पुरेशा पाण्याची जबाबदारी सरकारचीच..

पुरेशा पाण्याची जबाबदारी सरकारचीच..

मुंबईत ज्या ज्या व्यक्तीला गरज आहे तिला पाणी मिळायला हवे. मग तो अनधिकृत घरात राहणारा का असेना, त्याची पाण्याची गरज भागली गेली पाहिजे, अशी भूमिका महापालिकेने ठेवायला हवी. पाण्याच्या वाटपात विषमता होता कामा नये; मात्र नागरिकांनीही तितक्‍याच जबाबदारीने पाण्याचा वापर करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रशासनाने पाणीवापराची विशिष्ट मर्यादा ठरवायला हवी किंवा जादा वापरावर कर आकारायला हवा. महापालिकेची पाणीयंत्रणा आशियात सर्वोत्तम असल्याने तिचे खासगीकरण न करता मजबुतीकरण केले पाहिजे, अशा महत्त्वाच्या सूचना मान्यवरांनी मांडल्या. "सकाळ'तर्फे मुंबईतील पाण्याच्या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.
पाणी विषयावर काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सीताराम शेलार, शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर, अभिनेते अरुण कदम आणि प्रल्हाद कुडतरकर आदी मान्यवर चर्चासत्रासाठी उपस्थित होते. गरजू माणसाला पाणी द्यायला हवे, हे साधे समीकरण आहे; पण पाण्यावर राजकारण होते हे दुःखद आहे, असे मत "रात्रीस खेळ चाले' मालिकाफेम अभिनेते प्रल्हाद कुडतरकर यांनी व्यक्त केले. लालबाग-परळमध्ये एकीकडे चाळीतील रहिवाशांना पाण्यासाठी हंडा घेऊन बाहेर पडावे लागते आणि टोलेजंग टॉवरसाठी मात्र भरपूर पाणी मिळते, हे समीकरण विचित्र आहे, असे ते म्हणाले.
पाण्याशी संबंधित गुन्हे घडतात; पण पोलिस ठाण्यापर्यंत ते पोचत नाहीत. पाणी जपून वापरण्याचीही सर्वांची तितकीच जबाबदारी आहे.


घर अधिकृत असो किंवा अनधिकृत, सर्वांना पाणी मिळणे गरजेचे आहे. पाणीकपात असली तरी दूरदृष्टी ठेवून त्याचे नियोजन सरकारने करणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते सीताराम शेलार यांनी व्यक्त केले. झोपडी भागात पाणीपट्टी चुकवली जाते, हा गैरसमज आहे. पालिकेच्या पाणीपट्टी थकबाकीदारांची यादी पाहिली तर कित्येक मोठ्या आस्थापनांची कोट्यवधींची थकबाकी असल्याचे दिसते, असेही शेलार म्हणाले. झोपडीवासीय प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरतात. त्यामुळे झोपडीवासीयांविरोधातला असलेला पाणीपट्टी थकबाकीचा आरोप चुकीचा आहे, असेही त्यांनी सांगितले. मराठी विनोदी अभिनेते अरुण कदम यांनी पाण्याशिवाय काहीच नाही... आवश्‍यक तितकेच पाणी वापरा, असा संदेश दिला. नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनीही स्वस्त आणि पुरेपूर असा पाणीपुरवठा महापालिकेकडून केला जात असल्याचे मत मांडले.

पाण्याचा गैरवापर नको
मुंबईत पाण्याचा तसा त्रास जाणवत नाही; मात्र पाणीगळती मुंबईची मोठी समस्या आहे. ती थांबविण्यासाठी नेमके काय करायचे, हे सर्वसामान्य मुंबईकरांना माहीत नाही. त्यासाठी ठिकठिकाणी पालिकेतर्फे बोर्ड लावून जागृती करण्याची गरज आहे. पाणीगळती आढळल्यास कोणाशी संपर्क करायचा ते त्या बोर्डवर नमूद केलेले असावे. सर्वांना पाणी मिळावे आणि त्यासाठी सर्वांकडून त्याचे पैसे घ्यावेत. नागरिकांनीही आयते पाणी मिळतेय म्हणून ते हवे तसे वापरण्याची सवय बदलली पाहिजे. आम्ही कलाकारांनी स्थापन केलेल्या वैशाली फाऊंडेशनच्या माध्यमातून मुरबाडमध्ये आम्ही एक उपक्रम राबविला. तिथे पाण्याची समस्या होती. पैसे देण्याऐवजी त्याच पैशात आम्ही तिथे पाणी अडवले. तेव्हा मग तिथल्या रहिवाशांना शेती आणि घरासाठी पाणी उपलब्ध झाले.
अरुण कदम (अभिनेता)

