बसच्या गर्दीत दडलेल्या विकृती

PMPML Bus
PMPML Bus

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱया 'पीएमपीएमएल'ने प्रवास सामान्य नागरिकांसाठी स्वस्त आहे खरा; परंतु, लांब पल्ल्याच्या आणि खचाखच भरलेल्या वाहनांतून प्रवास करताना महिलांसाठी खरंच हा प्रवास सुरक्षित आहे का? असेल तर खचाखच भरलेल्या बसमध्ये महिलांना विकृत प्रवृत्तीच्या पुरूषांचा छळ सहन करावा लागतो का? कोणी उघडपणे या विषयावर बोलत नसले, तरी 'पीएमपीएमएल' प्रशासनाने लक्ष देण्याची नक्कीच वेळ आली आहे.

तारीख : 20 जानेवारी 2017
स्थळ : पुणे महानगरपालिका बस स्टॉप
वेळ :  संध्याकाळचे 5.30
बसचा मार्ग : मनपा भवन ते तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, जि. पुणे)

सणसवाडी येथे एका विवाहाला जायचे होते अन् विवाहाची वेळ सायंकाळची होती. पुण्यातून सायंकाळच्या वेळेस मोटारीतून बाहेर पडणे 'सोपे' जरी असले तरी विवाहाची वेळ गाठणे अवघडच होते. सुखकर प्रवास व्हावा म्हणून बसचा पर्याय निवडला अन् वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागले.

साधारण पाचच्या सुमारास मनपा भवनावर दाखल झालो. मनपा भवन ते तळेगाव ढमढेरेच्या बससाठी भली मोठी रांग. किमान चार बसमध्येही प्रवासी न बसू शकतील एवढी मोठी रांग होती. रांगेत जाऊन कसाबसा उभा राहिलो. महाविद्यालये सुटल्यामुळे रांगेत युवक, युवती, वृद्ध महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा मोठा समावेश होता. काही वेळानंतर दोन बसेस दाखल झाल्या. परंतु, त्यांच्यामध्ये 'संगीत खुर्ची'चा खेळ सुरू आहे की काय असे वाटण्याइतपत त्या मागे-पुढे होत होत्या. कारण काय असावे, कोणालाच समजत नव्हते. 

साडेपाचच्या सुमारास मनपा-तळेगाव ढमढेरे बस लागल्याचे समजले आणि प्रत्येकजण बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागला. विवाहाचा मुहुर्त गाठायचा असल्यामुळे कसाबसा प्रयत्न केला. बसमध्ये प्रवेश केला. महानगरपालिकेजवळच बस खचाखच भरली. अगदी श्वास घेणेही अवघड होऊन बसले. पुरता चेंबून गेलो. पाय अनेकांनी तुडवले होते शर्टची तर अवस्था वाईट झाली होती. 

काही वेळातच बस सुरू झाली. पुणे स्टेशन गाठले. बसच्या मागे मोठी गर्दी धावू लागली. बस चालकाने ब्रेक दाबला. अनेकजण आतमध्ये शिरले असावेत, असा अंदाज बांधला. कारण अगोदरच दबलेलो असताना पुन्हा जास्त वेगाने दबला जात होतो. बसचा प्रवास सुरू झाला होता. बीआरटी मार्गावरील प्रवासीही बसमध्ये प्रवेश करत होते. कारण ही बस गेली तर पुन्हा कधी बस येईल, याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. बसचा प्रवास सुरू होता. अनेक युवती अवघडलेल्या स्थितीत उभ्या होत्या. गर्दीत त्यांची अतिशय बिकट अवस्था होती. दोन महाविद्यालयीन युवतींचा रडताना आवाज येऊ लागला. बसमधील काहीजण 'गर्दी'चा पुरेपुर गैरफायदा घेत होते. युवतींना एक प्रकारच्या किळसवाण्या स्पर्शांना सहन करावे लागत होते. काही मुली 'नको त्या' स्पर्शाने भेदरल्या होत्या. गर्दीत शिरलेल्या विकृतींमुळं एका थांब्यावर कशाबशा त्या खाली उतरल्या...दुसऱया बससाठी...परंतु, प्रश्न तिथेच संपला नव्हता. त्या मुलींप्रमाणेच अनेकजणी बसमधून प्रवास करत होत्या. त्यांनाही 'तो'च अनुभव येत होता. परंतु, सायंकाळपर्यंत घर गाठायचे असल्यामुळे मुकाट्याने त्या 'छळ' सहन करत होत्या. प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकही गर्दीचा कसा गैरफायदा उठवतात हे अनुभवायला मिळाले. 

