राज्यात किमान तापमान घटले 

राज्यात किमान तापमान घटले 

पुणे - राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरल्याचे निरीक्षण हवामान खात्याने बुधवारी नोंदविले. येत्या रविवारपर्यंत (ता. 12) राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याने हवेतील गारठा वाढण्याची शक्‍यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली. राज्यात सर्वांत कमी तापमान उस्मानाबाद येथे 12 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यात 13.8 अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाचा पारा घसरला असल्याची माहिती खात्यातर्फे देण्यात आली. 

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा सरासरीइतका वाढला होता. तसेच, ढगाळ वातावरणामुळे हवेतील गारठाही कमी झाला होता. मात्र, 

मंगळवारी रात्रीपासून आकाश निरभ्र झाले, त्यामुळे मंगळवारपासून हवेत गारठा जाणवू लागला. राज्याच्या बहुतांश भागांत किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा एक ते पाच अंश सेल्सिअसने कमी झाला आहे. उस्मानाबाद येथे बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाच्या पाऱ्यात 5.2 अंश सेल्सिअसने घट झाली. तेथे राज्यातील सर्वांत कमी तापमान नोंदले गेले. 

मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागात किमान तापमानाचा पारा कमी झाला आहे. कोकणात मात्र किमान तापमानाचा पारा सरासरीइतका राहिला. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये हवेतील गारठा वाढला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. 

शहरातील पारा घसरण्याची शक्‍यता 
शहरात येत्या रविवारपर्यंत आकाश निरभ्र राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शहरात सध्या 13 अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमानाची नोंद होत आहे. हे तापमान पुढील चार दिवसांमध्ये 12 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर आकाश ढगाळ राहणार असल्याने किमान तापमान पुन्हा वाढेल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com