विराटची साद

विराटची साद

इंग्लंडमधील पहिल्या दोन कसोटी सामन्यांत विराट कोहली आणि कंपनीचा केवळ पराभव झाला नाही तर मानसिक खच्चीकरणही झाले आणि त्याची झळ आता सर्वच खेळाडूंसह प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही बसू लागली आहे. प्रामुख्याने रवी शास्त्री यांनी मोठ-मोठी वक्तव्ये करून साहेबांच्या देशात पाय ठेवला होता. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असल्यामुळे भारतीय संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तेवढाच सक्षम होता. प्रत्यक्षात मात्र दोन कसोटींतील फलंदाजांची शरणागती पाहता हा फुसका बारच ठरला. खेळ म्हटला की हार-जित असतेच; पण पराभवातही ताठ मानेने केलेला खेळ पुढच्या लढाईसाठी स्फूर्ती देत असतो. येथे मात्र चित्र वेगळेच आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस्‌वर तब्बल डावाने झालेला पराभव परदेशात स्विंग गोलंदाजीसमोर खेळण्याची असलेली क्षमता यावर शंका उपस्थित करणारा आहे. अशा मानहानीकारक पराभवानंतर अर्थातच माजी खेळाडूंनी टीकेची झोड उठवली; पण आतापर्यंत डोक्‍यावर घेणारे मायबाप प्रेक्षकही जेव्हा नाराजीचा सूर लावू लागले तेव्हा विराट कोहलीची झोप उडाली. आमच्यावर विश्‍वास ठेवा... तुमच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी साद त्याने घालत प्रेक्षकांसह स्वतःला आणि संघालाही धीर देण्याचा प्रयत्न केला; मात्र येथून पुढे ही लढाई अधिक तीव्र होणार आहे. मुळात मालिका जिंकायची असेल तर उर्वरित तिन्ही कसोटी सामने जिंकणे अनिवार्य आहे. इतक्‍या खोल गटांगळ्या खाल्ल्यानंतर फिनिक्‍स भरारी घेण्याची भले क्षमता असेल; पण ती सिद्ध करण्याची ताकद आणि मानसिकता महत्त्वाची आहे. या दोन पराभवांमुळे फलंदाजांच्या तंत्रावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे, त्यात सरावाने सुधारणा करता येईल; पण मानसिकतेचे काय? प्रत्येक फलंदाज जर ड्रेसिंग रूममधूनच बाद होऊन येत असेल तर विराटच काय, कोणीच सावरू शकणार नाही.

भारतीय संघाच्या या अपयशास अनेक कारणे अंतर्भूत आहेत. प्रमुख गोलंदाजांच्या दुखापती, संघ निवडीतील चुका आणि नाणेफेकीचा कौल अशी काही कारणे असली तरी आम्ही खेळपट्टी नव्हे तर प्रतिस्पर्ध्यांच्या क्षमतेनुसार खेळतो, असे वक्तव्य रवी शास्त्री यांनी केले होते; पण येथे प्रतिस्पर्ध्यांची नव्हे आपल्याच संघाची क्षमता पणास लागली आहे. याची जाणीव शास्त्री यांना झाली असेल. अनिल कुंबळे यांच्याकडून प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या शास्त्री आणि कर्णधार कोहली या जोडीने आतापर्यंत मिळवलेल्या यशाला इंग्लंडमध्ये मालिका गमावल्यास काळा डाग लागेल, हेही तेवढेच सत्य आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com