अशी बोलते माझी कविता (वसंत शिंदे)

अशी बोलते माझी कविता (वसंत शिंदे)

...गाव हरवला आहे

कौलांनी शाकरलेला गाव हरवला आहे
गोठ्यांनी गजबजलेला गाव हरवला आहे

ती कुठे शिवारे गेली? ती गुरे कुठे हंबरती...?
घुंगरांनी नादवलेला गाव हरवला आहे

पक्‍क्‍या सडकांमध्ये हरवल्या धुळीच्या वाटा
वनराईने नटलेला गाव हरवला आहे

आता न साद राघूची मैनेसाठी येई
आमराईत मोहरलेला गाव हरवला आहे

ओढ्याचे अवखळ पाणी गुणगुणणेच विसरले
पाटातुन खळखळलेला गाव हरवला आहे

चिमण्यांची शाळा जेथे रांगेत भरे पूर्वी
त्या तारेवर झुललेला गाव हरवला आहे

शहरांनी टापांखाली चिरडली अशी ही गावे
माळावर विसावलेला गाव हरवला आहे

नातवास निजण्यापूर्वी गोष्ट हवी ‘हॅरी’ची   
आजीने जोजवलेला गाव हरवला आहे

त्या पिंपळवृक्षाखाली रंगायाच्या गप्पा
पारावरती बसलेला गाव हरवला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com