पुणे - 'शिवचरित्र छापण्यासाठी माझ्या मित्राच्या आत्याने मला 17 हजार रुपये दिले होते; पण आईचे दागिने ज्या मित्राकडे गहाण ठेवले, त्याने मात्र फसविले. माझ्या लेखनाच्या आवडीचे श्रेय मी माझ्या वडिलांना देईन. त्यांनीच मला, "दिलेला शब्द आणि वेळ कधीही चुकवू नकोस, अशी शिकवण दिली,'' असे सांगून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
राजहंस प्रकाशन आणि अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित "ते राजहंसी दिवस' या कार्यक्रमात सुधीर गाडगीळ यांनी पुरंदरे यांची मुलाखत घेतली, त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी विनायक पाटील, सदानंद बोरसे, दिलीप माजगावकर, रमेश व रसिका राठीवडेकर उपस्थित होते. पुरंदरे यांच्या हस्ते राजहंस ग्रंथवेध विस्तार विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
पुरंदरे म्हणाले, 'भवानीदेवीचे चित्र समोर ठेवून आणि कवड्यांची माळ गळ्यात घालून मी शिवचरित्र लिहिले. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांनी शिवचरित्राची पहिली प्रत विकत घेतली. दुसरी प्रत प्रतापगडावर जाऊन भवानीदेवीच्या समोर ठेवली. आचार्य अत्रे यांनी माझ्यावर अग्रलेख लिहिला होता, त्यामुळे शिवचरित्राची पहिली आवृत्ती हातोहात खपली. मात्र, शिवचरित्र छापण्यासाठी मला पैसे जमवावे लागले, त्यासाठी मी भायखळा येथे जाऊन कोथिंबीर विकत असे.''
सिर सलामत तो पगडी पचास
पुणेरी पगडीवर सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. हा धागा पकडून गाडगीळ यांनी पुरंदरे यांना विचारले, की सध्या पगडीबद्दल चर्चा चालू आहे, त्याबद्दल तुमचे मत काय? यावर पुरंदरे यांनी मिस्कीलपणे उत्तर दिले, सिर सलामत तो पगडी पचास. बाबासाहेबांच्या या उत्तराने उपस्थितांनी हास्यविनोदात उत्स्फूर्त दाद दिली.
|