दहा जिल्ह्यांत पावसाची ओढ

दहा जिल्ह्यांत पावसाची ओढ

मराठवाड्यातील बहुसंख्य जिल्ह्यांचा समावेश
पुणे - पाऊस सुरू होऊन दोन महिन्यांनंतरही राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली नसल्याचे निरीक्षण हवामान खात्याने रविवारी नोंदविले. मराठवाड्यात बहुसंख्य जिल्ह्यांचा यात समावेश असून, त्या खालोखाल विदर्भाचा समावेश आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये मात्र सरासरीपेक्षा 60 टक्के जास्त पावसाची नोंद झाल्याचीही माहिती हवामान शास्त्रज्ञांनी दिली.

राज्यात आठ जूनला नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) दाखल झाला. पावसाला सुरवात झाल्यानंतर काही दिवसांमध्ये तो मध्य महाराष्ट्रात रेंगाळला; पण पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने फक्त ढगाळ वातावरण होते. प्रत्यक्ष पावसाची वाट पाहावी लागत होती. त्यानंतर जूनच्या शेवटी मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आणि राज्यात पावसाला सुरवात झाली. त्यामुळे जूनमध्ये राज्यात विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी पावसाने सरासरी गाठली होती. दुष्काळी असलेल्या मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जूनमध्ये दमदार पाऊस झाला. मात्र, जुलैमध्ये पावसाने राज्याच्या बहुतांश भागात ओढ दिली. त्यामुळे राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पाऊस दोन महिन्यांच्या सरासरीपेक्षा कमी पडल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

कोकण
कोकणातील मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाने तेथील सरासरी गाठली आहे, तर पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 20 ते 59 टक्के पावसाची नोंद झाली.

पश्‍चिम महाराष्ट्र
पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे, तर नगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये 20 ते 59 टक्के पाऊस नोंदला आहे. सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांनी सरासरी गाठली आहे, तर सांगली जिल्ह्यात मात्र अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तेथे सरासरीपेक्षा -30 पाऊस पडला आहे.

उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातही चारपैकी नंदुरबार, धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यांनी पावसाची सरासरी गाठली आहे, तर नाशिकमध्ये दमदार पावसाची नोंद झाली आहे.

मराठवाडा
दुष्काळी समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात सुरवातीला चांगला पाऊस पडला. मात्र, जुलैमध्ये पावसाने दडी मारली. त्यामुळे निम्म्या मराठवाड्यावर पुन्हा दुष्काळाची टांगती तलवार असल्याचे चित्र दिसत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले. औरंगाबाद (-32), जालना (-25), परभणी (-37), हिंगोली (-21), नांदेड (-22) येथे पावसाने सरासरीही गाठली नाही. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत -19 ते 19 टक्के म्हणजे सरासरी इतका पाऊस पडल्याचेही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

विदर्भ
विदर्भात यंदा मॉन्सून उशिरा पोचला. त्यामुळे जूनच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावली नव्हती. मात्र, त्यानंतर विदर्भातील 11 पैकी सात जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडला. पश्‍चिम विदर्भातील अमरावती (-23) आणि यवतमाळ (-24) तसेच पूर्व विदर्भातील भंडारा (-22) आणि गोंदिया (-25) पाऊस पडला. बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे सरासरी पावसाची नोंद झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com