खिलाफत ते रोहिंग्या: मुस्लिम समाजच कायम आरोपी का?  

indian muslims
indian muslims

रोहिंग्या मुस्लिमांच्या समर्थनार्थ भारतात काही ठिकाणी मोर्चे निघू लागले आहेत तर काही मुस्लिम नेत्यांकडून राष्ट्रहिताचा विचार न करता रोहिंग्या साठी काही मागण्या देखिल केल्या जाऊ लागल्या आहेत. हे सगळं पाहिल्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी कैक वर्षांपूर्वी आपल्या "Thoughts on pakistan" या पुस्तकातील काही ओळी आठवल्या ते म्हणतात 

"The Islamic injunction to Muslims not to take the side of non-Muslims in any strife is the basis of pan-Islamism. It is this which leads Muslims in India to say that he is Muslim first and an Indian afterwards. It is this sentiment that explains why the Indian Muslim has taken so small a part in the advancement of India but has exhausted himself by taking up the cause of Muslim countries. And why Muslim countries occupy the first place and India the second place in their minds. Savarkar’s principle of one man one vote would mean a democratic, Hindu majority state. It would not be a Muslim state and hence Islam prohibits the Muslims from living in it. Islam can never allow a true Muslim to adopt India as his motherland." 

सरफरोश नावाच्या कैक वर्षांपूर्वी आलेल्या चित्रपटात एसीपी अजय राठोड नावाचं पात्र एका प्रसंगात "मेरे मुल्क को बचाने के लिए मुझे किसी सलीम की जरूरत नही है " असा धारदार डायलॉग त्यातील सलीमच्या तोंडावर फेकून मारतं. या बाॅलिवूड चित्रपटात या निमित्ताने हिंदू मुस्लिमांमधील अविश्वासाच्या नेहमीच्या प्रश्नाला थेट हात घातला गेला होता.

'वंदेमातरम' म्हणण्याची सक्ती असो, राष्ट्रगीताला उभे न राहण्यासारख्या घटनांची बातमी असो, गो मांसावरून घडलेली हिंसक घटना असो किंवा अगदी एखाद्या इमारतीमध्ये मुस्लिम आहे म्हणून सदनिका नाकारण्याची घटना असो; पुरोगामी आणि मुस्लिम समाजाकडून नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे "मुस्लिम समाजच आरोपी का?"

प्रश्न अत्यंत योग्य आहे परंतु या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्याला इतिहास व वर्तमानकाळातील कैक घटना आणि पार्श्वभूमींचा विचार करावा लागणार आहे. त्यासाठी सर्वात आधी असा वाद आणि संशय मुस्लिमेतर समाजाच्या मनात मुस्लिमांबद्दल आहे हे मान्य करू. कारण समस्येला सोडवण्याची पायरी म्हणजे समस्येला ओळखून तिला नाव देणे आणि मग तिच्यावरील उपायांचे नियोजन करणे.

मुस्लिमांच्या मानसिकतेवर वि.दा.सावरकर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ते अगदी अलीकडे शेषराव मोरे यांच्यापर्यंत अनेक विचारवंतांनी विपूल व सडेतोड लेखन केले आहे. त्यातून बर्‍याच गोष्टींचा उहापोह केला आहे. ते सर्व लेखन अधिक जिज्ञासुंनी मुळातूनच वाचणे (विशेषतः मुस्लिमांनी) अत्यंत गरजेचे आहे. 

भारतीय उपखंडातील मुस्लिमांमध्ये फार पूर्वी पासून पॅन इस्लाम नावाच्या भूताने मनात ठाण मांडलेले आहे. "सर्व जगातील मुस्लीम धर्मीय एक असून, त्यांचे एकमेकांशी नाते आहे" अशी ती सर्वसाधारण ढोबळ कल्पना आहे.( वेळोवेळी पॅलेस्टाईन किंवा रोहिंग्यांसाठी प्रेमाचा उमाळा फुटतो तो याच संकल्पनेतुन ) 