'1916' क्रमांकावर तक्रार करा
पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय काहीच नाही. पाण्याचा अधिकाधिक योग्य वापर करा आणि अपव्यय टाळा. खरेच तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढ्याच पाण्याचा वापर करा. पाण्याचा पाईप कुठे फुटलाय, कुठे गळती आहे, कुठे पाणी वाया जात असेल तर त्याबाबत लगेच फोन करा आणि पालिकेला कळवा. महापालिकेच्या "1916' क्रमांकावर फोन लावून तक्रार तत्काळ सांगा. महापालिका आहे ना तुमच्या मदतीला. सर्वांना पाणी मिळायचे असेल तर त्याचा योग्य वापर व्हायला हवा.

पाण्यासंबंधित गुन्हे नोंदवायला हवेत

यंदा पाऊस पडलाय तर भरपूर पाणी वापरू. पाणीकपात कशासाठी, असा सामान्य माणसाला नेहमी पडणारा प्रश्‍न आहे. सर्वसामान्य माणूस म्हणून आपण पाणी आणि पावसाचा इतकाच विचार करतो. कितीही पाऊस पडला तरी हिवाळ्यात पुन्हा पाण्याची अडचण जाणवायला लागते. लालबाग-परळसारख्या भागात आजही रहिवाशांना पाणी मिळविण्यासाठी हंडा घेऊन फिरावे लागते. मुंबईत रोजच उभ्या राहत असलेल्या टोलेजंग इमारतींना मात्र भरपूर पाणी मिळते. हे कसे? त्यावर उपाय शोधला पाहिजे. पाणी पुरवून वापरण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पाण्याचा योग्य वापर करण्याची प्रत्येकाला सवय लागली पाहिजे. काही ठिकाणी वरच्या मजल्यावर पाणी चढत नाही म्हणून रहिवासी मोटर लावतात. त्या हिशेबाने मोटर लावणे ही गरज आहे; पण खरे पाहता तो गुन्हा आहे. पाण्यासंबंधित गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल होत नाहीत, ही खंत आहे.
- प्रल्हाद कुरतडकर (अभिनेता)


पाणीवापरानुसार कर लावणार
मुंबई महापालिकेत चांगले काम झालेय किंवा होतेय हे मानण्याच्या मूडमध्येच लोक नाहीत. पाणीचोरी आणि पाणीगळती ही मुंबईतील समस्या आहे. काही ठराविक भागात गळती थांबवणे पालिका अधिकाऱ्यांच्याही जीवावर बेतणारे आहे. मुंबईच्या पाण्याची सर कोणत्याच पाण्याला नाही. मुंबईचे पाणी सर्वाधिक शुद्ध असते. तरीही या शुद्धीकरणावर येणारा खर्च अत्यंत कमी आहे. वापराप्रमाणे पाण्यावर कर लावण्याबाबत विचार सुरू आहे. येत्या काही वर्षांत हे होण्याची शक्‍यता आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाण्यावरून यादवी होईल असे खूप वर्षांपूर्वी सांगितलेले आठवतेय. पाणी हा आम्हा सर्वांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही धरणांच्या दुरुस्तीवर भर दिला आहे. मुलुंड ते घाटकोपर विभागात 24 तास पाणीपुरवठा करण्याचा पायलट प्रोजेक्‍ट सुरू झाला आहे.
पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या डक्‍टच्या खाली माती ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून त्यातून वाहणारे किंवा पावसाचे पाणी मुरण्यास मदत होईल.

किशोरी पेडणेकर (नगरसेविका, शिवसेना)

पाणी चोरतात त्यांचे मुंबईवर प्रेम नाही
मुंबईत जे पाणीचोरी करतात त्यांचे मुंबईवर प्रेम नाही. काही ठिकाणी पाणीचोरी रोखणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर आणि इंजिनियरवर हल्ले करतात. जे अत्यंत चुकीचे आहे.

पालिकेची यंत्रणा उत्तम
मुंबईची पाणीवाटपाची यंत्रणा ब्रिटिशकालीन असली तरीही ती अद्ययावत आहे. पाणी व्यवस्थापनात मुंबई महापालिका अग्रस्थानी आहे. संपूर्ण आशियात मुंबई महापालिकेचे व्यवस्थापन उत्तम आहे. अगदी सिंगापूरच्या तोडीस तोड आहे. विभागामार्फत पुढच्या 20 ते 25 वर्षांसाठीचे नियोजन करून दूरदृष्टीने काम करण्यात आले आहे, हे अभिमानास्पद आहे.
मनुष्यबळाअभावी कायम जल विभागाचे खच्चीकरण करण्यात आले आहे. 15 वर्षांपासून महापालिकेतील भरती स्थगित करण्यात आली आहे. निवृत्त होण्याच्या बेतात असलेल्या अधिकाऱ्यांची रवानगी जल विभागात होते. त्यामुळे विभागाला नेतृत्व नाही अशीच स्थिती अनेक वर्षांपासून आहे. शहर वाढते आहे; पण वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सेवा पुरवण्यासाठी तितकेसे मनुष्यबळ जल विभागात नाही.

