'महावितरण'च्या दुर्लक्षामुळे दगावताहेत कर्मचारी!

'महावितरण'च्या दुर्लक्षामुळे दगावताहेत कर्मचारी!

पुणे : लघुदाब (440 व्होल्ट) व उच्चदाब वाहिन्यांच्या (11 ते 33 केव्ही) दुरुस्तीसाठी कर्मचारी प्राधिकृत (ऑथोराईज) करण्यासाठी नियमावली असताना महावितरणकडून ती धाब्यावर बसविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे कर्मचारी प्राधिकृत करताना विद्युत निरीक्षकांकडूनदेखील कोणतीही काळजी घेतली जात नसल्यामुळे दरवर्षी अपघात घडून कर्मचारी दगावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले आहे. 

महावितरणकडून लघुदाब अथवा उच्चदाब वीज उपकरणे, तसेच भूमिगत अथवा उपरी वीजवाहिन्या यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. या कर्मचाऱ्यांना प्राधिकृत करण्यासाठी भारतीय विद्युत नियमावली तयार करण्यात आली आहे, तसेच केंद्रीय विद्युत नियमावलीदेखील आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. त्यानुसार तेच कर्मचारी त्या-त्या प्रकारच्या वाहिन्यांची देखभाल- दुरुस्ती करू शकतात. अन्य कोणत्याही कर्मचाऱ्यांना त्या वाहिन्यांवर काम करता येत नाही. या कर्मचाऱ्यांची यादी महावितरणकडून तयार केली जाते आणि ती मान्यतेसाठी दरवर्षी विद्युत निरीक्षकांकडे पाठविली जाते. त्यांनी मान्यता दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना प्राधिकृत केले जाते. 

परंतु महावितरण किंवा विद्युत निरीक्षकांकडून या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नसल्याचे समोर आले आहे. महावितरणकडून अशा प्राधिकृत कर्मचाऱ्यांची यादी तयार करताना शैक्षणिक अर्हता, कामाचा अनुभव, संबंधित काम करण्यास पात्र असल्यासाठीचे शासन अथवा शासनमान्य संस्थेचे प्रमाणपत्र, विद्युत निरीक्षक अनुज्ञापक मंडळ यांच्याकडून दिले जाणारे पर्यवेक्षक प्रमाणपत्र इत्यादी गोष्टींची खातरजमा केली जात नाही. ही यादी विद्युत निरीक्षकांच्या कार्यालयात जमा करून केवळ त्याची पोच घेतली जाते. पुढील वर्षभर यादीतील कर्मचाऱ्यांना फिल्डवर कामासाठी पाठवून कामे केली जातात. 

विद्युत निरीक्षक कार्यालयाकडूनदेखील याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. परिणामी सातवी, आठवी, नववी पास अथवा आयटीआय पास, परंतु कामाचा अत्यल्प अनुभव असलेले व कोणतेही तांत्रिक शिक्षण नसलेले कर्मचारी या कामासाठी प्राधिकृत केले जातात. त्यातून काम करताना अपघातात कर्मचारी दगावणे, चुकीच्या कामामुळे सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच, महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. 

महावितरण कंपनी होण्यापूर्वी अशा पद्धतीने वाहिन्यांवर काम करण्यासाठी कर्मचारी प्राधिकृत केले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून आयटीआयमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची या कामासाठी नियुक्ती केली जाते. त्यांना तीन ते सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतरच प्रत्यक्ष कामावर पाठविले जाते. अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून केली जाते. 
- एम. जी. शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण, पुणे विभाग 

हे कितपत योग्य? 
पंधरा दिवसांपूर्वी कोथरूड उपविभागात एका लघुदाब वाहिनीवर काम सुरू असताना दुर्घटना घडली होती. महावितरणचा 27 वर्षांचा कर्मचारी दुरुस्तीचे काम करीत असताना विजेचा धक्का बसून जागीच मरण पावला होता. हा युवक आयटीआयचा विद्यार्थी होता आणि तीन वर्षांपूर्वीच महावितरणमध्ये कामाला लागला होता.

मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी एकट्या पुणे विभागात अशाप्रकारे अपघात घडून जवळपास नव्वद ते शंभर कर्मचारी दगावतात. आयटीआयच्या विद्यार्थ्यांची या कामासाठी नेमणूक केल्यानंतर केवळ तीन ते सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना 11 हजार ते 33 हजार व्होल्टच्या वाहिन्यांवर कामासाठी पाठविले जाते, हे कितपत योग्य आहे, असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com