पुणे - संकेतस्थळावर ऑनलाइन विवाह नोंदणी प्रक्रियेत अर्ज भरलेल्यांना लग्नाच्या तारखेची नोटीस ई-मेलवरून दिली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरताना ई-मेल नोंदविला जाणार आहे. त्यामुळे नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्या जोडप्यांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत.
याबाबतची चाचणी यशस्वी झाली असून, येत्या आठवडाभरात ही सुविधा सुरू होणार आहे.
राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नोंदणी पद्धतीने विवाहासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर एक महिन्यात विवाह करावा लागतो, त्यासाठी नोटीस दिली जाते. आतापर्यंत ही नोटीस टपालाद्वारे पाठविण्यात येत होती, त्यामुळे अर्जदार जोडप्यांना विवाह नोंदणी कार्यालयात वारंवार यावे लागत होते.
उशिराने टपाल मिळाल्यामुळे अडचणींनाही सामोरे जावे लागत होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र संगणकीकृत यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. ई-मेलद्वारे नोटीस पाठविण्याची चाचणी यशस्वी झाली असून, ती मुख्य सर्व्हरवर सुरक्षा परीक्षणासाठी (सिक्युरिटी ऑडिट) पाठविण्यात आली आहे. आठवडाभरात सर्व अर्जदारांना नोंदविलेल्या ई-मेलवर नोटिसा पाठविण्यात येणार आहेत.
दस्तनोंदणी कमी; महसूल जास्त
मुहूर्त पाहूनच जमीन, घर आणि सदनिकेची खरेदी- विक्री करण्याचा नागरिकांचा कल असतो. परिणामी पितृपंधरवड्यात दस्तनोंदणी सरासरी दोन हजारांनी कमी झाली. सप्टेंबरमध्ये राज्यात एकूण 1 लाख 26 हजार 918 हजार दस्तनोंदणी झाली. त्याद्वारे 1 हजार 234 कोटी 48 लाख रुपयांचा महसूल मिळाला. नोंदणी कमी झाली असूनही सुधारित रेडिरेकनर तसेच मुद्रांक शुल्कामुळे महसुलाचा आकडा वाढला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
|