लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्‍न सोडवावेत - बापट 

लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्‍न सोडवावेत - बापट 

पुणे - ""लोकप्रतिनिधी कोणत्याही जाती- धर्माचे असोत, त्यांनी समाजाचे प्रश्‍न सोडविणे हे नगरसेवकांचे कर्तव्य आहे. कारण आजचा आजी नगरसेवक भविष्यात माजी होणार आहे. त्यामुळेच समाजातील नागरिकांची कामे कशी होतील, याकडेच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. माळी समाजालाही न्याय मिळाला पाहिजे,'' असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. 

दी सासवड माळी शुगर फॅक्‍टरी लि., माळीनगरतर्फे माळी समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार जयदेव गायकवाड, योगेश टिळेकर, महापौर मुक्ता टिळक, नगरसेविका चंचला कोद्रे, वैशाली बनकर, अश्‍विनी कदम, विठ्ठल लडकत यांच्यासह पुणे, पिंपरी- चिंचवड येथील नगरसेवक उपस्थित होते. 

कांबळे म्हणाले, ""फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे. ओबीसींसाठी शासनाने स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली. 2384 कोटी रुपयांची तरतूदही यंदाच्या अर्थसंकल्पात केली असून, सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका भाजपची आहे. त्याचप्रमाणे जे खरे ओबीसी आहेत, त्यांनादेखील न्याय मिळाला पाहिजे.'' 

गायकवाड म्हणाले, ""धर्म, वंश, जात यापलीकडे जाऊन विचार करावा, असे राज्यघटना सांगते. मात्र, देशात आजही जातींची समाजव्यवस्था आहे, त्यामुळे जातींचे प्रश्‍न सुटायला हवेत.'' टिळेकर म्हणाले, ""शैक्षणिक क्षेत्रात फुले दाम्पत्याचे योगदान मोलाचे आहे, त्यामुळे त्यांना भारतरत्न मिळावा, याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे.'' 

महापौर मुक्ता टिळक यांनी भिडेवाड्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍वासन दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com