मनातील भाव (परिमळ)

मनातील भाव (परिमळ)

कारखान्यातील "सामाजिक बांधिलकी' विभागातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची जबाबदारी व्यवस्थापकांनी राजेश व आयप्पा या अधिकाऱ्यांकडे दिली. राजेश हाताखालील लोकांना कामे सांगून उपक्रम राबविल्यानंतर त्याची प्रसिद्धी करायचा, वरिष्ठांपर्यंत त्याच्या बातम्या पाठवायचा. आयप्पा मात्र हाताखालील लोकांबरोबर काम करत प्रसिद्धीपासून दूर राही.

वर्षानंतर स्वतःची इमेज घडविण्यासाठी चोहोबाजूंनी प्रयत्न करणाऱ्या राजेशला बढती न मिळता आयप्पाला बढती मिळाली. राजेशच्या वाट्याला यश का नाही आले? एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन जादूगार जादूचे प्रयोग करायचे. एक खूप प्रसिद्ध झाला व त्याने भरपूर पैसे कमावले. दुसऱ्याला फक्त पगारावर राहावे लागले. कारण जो प्रसिद्ध झाला तो मनात "आज मी लोकांना खूप संतुष्ट करणार आहे, त्यांचे खूप मनोरंजन करणार आहे', असा भाव ठेवून प्रयोग करायचा, तर दुसरा "आज मी जादूच्या प्रयोगात प्रेक्षकांना फसवणार आहे,' असा मनात भाव ठेवायचा. मनातील भाव हा कर्माचे फळ देत असतो. मनातील हेतूचे भावनेत रूपांतर होते. कला-साहित्य, संगीत, परमार्थ अशा आनंद मार्गात मनातील प्रसन्न भावामुळे भावनिक आजार टळतात. भगवान गौतम बुद्धांनी मनातील चार भावनांचा उल्लेख केला होता. मैत्री, मुदीता, करुणा, उपेक्षा या त्या भावना होत. आचार्य रजनीश त्यांना "भगवंताची पाऊलवाट' म्हणत. ज्ञानदेवांनी पसायदानात "मैत्र जीवाचे' हा आदर्श मानला आहे.

महात्मा गांधी दिनचर्येचा प्रारंभ लोककल्याणाच्या प्रार्थनेने करत व याच लोककल्याणाच्या भावनेने तिला पूर्णविराम देत. गांधीजींच्या वाट्याला राजकीय विरोध व मतभेद अनेक वेळा आले. पण गांधीजींनी कधीही खेद व्यक्त केला नाही. कारण त्यांना माहीत होते - the prayer of a pure heart never goes unanswered. निर्मळ भावनेने केलेली प्रार्थना वाया जात नाही. तिचे फळ चांगलेच मिळते.
गाडगेबाबांचे एक भक्त बाबांच्या सभांचा, व्याख्यानांचा छापून आलेला वृत्तांत एकत्रित जमा करत असत. अनेक वर्षांचे हे बाड एकदा त्यांनी बाबांसमोर ठेवले. त्यांना वाटले बाबा शाबासकी देतील. पण चिंध्या पांघरणाऱ्या अन्‌ खापरात भाकर खाणाऱ्या बाबांनी ते बाड उचलून हसत हसत शेकोटीत फेकून दिले. आपल्या हातांनी त्यांनी आपल्या गौरवाची राखरांगोळी केली. पण खरेच झाली का राखरांगोळी त्या गौरवाची? गाडगेमहाराज जाऊन कित्येक वर्षे झाली. तरीही त्यांच्या नावाचा जयजयकार चालूच आहे. कारण लोककल्याणाच्या महान भावनेने, हेतूने या संताचे मन, अंतःकरण नेहमी भरलेले असायचे. जग जिंकणारे सिकंदर, नेपोलियन काळाच्या ओघात पडद्याआड गेले. पण लोककल्याणाच्या भावनेने संपूर्ण आयुष्य वेचणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी आजही अमर आहेत. म्हणून कुठलेही कार्य करताना मनातील भाव तपासत राहा. हेतूवरच कार्यसिद्धी अवलंबून असते.

मनाच्या भावातून शारीरिक कर्म घडत असते. म्हणतात ना..
जगी जीवनाचे सार - घ्यावे जाणोनी सत्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे - फळ देतो रे ईश्‍वर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com