वाहतूक शिस्तीसाठी "बॅक टू बेसिक्‍स' 

वाहतूक शिस्तीसाठी "बॅक टू बेसिक्‍स' 

शहरातील वाहतूक समस्येवर उपाय काय? असा प्रश्‍न सगळ्यांनाच पडतो आणि प्रत्येकाकडे त्यावरील "रामबाण उपाय' उपलब्ध आहे. सगळ्यांचे वाहन चालविण्याचे परवाने रद्द करण्यापासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अगदी पन्नास हजार रुपयांएवढा जबर दंड आकारावा ही या "रामबाण उपायां'ची व्याप्ती आहे. 

वाहतुकीच्या प्रश्‍नावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे हासुद्धा उपाय सांगितला जातो; पण त्यावर अंमलबजावणी होताना मात्र दिसत नाही. लोकप्रतिनिधींनी त्यासाठी दीर्घकालीन विचार करून आणि राजकारण बाजूला ठेवून निर्णय घेण्याची गरज आहे. 

वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी पहिली पायरी म्हणजे वाहतूक नियमांची माहिती असणे. आज परिस्थिती अशी आहे की अनेक मूलभूत नियम, निकषच वाहनचालकांना माहिती नसतात. उदाहरणार्थ लाल दिवा लागण्यापूर्वी पिवळा दिवा लागतो, त्याचा अर्थ काय असे विचारले तर बहुतांश लोकांना त्याची माहिती नसते. किंबहुना लाल दिवा लागण्याची शक्‍यता आहे पाहून वेग कमी करण्याऐवजी वेग वाढवून चौक ओलांडण्याची कसरत वाहनचालक करताना दिसतात; पण पिवळा दिवा म्हणजे तुम्ही "स्टॉपलाइन'च्या पुढे असल्यास चौक पार करणे आणि अलीकडे असल्यास वाहनाचा वेग तत्काळ कमी करून सिग्नलवर थांबायचे आहे हे कोणालाही माहिती नसते. 

कोणत्याही उपायाचा विचार केला तरी तातडीने वाहतुकीच्या प्रश्‍नावर उत्तर मिळेल, याची अजिबातच खात्री नाही. बेशिस्ती आणि सिग्नल तोडण्याचा गुन्हा करणाऱ्या वाहनचालकांची वाढलेली संख्या पाहता या "आणीबाणी'च्या परिस्थितीवर मात कशी करायची, हे कोडंच आहे. "सकाळ'ने घेतलेल्या वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणांवर प्रतिक्रिया देताना पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी योग्य पद्धतीने पालकांना आवाहन केले. प्रत्येक पालकाने त्याच्या मुला-मुलीच्या हातात वाहन देण्यापूर्वी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करावे. खरे म्हणजे मुलांच्या हातात वाहन देण्यापूर्वी पालकांनीच शंभरदा विचार केला पाहिजे. असे म्हणण्याची वेळ आली आहे कारण शालेय जीवनातील महत्त्वाचा घटक असलेल्या "रोड सेफ्टी पॅट्रोल' (आरएसपी) या शाखेकडे गेली अनेक वर्षे दुर्लक्ष झाले आहे. "एनसीसी' किंवा "स्काउट'ला जे वलय आहे ते "आरएसपी'ला नसल्याचे पाहायला मिळते. या दुर्लक्षाचा विपरित परिणाम आता आपल्याला जाणवण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे शाळा पातळीवरच "आरएसपी'कडे बघण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन सकारात्मक बनवला पाहिजे. आरएसपीच्या शाखा सक्षम केल्या तर बालवयातच वाहतूक शिस्तीचे संस्कार मुला-मुलींवर होतील आणि त्याचा चांगला परिणाम दिसू लागेल. हाताबाहेर गेलेली ही परिस्थिती सुधारण्यासाठी पुन्हा आपल्याला "बॅक टू बेसिक्‍स' जावे लागणार आहे. आज सुरवात केली तर वाहतूक शिस्तीमध्ये खऱ्या अर्थाने बदल घडण्यासाठी किमान एक किंवा दोन पिढ्या जातील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com