काही तासानंतर बसमधील गर्दी कमी-कमी होत गेली. किमान मोकळा श्वास घेता येऊ लागला. काही तासांपासून माझ्या शेजारी उभ्या राहिलेल्या तरूणाला थोडेसे बोलते केले. 'या मार्गावर या वेळेला रोजच अशी परिस्थिती असते. एक बस सोडली तर पुन्हा नवीन बस कधी येईल, कोणालाच माहित नसते. शिवाय, प्रवासादरम्यान बसचा 'ब्रेक' कधीही फेल होऊ शकतो. युवती व महिलांना तर दररोजच छळाला सामोरे जावे लागते. घरी सांगावे तर कॉलेज बंद होईल..या भीतीनं अनेकजणी तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करतात,' तो म्हणाला. 

माझा बसस्टॉप आल्यामुळे मी खाली उतरलो...पुण्याकडे रात्री पुन्हा बसने प्रवास करायचा होता. एका बस स्टॉपवर जाऊ थांबलो. काही वेळातच बस आली परंतु बस थांब्याजवळ न थांबता काही अंतर पुढे जाऊन थांबली. वृद्ध नागरिक पळत-पळत येऊन बसमध्ये बसले. गर्दी कमी असल्यामुळे रात्रीचा प्रवास थोडा सुखकर झाला. परंतु, या विषयाबाबत थोडी माहिती घेण्याचे ठरविले अन् विविध प्रश्न समोर आले. खरंतर प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळेच प्रवाशांना व कर्मचाऱयांना त्रास होतो, असे काही कर्मचाऱयांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

प्रवास व चर्चेदरम्यान उपस्थित काही झालेले प्रश्नः

  • अधिकाऱयांच्या ढिसाळ नियोजनामुळे वेळेवर बसेस सुटत नाहीत.
  • वाहक-चालकांना वरिष्ठ अधिकाऱयांची मर्जी सांभाळावी लागते. 
  • 'बीआरटी'चा कितपत फायदा होत आहे याबद्दल कोणीच स्पष्ट बोलत नाही. 
  • प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेतच येत नाही. 
  • प्रवासी पैसे देऊन प्रवास करत असतील तर सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?
  • 'पीएमपीएमएल'ला मनपा-तळेगाव ढमढेरे सारखे मार्ग सर्वाधिक आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे असतील तर वेळेवर व गर्दीच्या वेळेस बसेस सोडण्याची जबाबदारी कोणाची?
  • गर्दीच्या वेळेस महिलांसाठी स्वतंत्र बसेस का नसतात?

अगदी ढोबळ प्रश्न समजले, ते मांडले. प्रवास स्वस्त आहे; पण सगळेच मार्ग सुरक्षित नक्कीच नाहीत. यामागे समाजातील विकृत मंडळी जितकी कारणीभूत आहेत, तितकीच गर्दीच्या ठिकाणी कमी बसेस ठेवणारे प्रशासनही जबाबदार आहे. गर्दीच्या चेहऱयाआड लपलेल्या विकृतीला लगाम घालायचा असेल, तर शहरांमधली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागेल. प्रवाशांना बसण्यासाठी किंवा उभं राहण्यासाठी जागा पुरेशा उपलब्ध असतील, इतक्या संख्येनं बसेस असाव्या लागतील. ही समस्या फक्त पुण्यातच आहे, असं नाही. कदाचित मुंबईत असेल, नागपूरला असेल किंवा औरंगाबादला. सार्वजनिक वाहतुकीचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित बनवण्याची जबाबदारी प्रशासनानं टाळणं कितपत योग्य आहे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com