पुणे - ‘‘विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाचा वापर विकासासाठी करण्याची गरज आहे. त्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच त्यांच्यातील तंत्रज्ञानाच्या ज्ञानालाही चालना देण्याची आवश्यकता आहे,’’ असे मत महाट्रान्सफोचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांनी व्यक्त केले.
‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) आणि वाघोली येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या संकुलातर्फे आयोजिलेल्या ‘सायनोशुअर २०१७’ या तंत्रज्ञानावर आधारित महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी पाटील बोलत होते.
संस्थेचे संस्थापक सचिव प्रा. तानाजी सावंत, जेएसपीएमच्या वाघोली संकुलाचे संचालक डॉ. एस. एन. पाटील, ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी’चे सहसंचालक डॉ. पी. के. खन्ना, नेट-प्रोटेक्टर अँटी व्हायरसचे सहव्यवस्थापकीय संचालक संजीव केला, व्यवस्थापकीय संचालक सुमीत केला, प्राचार्य डॉ. दिलीप शहा, डॉ. टी. के. नागराज, डॉ. सारिका शर्मा, डॉ. सचिन आदमाने, डॉ. एच. डी. पाटील आणि डॉ. आर. सी. पाठक या वेळी उपस्थित होते.
महोत्सवात २२ तांत्रिक स्पर्धांचा समावेश होता. त्यात दोन हजार ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक, संशोधनात्मक आणि व्यावसायिक कलागुणांना वाव मिळावा, यासाठी हा महोत्सव घेण्यात आला. या वेळी ‘डिजिटल इंडिया’ या ध्वनिफितीचे अनावरण करण्यात आले.
डॉ. खन्ना म्हणाले, ‘‘डिजिटल माध्यमांचा वापर हा फक्त करमणुकीकरिता करू नये. त्यांचा वापर संशोधनात्मक विकासासाठी केला पाहिजे. मेक इन इंडिया आणि स्टॅंड अप इंडिया या नव्या सरकारी उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक ज्ञानाचा वापर करून देशाच्या विकासासाठी हातभार लावला जावा. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन परदेशात जाण्यापेक्षा देशाच्या विकासाचा विचार करावा.’’ संजीव आणि सुमीत केला यांनी सध्याच्या काळातील डिजिटल टेक्नॉलॉजीची गरज व्यक्त केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.