- सीताराम शेलार (सामाजिक कार्यकर्ता)

पाण्याच्या बाबतीत नागरिकांना नको तो माज
शहरातल्या नागरिकाला पाणी वाचविण्याबाबत काही देणेघेणे नाही, याची खंत आहे. पाण्याची नासाडी करणारे नागरिक माजलेले आहेत, असे खेदाने म्हणावे लागते. मी पाण्याचे बिल देतो तर ते वाटेल तसे वापरणार, अशी काही जणांची मानसिकता आहे. 97 टक्के मुंबईचे पाणी बाहेरून येते. तीन टक्के पाणी मुंबईच्या तलावांतून येते. त्या तलावांचीही काळजी घेतली जात नाही. पवई, विहार आदी तलावांची विविध प्रकल्पांमुळे दुरवस्था झाली आहे. शहरातील 227 तलाव, साडेचार हजार ते सहा हजार विहिरी आणि चार नद्यांची काळजी घेण्यात आलेली नाही. तलावांच्या परिसरातील कॉंक्रीटीकरण हे मारक आहे. शांताराम तलावाचेच उदाहरण घ्या ना... कॉंक्रीटीकरणामुळे पावसाचे पाणी झिरपणे बंद होते. त्यामुळेच असे सुशोभीकरण आणि कॉंक्रीटीकरण टाळल्यास पावसाचे पाणी अधिक झिरपण्यास मदत होऊ शकेल.

बांधकामासाठीही पिण्याचे पाणी
मुंबईत पाण्याचे विषम वाटप होते आणि विषम पद्धतीने करही आकारण्यात येतो. दहा इमारतींना घरात तरणतलावाची परवानगी दिलेली आहे. मुंबई महापालिका पाण्यासाठी अनुदान देते. सर्वांना एकाच दराने पाणी दिले जाते. पाण्याच्या वापरानुसार हे दर ठरलेले नसल्याने पाणीवापराचे महत्त्वच लोकांना कळत नाही. अनेक ठिकाणी बांधकामासाठीही पिण्याचे पाणी वापरले जाते ही खंत आहे.
माणसाला दररोज 50 लिटर पाणी लागते. भारतात प्रतिमाणसी पाणी वापरासाठीचा 135 लिटरचा निकष आहे. मुंबई महापालिकेत झोपडपट्टी पातळीवर 45 लिटर आणि इमारतींसाठी कमाल 145 लिटर पाण्याचा निकष मंजूर करण्यात आला आहे. मानवतेच्या आधारावर महापालिकेने आतापर्यंत सरकारी वा खासगी आस्थापनांनाही पाणी दिले आहे. झोपडपट्टीतच पाण्याची चोरी होते हा गैरसमज आहे. झोपडी भागात पाण्याची जोडणी देण्यात येत नाही. त्यामुळेच राजकीय पक्ष कार्यकर्ते याचा फायदा घेतात आणि यातूनच पाणीमाफिया तयार होतात. झोपडीवासीय पाणी बिल भरत नाहीत हा दुसरा गैरसमज आहे. सरकारी आणि खासगी आस्थापना हे कोट्यवधीचे थकबाकीदार आहेत.

पाण्याच्या समान वाटपासाठी कायदा हवा
सचिन तेंडुलकर पाणीबचतीचा ब्रॅण्ड ऍम्बेसिडर होतो आणि पाणीबचतीचा संदेश देतो. दुसरीकडे प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण आदींसारख्या अभिनेत्री मोठ्या प्रमाणावर साबणाच्या जाहिरातीत पाण्याचा वापर करतात. हा मार्केटिंगचा प्रकार आहे. म्हणूनच महापालिकेनेही पाणीबचतीसाठी आक्रमक पद्धतीने मार्केटिंग करण गरजेचे आहे. मूलभूत गरजांच्या वापरासाठी पाणी पुरवणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे; पण पाण्यासाठी महाराष्ट्रात कोणताच कायदा नाही. म्हणूनच पाण्यासाठी कायदा होणे गरजेचे आहे. पाण्याचे समान वाटप होण्यासाठी त्याचा फायदा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com