भीतीचे साहसात रूपांतर करा; यश तुमचंच आहे! - नांगरे पाटील

भीतीचे साहसात रूपांतर करा; यश तुमचंच आहे! - नांगरे पाटील

पुणे - ‘शिकणं हे तुमच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक समजा! शिक्षण कधीही थांबवू नका. ते तुम्हाला नेहमीच मार्ग दाखवेल. आपली पॅशन आणि आपलं काम एकच असेल, तर आयुष्य आनंदी होणं कठीण नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, भीतीचे साहसात रूपांतर करा. खंबीर राहा. यश तुमचंच आहे,’’ अशा प्रेरणादायी शब्दांत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

‘सकाळ’च्या ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व्यासपीठाने आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. बावधन येथील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात रविवारी सकाळी ‘समिट’चे उद्‌घाटन झाले. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार, स्पेक्‍ट्रम ॲकॅडमीचे संचालक सुनील पाटील, ‘यिन’चे प्रमुख तेजस गुजराथी आदी उपस्थित होते.

नांगरे पाटील म्हणाले, ‘‘स्वामी विवेकानंद म्हणतात तसे, एक कल्पना उचलून तुम्ही त्यावर स्वतःला झोकून द्या. चिकाटी आणि साधनेतून यश मिळणे निश्‍चित आहे. महत्त्वाचे म्हणजे वाचनाची सोबत कधीही सोडू नका. प्रेरणा मिळविण्यासाठी पुस्तकासारखा मित्र नाही.’’

दरम्यान, आपल्या प्रेरणास्थान असलेल्या वक्‍त्यांकडून थेट त्यांच्या आयुष्यातील अनुभव ऐकण्यासाठीचा विद्यार्थ्यांमधील वाढता उत्साह, मान्यवरांचे अतिव मोलाचे मार्गदर्शन अन्‌ त्यांच्या व्याख्यानातून मिळणारी न संपणारी ऊर्जा अशा उत्साही वातावरणात दीपप्रज्वलनानंतर समिट सुरू झाली. सुतार यांनी प्रास्ताविक केले.

‘यिन’च्या स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण
‘यिन’च्या स्वयंसेवकांना पुणे ग्रामीण पोलिसांतर्फे मर्यादित कालावधीचे विशेष प्रशिक्षण देऊन या तरुणांना अधिक कौशल्य प्राप्त करून देण्याची घोषणा या वेळी विश्वास नांगरे पाटील यांनी केली. तसेच स्वयंसेवकांना ‘विशेष पोलिस ऑफिसर’ म्हणून प्रमाणपत्रही दिले जातील, असे पाटील यांनी सांगितले.

शॉर्टकटच्या मागे धावू नका - कुलगुरू
पुणे - ‘आपल्यातील बलस्थाने ओळखा. आपल्याला पुढे काय करायचे आहे, हे ठरवा आणि एक निश्‍चित ध्येय घेऊन पुढे जात राहा; पण लक्षात ठेवा, कधीही शॉर्टकट पकडू नका. खऱ्या यशासाठी शॉर्टकट्‌स कधीही उपयोगी ठरत नाहीत,’’

अशा शब्दांत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

‘सकाळ’च्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’चे डॉ. संजय चोरडिया, ‘निलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’चे निलय मेहता, ‘जेएसपीएम’चे विजय सावंत आदी उपस्थित होते.

करमळकर म्हणाले,‘‘आपली वाट योग्य दिशेने पुढे चालण्यासाठी युवावस्थेत योग्य गुरूची आवश्‍यकता असते. गुरूच आपल्याला योग्य दिशा दाखवतो. आपल्यातील चांगले काय, हे उलगडून सांगतो तो गुरू.’’ चांगले चारित्र्य ही खरी संपत्ती असते.  आज शाळा-महाविद्यालयांतूनदेखील ‘कॅरेक्‍टर एज्युकेशन’ देण्याची गरज आहे. त्यातूनच पुढची पिढी घडणार आहे आणि नव्या भारताला घडविणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com