विचारांचे सामर्थ्य (परिमळ)

विचारांचे सामर्थ्य (परिमळ)

नीता अजितला घेऊन आली होती. अलीकडे अजित फारच उदास, बेचैन व निराश असतो, असे तिने सांगितले. नीताला बाहेर बसायला सांगितले व अजितला बोलते केले. बोलताना अजितच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तो म्हणाला, ‘‘सर, दोन महिन्यांपूर्वी आईची व माझी नीताच्या वागण्यावरून नीता घरी नसताना भांडणे झाली. तेव्हा आईने आमच्यावर केलेल्या आरोपांमुळे मी रागाच्या भरात तिच्यावर हात उगारला व धक्काबुक्की केली. ‘आईसारखे जगात दुसरे दैवत नाही’, असे बऱ्याचदा वाचले होते. त्यामुळे राग शांत झाल्यावर मला माझी चूक समजली व पश्‍चातापाने माझ्या मनाला घेरले. तेव्हापासून रात्री झोप येत नाही व नैराश्‍य आले आहे. ही गोष्ट मी कोणाला सांगूही शकत नाही.’’ अजित शांत झाल्यानंतर त्याला म्हणालो, ‘‘ राग आवरता न आल्यामुळे तुझ्याकडून हे कृत्य घडलं आहे. ज्याला आनंदानं जगायचं आहे त्याने पूर्वताप किंवा पश्‍चाताप न करता चूक झाली, की समोरच्या माणसाची माफी मागून ती परत न करण्याचा संकल्प करावा.’’

आपले सर्व आयुष्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. नकारात्मक विचारांनी मन उदास होते. उदास मनाने शरीर शिथिल पडते व नैराश्‍य येते. जेव्हा मनात नकारात्मक विचार येऊन एखाद्या घटनेविषयी भय जागृत होते, तेव्हा आयुष्यात यापेक्षाही वाईट घटना घडू शकली असती, असा विचार करून मन स्थिर करणे आवश्‍यक असते. आपल्याजवळ एखाद्या गोष्टीचा अभाव आहे, या विचाराने मन त्रस्त होते, तेव्हा आपल्यापेक्षा जास्त कमतरता असलेल्या लोकांचा विचार केला, की आपल्या विचारांचा प्रवाह सकारात्मकतेकडे सुरू होतो. खूप प्रयत्न करूनही अपयश आल्यानंतर निराश न होता त्यापेक्षा आणखी काही चांगले यश मिळणार असेल म्हणून हा एक विश्राम आहे, असा विचार करा. काही वेळेस मोठी झेप घेण्यासाठी दोन पावले मागे यावे लागते. चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन निवेदकाच्या परीक्षेत नापास झाले. जो आवाज त्या वेळी निवेदक बनण्याच्या लायकीचा मानला गेला नाही, तोच आवाज चित्रपटसृष्टीत श्रेष्ठ ठरला. त्यामुळे अपयश आले, तरी नकारात्मक विचार न करता, खचून न जाता, सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांनी युक्त असे मन जीवनात दुःख आणते. हाच विचार सकारात्मक केला, तर दुःखमुक्तीच्या रस्त्यावर आपली वाटचाल सुरू होते. आपण आपल्या मनाला कसे घडवायचे हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

आपल्या मनातील आवाज ही एक आकाशवाणीच असते. या आकाशवाणीला सकारात्मक विचारांची जोड देऊन आनंदाने जीवन जगा. जीवनाची ऊर्ध्वगती किंवा अधोगती करण्याची ताकद ही आपल्या विचारांवरच अवलंबून असते. जसा विचार कराल, तसेच तुम्ही व्हाल. तेव्हा नेहमी सकारात्मक विचार करा. सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे बोधवचन आपल्या जीवनात उतरवण्यासाठी सकारात्मक विचारांना सकारात्मक कृतींची जोड द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com