इतिहासात या पॅन इस्लामच्या संकल्पनेला चुड लावत जेव्हा 'अता उल तुर्क' याने तुर्कस्तान मधून इस्लामचे सर्वोच्च धर्मगुरू म्हणजे 'खलीफा' चे पद खालसा केले, तेव्हा तत्कालीन भारतीय मुस्लिमांनी खलीफाच्या समर्थनार्थ भारतात खिलाफत चळवळ सुरू केली. या परकीय देशांतील घटनांवरून इथे भारतातील केरळात मोपल्यांच्या बंडात झालेल्या हिंदूच्या कत्तलींनी त्या वेळेपर्यंत 'हिंदू मुस्लिम भाई भाई' म्हणत ब्रिटीशांशी हिंदी राष्ट्रासाठी एकत्र लढणाऱ्या बर्‍याच हिंदू नेत्यांचे डोळे उघडले. त्यात लाला लजपतराय, लाला हरद्याल, वि. दा. सावरकर अशा कित्येक नेत्यांचा समावेश होता. त्या वेळपर्यंत कट्टर काँग्रेसी असलेल्या डॉ. हेडगेवारांनी आपली वेगळी चुल मांडत हिंदू हिताचे ध्येय ठेवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली केली. 

यानंतर या खिलाफत चळवळीतूनच रूजलेल्या बिजाची परिणीती म्हणून पुढे भारताची फाळणी घडून पाकिस्तानचा जन्म झाला. मुस्लिम आणि हिंदू हि दोन राष्ट्रं आहेत हे अधोरेखित करणारी हि ठळक घटना होती.

स्वतःच्या वेगळेपणाचे भुत त्यानंतरही मुस्लिम समाजाच्या मानगुटी वरुन उतरले आहे का ? तर अजिबात नाही. याला पहिला चुड लावला गेला तो स्वातंत्र्य मिळाल्यावर मुस्लिम समाजासाठी वेगळ्या कायद्यांची मागणी करून. 

घटना समितीच्या सदस्यांसमोर या आधुनिक भारताची घटना बनवण्याचे आव्हान जेव्हा समोर उभे राहिले तेव्हा त्यांच्या पुढे जगातील लोकशाही देशांतील राज्यघटना आदर्श म्हणून होत्या. त्या राज्यघटना धर्मांवर आधारित नाहीत त्यामुळे त्या धर्मविरहित एकसंध समाज निर्माणाचा पाया रचणाऱ्या आहेत हे बाबासाहेब आंबेडकरांनी मनोमन ओळखले होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती करताना या सगळ्या बाबींची काटेकोर काळजी घेतली होती. 

परंतु मुसलमानांचे वेगळेपण टिकावे म्हणुन मुस्लिम धर्माधारित कायद्यांचा हट्ट तत्कालीन मुस्लिम नेत्यांनी धरला. यात मौलाना आझादांसहीत सर्व तथाकथित सेक्युलर समजले जाणारे नेते सामील होते. तिथून हिंदू आणि मुस्लीमांमध्ये जे वेगळेपण सुरु झाले ते आजपर्यंत. या वेगळेपणाचाच परिपाक म्हणजे शहाबानो प्रकरण. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला फेटाळून लावत मुस्लिमांना खूश करणारी हि घटना या देशातील बहुसंख्य हिंदुच्या मनात रोष निर्माण करणारी होती. ( पण या कायद्यांमुळे एकाच वेळी स्वतंत्र झालेल्या व एकेकाळी अंधारात ढकललेल्या हिंदू आणि मुस्लिम समाजातील महिलांच्या आजच्या स्थितीमधील फरक सर्वांच्या समोर आहे.) 

ज्या अलगाववादी मानसिकतेतून पॅन इस्लामची स्वप्नं आपल्याला पडतात ते किती भोंगळ आहे हे मुस्लिमांनी सर्वप्रथम समजून घेण्याची आवश्यकता आहे. भारतीय मुस्लिमांच्या मनात इस्लामची जन्मभुमी असल्यामुळे soft corner मिळालेला सौदीअरेबीया आपल्याला पिढ्यांनपिढ्या रहिवास करुन देखिल बेटी व्यवहार तर सोडा पण एक इंच जमीन खरेदी करण्याची परवानगी देतो काय हे कधी आपण आपल्या मनाला विचारले काय ? मुस्लिमांसाठी निर्माण केलेल्या पाकिस्तानात हिंदू तर सोडा पण शिया, अहमदी, हाजरा मुस्लिम तरी सुरक्षित आहेत काय ? पाकिस्तानच्या पंजाबी मुसलमानांनी तीस लाख बंगाली मुसलमानांची कत्तल केली तेव्हा त्यामागे संघ, यहुदी, अमेरिका होती काय ? जगभरात मुस्लिम राष्ट्रांतून मुस्लिम नागरिकच निर्वासित होतात तेव्हा त्या मुस्लिमांसाठी पैशाने गब्बर असलेल्या मुस्लिम राष्ट्रांनी आपले दरवाजे पॅन इस्लामच्या नावाखाली उघडले काय ? ज्या पॅलेस्टाईनसाठी आपला जीव तुटतो त्या पॅलेस्टीनींवर रणगाडे घालताना जॉर्डनच्या मुस्लिम शासकाने पॅन इस्लामचा विचार केला काय ?  

