जामनेर - पंडित दीनदयाल उपाध्याय जन्म शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून येथून जवळ असलेले चिंचोली (ता. जामनेर) येथे एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते 12 मे स वृक्ष लागवड करून उद्घाटन केले जाणार आहे.
अधिक माहितीनुसार, चिंचोली हे अडीच हजार लोकवस्ती व 9 ग्रामपंचायत सदस्य असलेले छोटे गाव आहे. आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल सुरू असून 11 मे पासून गावाचे लोकेशन ऑनलाइन पाहणे शक्य होणार आहे. वृक्ष लागवडीमुळे राष्ट्रीय कार्यास हातभार लावून पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यासाठी मदत होणार आहे.
कार्यक्रमात जल शुद्धीकरण केंद्राचे उद्घाटनही होणार असून यामुळे गावाला शुद्ध पाणी मिळणार आहे. यासाठी बुलडाणा अर्बन को.ऑप.सोसायटी सहकार्य केले आहे. तर संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसून नियंत्रण कक्ष व साउंड सिस्टिम युनिट सुरू केली जाणार आहे. तर प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत गॅस कनेक्शनचे वितरण होणार आहे.
जामनेर नगराध्यक्षा साधना महाजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहातील. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजीव म्हसकर, भाजप तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, मुख्य व्यवस्थापकीय संचालक बुलडाणा अर्बनचे सुकेश झंवर, रजनी चव्हाण बांधकाम सभापती जि. प. जळगाव, शिवाजी नाना सोनार, दिलीप खोडपे, गोविंद अग्रवाल, तुकाराम निकम, छगन झाल्टे, माजी जि. प अध्यक्षा प्रयाग कोळी, जामनेर प. स. सभापती संगीता पिठोडे, उपसभापती गोपाल नाईक, तहसीलदार नामदेव टिळेकर, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, जि. प. सदस्य अमित देशमुख, विद्याताई खोडपे, सुनीता पाटील, कल्पना पाटील शहापूर, तसेच पं. स. सदस्य एकनाथ लोखंडे, जलाल तडवी, सुरेश बोरसे, रमण चौधरी, अमर पाटील, रूपाली पाटील, सुनंदा पाटील, नीता पाटील व माजी सभापती सरिता भंसाली, आरती लोखंडे, बाबूराव घोंगडे, शेखर काळे, व माजी उपसभापती नवलसिंग पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती सरपंच विनोद दगडू चौधरी यांनी दिली.
आधी आम्ही गावामधे वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात यशस्वी झाले. आता एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचाही मानस आहे. याशिवाय जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त विकास कामांचे नियोजन केले आहे. वेळोवेळी स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण हगणदारी मुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
-विनोद चौधरी,
सरपंच, चिंचोलीपिंप्री (ता.जामनेर)
|