अर्थभान

Pahatpawla-Dipti-Gangawane
Pahatpawla-Dipti-Gangawane

आपल्या भाषेतले कित्येक शब्द खूप अर्थसमृद्ध असतात, म्हणजे एकाच शब्दाला अनेक अर्थ असतात आणि त्यांचा अर्थाअर्थी संबंध असतोच असे नाही. हे शब्द कुठल्या वाक्‍यात, कुठल्या प्रसंगी वापरले गेले आहेत, याच्या संदर्भात त्यांचा त्या-त्या वेळचा अर्थ काय हे ठरवावे लागते. उदाहरणार्थ "अर्थ'हाच शब्द बघा. वरील वाक्‍यांमध्ये या शब्दाचा अर्थ "शब्दाने जे सूचित होते ते' असा होतो, पण तोच शब्द "उदाहरणार्थ' (उदाहरण + अर्थ) या शब्दांचा भाग म्हणून पुढे येतो, तेव्हा त्याचा अर्थ "...साठी' असा होतो. "उदाहरणार्थ' म्हणजे "उदाहरणासाठी' किंवा "उदाहरणादाखल.' "अर्थशास्त्र' किंवा "अर्थप्राप्ती' या शब्दांत तो पैसा किंवा धन याकडे निर्देश करतो. एखाद्याला जाब विचारताना "तू जे केलेस त्याचा अर्थ काय?' असे विचारताना आपला रोख त्या कृतीमागचा हेतू किंवा प्रेरणा यांकडे असतो. आपण सामाजिक घटनांचा अर्थ तर लावतच असतो; पण नैसर्गिकरीत्या घडणाऱ्या घटनांमधेही "अर्थ' शोधण्याची माणसाची प्रवृत्ती असते. एवढेच नव्हे तर माणूस आपल्या जीवनाचा अर्थ जाणण्याची धडपड करतो आणि सगळ्या अस्तित्वाचाच अर्थ शोधण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतो. माणसाला असणारी अर्थाची ओढ अशी सर्वव्यापी आहे, त्याचबरोबर सर्व सजीवांमधली माणसांची वैशिष्ट्यपूर्णता अधोरेखित करणारी आहे. अर्थ शोधणे, अर्थ लावणे, अर्थ अभिव्यक्त करणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अर्थ निर्माण करणे, ही निखळपणे मनुषयत्वाची लक्षणे आहेत. 
ध्वनींना किंवा कागदावर उमटणाऱ्या आकृत्त्यांना माणूस अर्थ बहाल करतो. तेव्हा त्यांना "शब्द' म्हटले जाते. माणसाच्या इच्छा, प्रेरणा, भावना, उद्दिष्टे इत्यादी त्यांच्या कृत्यांना अर्थ देतात. सामाजिक घटना त्याच्या अर्थपूर्ण कृतींमधूनच आकाराला येतात, आणि त्याच्या भोवतालचे सामाजिक वास्तव घडवतात. नैसर्गिक जगात निसर्गनियमांनुसार घटना घडत असतात. भौतिक विश्‍वात भरून राहिलेले जड द्रव्य या नियमांनुसार वेगवेगळी रूपे धारण करत असते. माणसाच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या या घटनांनाही माणूस स्वतःच्या संदर्भात अर्थ देतो. भूगर्भातील हालचालींमुळे भूकंप होणे ही नैसर्गिक घटना माणसाच्या जगाच्या संदर्भात "विनाशकारी' ठरते. जलबिंदू आणि सूर्यकिरण यांच्या संयोगाने उमटणारे इंद्रधनुष्य कवीमनाला "गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा' असे भासते. अर्थ त्या-त्या घटनांमध्ये मुळात असत नाही, तो माणसाने स्वतःच्या दृष्टिकोनातून त्या घटनांकडे बघून निर्माण केलेला असतो. खरे तर माणसाच्या कृतीप्रमाणेच निसर्गातील घटनाही हेतूपूर्व असतात. अशी आपली समजूत असणे आणि त्यामुळे निसर्गक्रमामागेही काही उद्दिष्टे आहेत, असे आपण मानतो. भौतिक विश्‍वातील घडामोडींचा अर्थ शोधण्याचा माणसाचा खटाटोप हा त्या समजुतीचता परिपाक आहे. 
एका अर्थी माणूस अर्थाच उद्‌गाता, निर्माता आहे. भविष्यात कधी विश्‍वात जर माणसाची नामोनिशाणी उरली नाही, तर तेव्हा अर्थही नामशेष झालेला असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com