सातारा : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायतींच्या कर वसुलीला फटका बसला होता. परंतु, मागील पाच महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाला ब्रेक लागल्याने कर वसुलीला गती आली होती. जिल्ह्यात २०२१-२२ मधील एकूण एक हजार ४९३ ग्रामपंचायतींची घरपट्टी ९०.७५ टक्के, तर पाणीपट्टी वसुली ९०.९८ टक्के झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ग्रामपंचायतींची दुप्पट कर वसुली झाली आहे.
मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग आल्याने देशभरात लॉकडाउन केले होते. यावेळी सर्वच व्यापारी, व्यवसाय ठप्प झाल्याने अर्थचक्रालाही ओहोटी लागली आहे. त्याचा मोठा परिणाम गावगाडा चालविणाऱ्या ग्रामस्तरावरील ग्रामपंचायतींना बसल्याचे दिसून आले. मागील दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गात ४० ते ५० टक्के कर वसुली झाली होती. ग्रामपंचायतीची वसुली कमी प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम थेट विकासकामांवर झाला होता. औद्योगिक कर, पाणीपट्टी कर, व्यावसायिक दुकान गाळे, स्वच्छता, आठवडा बाजार आदींमधून मिळणारा महसुलाचा स्त्रोत कमी झाला होता. त्यामुळे ग्रामपंचायतींमधील दैनंदिन कामकाजावरील खर्च, कंत्राटी कामगारांचे पगार, स्वच्छता व इतर बाबींचा खर्च भागविताना कसरत करावी लागत आहे. परंतु, मागील सहा महिन्यांपासून कोरोनाचे संकट कमी झाल्याने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीलाही ब्रेक लागला होता.
दरम्यान, जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या एकूण घरपट्टीपैकी थकीत व चालू अशी ७८ कोटी ६३ लाख वसुली करण्यात आली असून ३६ कोटी ३२ लाख पाणीपट्टी वसुली करण्यात आली आहे. गेल्या वर्षीहून दुप्पट कर वसुली झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या काळात जनजीवन ठप्प झाल्याने त्याचा परिणाम ग्रामपंचायतींच्या कर वसुलीवर झाला होता. मात्र, मार्च २०२१-२२ मधील घरपट्टी व पाणीपट्टी वसुली सुमारे ९० टक्के झाली असून, ग्रामपंचायतींच्या १०० टक्के वसुली करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.