येरवडा - आव्हाळवाडी येथील घराच्या भूमिपूजनानंतर पेढे आणि सामोसे खाल्यामुळे यशवंतनगर येथील एकाच कुटुंबातील दहा जणांना विषबाधा झाली. शनिवारी सायंकाळी जुलाब व उलट्या झाल्यानंतर त्यांना येरवड्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. विषबाधा झालेल्या अन्नाचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाला पाठविल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आव्हाळवाडी येथे दसऱ्यानिमित्त मधुकर आरणे यांच्या घराचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर अल्पोपाहार म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी सामोसे आणि पेढे खाले. त्यामुळे त्यांना जुलाब व उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे ज्योती मधुकर आरणे ( वय 25), सुनंदा सुदाम आरणे (वय 26), सुधाकर साहेबराव आरणे (वय 30), मच्छिंद्र साहेबराव आरणे (वय 50), भार्गव मधुकर आरणे (वय 7), श्रुती सुधाकर आरणे (वय 7), दीपाली जाधव (वय 16, सर्व रा. यशवंतनगर) नवनाथ सारू आरणे (वय 45, रा. रामवाडी), दीपक मच्छिंद्र आरणे (वय 23, रा. कोरेगाव पार्क), विश्वजित बापू शिरोळे (वय 25, रा. चंदननगर) यांना येरवड्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले.
मधुकर आरणे यांनी विमाननगर येथील एका मिठाईच्या दुकानातून सामोसे व पेढे नेले होते. घटना आव्हाळवाडी येथे घडली, तर आरणे कुटुंब येरवड्यात राहणारे असल्यामुळे त्यामुळे विषबाधेची तक्रार घेण्यासाठी येरवडा, विमानतळ आणि लोणीकंद पोलिसांनी हद्दीचे कारण दिल्याने तक्रार दाखल करण्यात विलंब लावला. त्यामुळे अद्याप तक्रार दाखल झाली नसल्याचे समजते. |
|