भारतात हिंदू बहुसंख्य असून काश्मीर खोऱ्यामधुन मधून हिंदु निर्वंश केला गेला तरी त्याची झळ इतर राज्यांतील मुस्लिमांना बसली काय ? हिंदूंनी संख्येच्या बळावर आजपर्यंत देशांतील कायद्यांना वाकवले काय ? बहुसंख्य हिंदुंना त्यांच्या साठी कुठलेही विशेष अधिकार नको आहेत पण इतर कुणालाही धर्मावर आधारित विशेष अधिकार नको हिच त्याची भुमिका आहे. सर्वांना समान अधिकार हवेत हिच हिंदुंची भुमिका आहे. या देशांतील मुस्लिम तुर्कि मुसलमानांप्रमाणे राष्ट्रवादी असावेत हिच त्याची भुमिका आहे यावर आपण आपली हट्टी धार्मिक भुमिका सोडली काय ? 

इंटरनेट, वृत्तपत्र, निरनिराळ्या वृत्तवाहिन्या यांनी गेल्या काही वर्षांत जग म्हणजे एक खेडे बनले आहे. अमेरिकेत काय घडले, बर्सिलोनामध्ये काय घडले, ढाकामध्ये काय घडले हे सगळ्या जगाला फक्त एका क्लिकवर कळू लागले आहे. या जगभरातील घटना लोक पहात आहे आणि त्यानुसार आपापली मते बनवत आहेत.जगात या क्षणाला कुठलीही दहशतवादी घटना घडली तर सामान्य व्यक्तीच्या प्रतिक्रियांमध्ये सर्वप्रथम संशय व्यक्त केला जातो तो मुस्लिम समाजावर हे सत्य आहे. जगातील ज्या ज्या देशात राहतो त्या त्या देशात अल्पसंख्य असल्यावर विशेष अधिकारांची मागणी, कायद्यात बदल, स्वतंत्र राष्ट्राची मागणी आणि प्रसंगी त्यासाठी हिंसक होणे ,कायद्याला आव्हान निर्माण करणे यामुळे मुस्लिम समाजाबद्दल संशय आणि अविश्वासाची परिस्थिती निर्माण झाली आहे हे कधी मुस्लिमांनी तपासले आहे काय ? 

जगात कुठेही मुस्लिम दहशतवाद्यांकडून हिंसक घटना घडल्यावर मुस्लिम समाजाची नेहमीची गुळगूळीत प्रतिक्रिया म्हणजे "हा खरा इस्लाम नाही" हि असते. तसेच संबंधित घटना भारतात घडलेली असेल तर संघ, अमेरिकेत घडलेली असेल तर ट्रम्प किंवा बुश किंवा युरोपात घडलेली असेल तर यहुदी समुदाय यामागे असुन ते लोक मुस्लीमांची प्रतिमा वाईट करण्याच्या प्रयत्नात आहेत हे सांगून बचाव केला जातो. परंतू आता पाणी गळ्यापर्यंत आले आहे याची जाणीव मुस्लिम समाजाला अद्याप झालेली नाही असे वाटते. 

पाणी गळ्यापर्यंत कसं आलं आहे याची छोटीशी चुणूक म्हणून उदाहरण बघा. अफगाणीस्तानात फक्त पाचपंचवीस जिहादी अतिरेकी मारण्यासाठी अमेरिका दहा हजार टनाचा बाँब नागरीकांमध्ये टाकते किंवा म्यानमार सरकार पाच दहा लाख मुस्लिम नागरिकांना रातोरात निर्वासित करते तरीही कुठल्याही आंतराष्ट्रीय व्यासपीठावर म्हणावी तशी चिंता व्यक्त केली जात नाही. कारण जगभर मुस्लिम दहशतवाद्यांकडून घडणाऱ्या घटनांनी इतर समाज मुस्लिमांप्रती हळूहळू उदासीन झाल्याचे दिसते. पण हि वेळ आपल्यावर का आली आहे तसेच दहशतवादी म्हणजे मुस्लिमच हे समीकरण का बनले आहे याचा विचार करायला कोणीच मुस्लिम विचारवंत अद्याप तयार नाही.

