेत; मात्र रस्ता संपल्यानंतर तेथे पदपथ आवश्‍यक असतो. त्यातून धूळ वाढत नाही. तीच धूळ फिरून-फिरून रस्त्यांवर येत असल्याने सूक्ष्म धूलिकण वाढतात. यावर तातडीने आणि दीर्घकालीन अशा दोन प्रकारच्या उपाययोजना करता येतील, असे तज्ज्ञांनी सुचविले आहे.

तातडीच्या उपाययोजना
रस्ते नियमित स्वच्छ ठेवावे
रस्त्याच्या कडेला पदपथ करणे
कचरा जाळण्यावर निर्बंध आणावेत
वाहनांच्या टायरची नियमित देखभाल करावी. जुने टायर वापरू नयेत

दीर्घकालीन उपाययोजना
मेट्रो, बीआरटीसारख्या सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय सक्षम करणे
वाहनांची वर्दळ कमी करणे
बॅटरी आणि सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य देणे
पायी चालण्यासाठी आणि सायकलसाठी स्वतंत्र ट्रॅक करणे

पदपथ हा रस्त्यावरील धूळ कमी करण्याचा प्रभावी मार्ग आहे. संपूर्ण रस्त्यावर धूळ निर्माण होणार नाही, याची व्यवस्था पदपथातून करता येते. तसेच ‘सीएनजी’ला अनुदान देणे, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. त्यातून शहरातील धुळीचे प्रमाण कमी करता येईल.
- मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, महापालिका

रस्ते स्वच्छ ठेवणे हा धूळ नियंत्रणाचा सोपा मार्ग आहे. रस्ते स्वच्छ केले नाहीत, तर धूळ वाढतच जाणार. त्याच वेळी रस्त्यांची गुणवत्ता चांगली असली पाहिजे. त्यामुळे नव्याने धूळ निर्माण होणार नाही.
- डॉ. संदीप साळवी, संचालक, चेस्ट रिसर्च फाउंडेशन

रस्त्यावरील वाहतूक हा धूलिकणांचा मुख्य स्रोत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील धूळ नियंत्रित करण्यासाठी रस्त्यांची गुणवत्ता आणि रस्ते बांधण्याची पद्धत सुधारली पाहिजे.
- डॉ. गुफरान बेग, प्रकल्प संचालक, सफर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com