हौस ऑफ बांबू : उष्णतेची लाट आणि मराठी साहित्य!

नअस्कार! येत्या एप्रिलात उदगीरला जायचं या कल्पनेनं आत्ताच घाम फुटला आहे. मार्च महिन्यात ही अवस्था तर एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात उदगीरला कसा निभाव लागणार?
Hous of Bamboo
Hous of BambooSakal
Summary

नअस्कार! येत्या एप्रिलात उदगीरला जायचं या कल्पनेनं आत्ताच घाम फुटला आहे. मार्च महिन्यात ही अवस्था तर एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात उदगीरला कसा निभाव लागणार?

नअस्कार! येत्या एप्रिलात उदगीरला जायचं या कल्पनेनं आत्ताच घाम फुटला आहे. मार्च महिन्यात ही अवस्था तर एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात उदगीरला कसा निभाव लागणार? आधीच एका वर्षात दोन-दोन साहित्य संमेलनं होताहेत. गेल्या डिसेंबरात आडगावला (नाशिकजवळ) झालेल्या साहित्य संमेलनात स्वेटर, कानटोपी आदी सामग्रीनिशी सारस्वत मांडवात हिंडत होते. पण आता ‘उदगीरच्या उन्हाळ्यात आम्ही काय गंजिफ्राकावर हिंडायचे का?’ असा जळजळीत सवाल एका लेखकाने परवा मला भर पुण्यातल्या फर्गसन रस्त्यावर उभं राहून केला, तेव्हा मात्र मी अंतर्मुख झाल्ये.

मराठी साहित्य संमेलनं साधेपणानं व्हावीत असा एक विचार हल्ली पुढे येताना दिसतो आहे. मध्यंतरी आमच्या कौतिक्राव ठाले-पाटलांनी ‘नाशिकचे संमेलन भुजबळांचे झाले’ अशा शब्दात तेथील भपकेबाजीला ठोकून काढलं होतं. शान-ओ-शौकत आणि आतिषबाजीत साहित्य महामंडळाच्या उद्दिष्टांना हरताळ फासला जातो, हे त्यांचं दु:ख. हे दु:ख त्यांनी उदगीरच्या अकौंटमध्ये ट्रान्सफर केलं, हे मात्र बरं केलं नाही. उदगीरच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मराठी भाषेचे प्रांताधिकारी आणि आमचे बॉस भारत सासणेसाहेब यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनीही मध्यंतरी कल्याणला झालेल्या एका सत्कार समारंभात संमेलनं साधेपणानं व्हावीत असा विचार मांडला. मी सर्दच झाल्ये.

गेल्या रविवारची गोष्ट. कल्याणला गेले होत्ये. टिळक चौकातून शिवाजी चौकाकडे येताना मध्येच वझ्यांचा जगप्रसिध्द ‘खिडकीवडा’ लागला. (ज्यानं हा वडा खाल्ला नाही, त्याला कविताच कळली नाही, असं आम्ही म्हणू!) म्हटलं तीन-चार वडे आधीच खाऊन कार्यक्रमाला जाऊ! (परिणामी) सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यक्रमाला पोचेपर्यंत हायहुस्स करत घामाने निथळल्ये होत्ये. बरं, कार्यक्रमात साधं पाणीही मिळालं नाही. तिथं सासणेसाहेब आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ कासम शेख यांचा संयुक्त सत्कार होता. त्यात व्यासपीठावरुन सासणेसाहेब संमेलनाच्या साधेपणाबद्दल बोलत राहिले. (बोलता बोलता ते सतत कासमभाईंकडे संशयाने बघत होते...असो.) मराठी संमेलनं साधीच असावीत, तिथं सरस्वतीची आराधना व्हावी, असं सासणेसाहेबांचं म्हणणं. कार्यक्रमानंतर त्यांना गाठून मी म्हटलं, ‘‘असं काय करता साहेब? सुंदर सुंदर मराठी लेखिका उन्हानं काळवंडाव्या, असं वाटतं का तुम्हाला?’’

त्यांनी वेगळीच थिअरी मांडली. ते म्हणाले, ‘‘समुद्र मंथनात लक्ष्मी प्रकट झाली, तेव्हा सरस्वती तिच्या स्वागताला उभी होती, असं पुराणात स्पष्टपणे म्हटलं आहे. याचा अर्थ सरस्वती लक्ष्मीला सीनियर असल्यामुळे ज्येष्ठतेनुसार तिलाच मान मिळायला हवा. प्रोटोकॉल नावाची काही गोष्ट आहे की नाही?’’

सासणेसाहेबांमधले नोकरशाहीतील संस्कार सळसळल्याची जाणीव होऊन मी सरळ तिथून निघाल्ये. एकंदरित ही साधेपणाची चर्चा मराठी लेखकांच्या मुळावर येणार अशी चिन्हं आहेत. उदगीरच्या उन्हात मराठी साहित्याला उष्माघाताचा त्रास न होवो यासाठी वाळ्याचे पडदे लावावे लागतील. वाळा काही स्वस्त येत नाही. तेव्हा साहित्यव्यवहारातलं हे साधेपणाचं कलम तूर्त स्थगित करावं, अशी लेखक मंडळींमधली सार्वत्रिक भावना आहे.

तिथले परिसंवाद, चर्चा, वाद-विवाद, भाषणं किमान कूलर लावून पार पाडावीत आणि मराठीच्या घरातलं आधीच तापलेलं वातावरण अधिक तापू नये यासाठी झटावं. मी म्हणत्ये, होऊ दे खर्च! शेवटी सगळं माय मराठीसाठीच चाललं आहे ना? तेवढ्यात कळलं की उदगीर संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे यांची आँलरेडी निवड झाली आहे. साहित्याच्या दरबारात राजकारण येतं ते वाळ्याचे पडदे घेऊनच!! आता मी निर्धास्त आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com