याचे आपल्या देशातील प्रतिबिंब बघायचे म्हटले तर भारतात संख्येने अत्यल्प असलेला म्हणजे लाखभर लोकसंख्या असलेला धर्मसमुदाय म्हणजे 'पारशी'. या पारशी समाजाला आजपर्यंत कोणी बहुसंख्येच्या बळावर देशभक्ती सिध्द करण्याची सक्ती केल्याचे ऐकिवात नाही परंतू संख्येने सर्वाधिक म्हणजे जवळपास १७ कोटी असलेल्या मुस्लिमांवर मात्र देशभक्तीचे सर्टीफिकेट दाखवण्याचे प्रसंग वेळोवेळी आल्याचे ऐकायला मिळते. 

यामागचे महत्वाचे कारण म्हणजे मुस्लिम समाजाचे दिर्घ मौन ! धार्मिक कडवेपणातून मुस्लिम समाजात तयार होणारे मुठभर जिहादी, त्यांच्या जगभर चालणाऱ्या हिंसक कारवाया आणि त्याबाबत बहूसंख्य मुस्लिम समाजाने धारण केलेले मौन यामुळे हे मुठभर अतिरेकी हेच सर्व मुस्लीम समाजाचे प्रतिनिधी असल्याचे चित्र जगभर उभे राहिले आहे. तस्लिमा नसरीन, सलमान रश्दी, चार्ली हेब्दो प्रकरणातून इस्लामचा असहिष्णु चेहरा जगासमोर आला आहे. यात अनपढ मुस्लिम सोडा पण उच्चशिक्षित मुस्लिम देखिल धर्मांधतेने वागत असल्यामुळे दिडशे कोटी मुस्लीम समाजावर आरोपी म्हणून उभे राहण्याची वेळ वेगवेगळ्या देशांत आली आहे. 

जगात बहूतांश धर्मांची स्थापना हजार शेकडो वर्षांपूर्वी झाल्यामुळे त्या काळातील परिस्थितीतीला अनुसरून काही कायदे आणि धार्मिक रूढी बनवल्या गेल्या. परंतू बदलत्या काळात लोकशाही राज्यांत त्यातील काही प्रथा आणि रूढी अमानुष असंस्कृत म्हणून गणल्या जातात हे सत्य आहे. हिंदू धर्मात देखिल केशवपन, सतीप्रथा अशा कित्येक अमानुष प्रथा एकेकाळी होत्या.परंतू हिंदूंमधील सुधारणावाद्यांनी त्यावर कोरडे ओढले. त्या अनिष्ठ रूढींना विरोध केला. त्यावर समाजात चर्चा घडवल्या आणि कायदा व लोकमत यांच्या बळावर त्या अनिष्ट रूढी, समजूती कायमच्या हद्दपार केल्या. त्या काळात सुद्धा बहूसंख्य हिंदूंनी विरोध करणाऱ्या मुठभर परंपरावाद्यांकडे दुर्लक्ष करत सुधारणावाद्यांना खुलेपणाने पाठिंबा दिला हे उल्लेखनीय आहे. 

दुर्दैवाने मुस्लिम समाजात मात्र हे चित्र दिसत नाही. ज्याप्रमाणे हिंदूंना सुधारणावाद्यांची एक दीर्घ परंपरा लाभली आहे, त्याप्रमाणे मुस्लिम समाजात 'हमीद दलवाई' सारखी हाताच्या बोटावर मोजता येणारी मंडळी सोडली तर सगळा आनंदीआनंद आहे. 

बरं माजी राष्ट्रपतींना पायउतार झाल्यावर भितीदायक वाटणारा हिंदू बहुसंख्य असलेला भारत हा सहिष्णु देश आहे का ? तर पारशी, यहुदी, अहमदी, शीया अशा जगभरात छळ भोगुन आलेल्या निर्वासितांना खुल्या व मोकळ्या वातावरणात जगण्याचा हक्क देणारा भारत निःसंशय सहिष्णू देश आहे. या देशाइतका वैविध्य असलेला प्रदीर्घ सांस्कृतिक ठेवा इतर कुठल्याही देशांत नाही. 

