हौस ऑफ बांबू : बालगंधर्व आणि टँकर…!

नअस्कार! बालगंधर्व रंगमंदिरातलं पाण्याचं टाकं आधीच भरुन घेतलेलं आहे, रसिकांनी काळजी करु नये! बालगंधर्वात पाणी नाही, म्हणून काही लोकांच्या तोंडचं पाणी पळालं होतं.
Hous of Bamboo
Hous of BambooSakal
Summary

नअस्कार! बालगंधर्व रंगमंदिरातलं पाण्याचं टाकं आधीच भरुन घेतलेलं आहे, रसिकांनी काळजी करु नये! बालगंधर्वात पाणी नाही, म्हणून काही लोकांच्या तोंडचं पाणी पळालं होतं.

नअस्कार! बालगंधर्व रंगमंदिरातलं पाण्याचं टाकं आधीच भरुन घेतलेलं आहे, रसिकांनी काळजी करु नये! बालगंधर्वात पाणी नाही, म्हणून काही लोकांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. पण इतकी काही वाईट परिस्थिती नाही, हे आधीच सांगून ठेवते. मी कालच तिथं जाऊन आल्ये! तिथं म्हंजे बालगंधर्वात. सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन असे चार टँकर रोज रंगमंदिराच्या आवारात येतात, पाणी भरुन जातात, हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं आहे. मराठी नाट्यसृष्टीला तूर्त एवढं पाणी पुरेसं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे…

मागल्या आठवड्यात बालगंधर्वात दोन भलतेच प्रयोग रंगले. (प्रयोग भलतेच रंगले असं नव्हे!) ‘बालगंधर्वा’ची आहे ती इमारत पाडून त्याजागी मल्टिप्लेक्स नाट्यगृह उभं करण्याचा सरकार दरबारी कट शिजत आहे, त्याच्याविरोधात काही रंगमंदिरवाद्यांनी धरणे आंदोलनाचं मुक्त नाट्य रंगवलं. त्यानंतर तिथं झालेल्या भाजपवाल्यांच्या सभेत राष्ट्रवादी कार्यकर्त्या घुसल्या, तेव्हा चक्क फायटिंग झाली. हे दोन्ही खेळ फ्री पासात होते, हे मागाहून रसिकांच्या लक्षात आलं. आधीच अनाऊन्स केलं असतं तर दोन्ही प्रयोग हौसफुल्ल केले असते, असं काही असंतुष्ट पुणेकर हळहळून म्हणाले. असल्याच मारामाऱ्या करायच्या असतील तर हवंय कशाला ते हजार खुर्च्यांचं नवं रंगमंदिर? असा खडा सवाल काहींनी केला. आता बालगंधर्वात पाणी नाही, म्हणून रिकाम्या घागरी फुंकायला काही राजकीय पक्षाचे लोक जाणार आहेत असंकळलं. एकंदरित बालगंधर्वातलं पळालेलं पाणी हा पुण्यातला एक ज्वलंत विषय झाला आहे. असो.

बालगंधर्वा’त पाणी नाही? मग तिथं आहे तरी काय? दोघातिघा रसिकांना विचारलं तर ते म्हणाले, आम्ही बुवा आमची (पाण्याची) बाटली घेऊन जातो. तुम्हीही (तुमची) नेलेली बरी!! बालगंधर्व रंगमंदिराचं पाणी असं अचानक का तोडलं असेल? याबद्दल पुणेकरांमध्येच विविध मतप्रवाह आहेत. (पाणी नाही, पण प्रवाह चिक्कार!) काही जणांच्या मते ‘बालगंधर्व’ला महापालिकेनं स्वतंत्र नळजोड दिला होता, पण मेट्रोवाल्यांनी आणि पोलिसांनी त्यालाच आपले नळ जोडून मधल्यामध्ये पाणी ओढल्यानं इथं प्रेशर कमी झालं. काहींच्या मते ‘बालगंधर्व’ला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन आता जीर्ण झाली आहे. परिणामी, मुळात पाणी कमी दाबानंच सोडावं लागतं. जास्त दाबानं पाणी सोडलं तर पाइपलाइन फुटेल, आणि ‘बालगंधर्व’ला मिळतंय तेही पाणी मिळणार नाही. चारच्या जागी सहा-आठ टँकर पुरवावे लागतील!

पाण्याच्या शोधात ‘बालगंधर्व’च्या आवारात हिंडत होते, तेवढ्यात समोरुन सुप्रसिध्द (आणि पाणीदार) नाट्यदिग्दर्शक मित्रवर्य चंदू कुलकर्णी येताना दिसले. ते कायम नव्या स्क्रिप्टच्या शोधात असल्यागत वावरतात. पण तेही पाणीच शोधत होते. चंदू कुलकर्णी यांच्या नाटकांचा महोत्सव पुण्यात सुरु झालाय. बालगंधर्व, टिळक स्मारक, वगैरे ठिकाणी हे प्रयोग होतील. परवाच त्यांनी सचिन खेडेकरसोबत ‘मौनराग’चा प्रयोग (पाण्याशिवाय) सुंदर रंगवला. चंदु कुलकर्णी यांच्या अभिवाचनाच्या वेळी पुढ्यात ठेवलेलं गडवा भांडं रिकामं होतं, हे माझ्या नजरेतून सुटलं नाही. त्यांच्या नाट्यमहोत्सवाच्या शुभारंभी सतीश आळेकर सांगत होते की, व्यावसायिक रंगभूमी आणि समांतर रंगभूमी यांच्यातली गॅप चंदू कुलकर्णीनं भरुन काढली! त्यामुळे मराठी नाट्यसृष्टीला होऊ पाहणारा ‘स्पाँडिलिसिस’ टाळता आला…

‘मौनराग’चा प्रयोग संपल्यावर मी चंदू कुलकर्णींकडे पाणी मागायला गेले. तर त्यांनी ‘नाटक हे मेडिटेशन कसं असतं, हेच सांगायला सुरवात केली. मी डोळे मिटून ऐकून घेतलं. त्यांना बघितल्यावर मात्र ध्यानात आलं की, ‘बालगंधर्व’ हीच बारमाही पाण्यानं भरलेली विहीर आहे. तिला कशाला हवेत टँकर?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com