परंतू मुंबई बाँब स्फोटातील दोषीच्या अंतयात्रेला होणारी हजारोंची गर्दी येथील बहूसंख्य हिंदू समाजाला भयभीत करणारी असते. कुठल्यातरी देशात मुस्लिमांवर अत्याचार झाल्याचे निमित्त करून काढलेला हजारोंचा मोर्चा जेव्हा पोलिसांना मारहाण करून अमर ज्योतीची तोडफोड करतो तेव्हा येथील बहूसंख्य हिंदू समाजाच्या मनात भीती उभी रहाते. देशभरात आजपर्यंत मुस्लिम दहशतवाद्यांनी घडवलेले हल्ले, बाँबस्फोट, काश्मीर मधील हिंदू पंडितांची हत्या, अमरनाथ यात्रेत हिंदूंवर होणारे हल्ले, म्यानमार मधील घटनेच्या निषेधार्थ बोधगयेमध्ये झालेले बाँबस्फोट अशा कितीतरी घटनांची यादी येथील बहूसंख्य हिंदू समाजाला भयभीत करते व संशय घ्यायला भाग पाडते.त्यातूनच "मेरे देश को बचाने के लिए किसी सलीम की जरूरत नही है " अशा डायलॉग चा जन्म होतो.

हे सगळं बदलायचं तर आता भारतीय मुस्लिमांनी कुराण कि राज्यघटना, भुमीपुत्र शिवाजी कि तुर्कि औरंगजेब , गंगा जमणी संस्कृती कि अरब संस्कृती अशा कित्येक प्रश्नांवर बहुसंख्येने निसंग्दीग्ध भुमिका मांडणे अत्यावश्यक आहे.इसिस, अल कायदाचा इस्लाम खरा नाही तर शांतताप्रीय म्हणून संबोधला जाणारा खरा इस्लाम काय आहे ते कृती आणि उक्तीतून दाखवले पाहिजे.

आपला आदर्श डाॅ. अब्दुल कलाम आहेत की याकुब मेमन हे कृती उक्तितुन दाखवले पाहिजे.भारतीय राज्यघटनेलाच आव्हान निर्माण करत आहोत असे सार्वजनिक वर्तन जाणीवपूर्वक टाळले पाहिजे. त्यात मशीदीवरील भोंग्यांचा विषय असो, एखाद्या अभिनेत्रीने घातलेली बिकीनी असो किंवा अगदी तीन तलाक सारखा महत्वाचा विषय असो. यावर खुल्या मनाने चर्चा करत आपले हित कशात आहे ते स्विकार करण्याची तयारी ठेवली पाहिजे. " पंधरा मिनीट मे हिंदू खतम करता हु" म्हणणाऱ्या तथाकथित नेत्यांनी आपल्या छोट्याश्या कृती किंवा वक्तव्याचा फटका आपल्या संपूर्ण समाजाला बसतो याची जाणीव ठेवली पाहिजे.

त्याशिवाय पुरातन अनिष्ट धार्मिक प्रथांना फाटा देत वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आधुनिक शिक्षण घेत एकविसाव्या शतकाकडे इतर धर्मसमुदायांबरोबर हातात हात घालून चालले पाहिजे.पॅन इस्लाम, गज्वा ए हिंद, दार उल हर्ब सारख्या खुळचट कल्पनांना तिलांजली देत भारतीय राज्यघटना सर्वोच्च व भारतीय हिंदू, बौद्ध, शिख हेच आपले सगळ्यात जवळचे आप्त ही खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. अनोळखी असलेल्या पॅलेस्टाईन रोहिंग्यांसाठी रस्त्यावर येण्यापेक्षा आपल्या राष्ट्राच्या हितासाठी, बामियान मधील बुद्ध मुर्त्या तोडणाऱ्या तालिबानी किंवा हिंदू आहेत म्हणून ढाक्यात मुडदे पाडणाऱ्या जिहाद्यांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. (अपवाद क्षमस्व ) 

शेवटी एवढंच म्हणावसं वाटतं त्याच सरफरोश चित्रपटात इंस्पेक्टर सलीम एसीपी अजय राठोड यांना प्रत्त्युत्तर म्हणून "आप भरोसा तो किजीये सर, एक नहि हजारो सलीम मिलेंगे " असं म्हणतो. भारतात असे हजारो नाही तर कोट्यावधी सलीम आहेत परंतु त्यांनी आता पुढे येण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com