कनेक्टिव्हिटीसाठी 'बीएसएनएल' उभारणार 128 टॉवर
नाशिक - डिजिटल इंडियांतर्गत जिल्ह्यात डिजिटल गावांची संख्या वाढत असून, एक हजार 382 गावांपैकी 936 गावे डिजिटल करण्याचे नियोजन सुरू आहे. मार्चपर्यंत 19 प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहेत.
नवीन वर्षात जिल्ह्यातील ग्रामीण व्यवस्था डिजिटल करण्यासाठी भारत दूरसंचार निगम 128 मनोरे उभारत आहे. जिल्ह्यात एक हजार 133 किलोमीटरपैकी सुमारे 920 किलोमीटर क्षेत्रात ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे काम वेगात सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात 770 ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात ऑप्टिकल फायबरचे जाळे उभारले जाईल. जीएसएम यंत्रणा सक्षम करण्यासाठी मनोरे उभारणी हे "भारत दूरसंचार'चे लक्ष्य आहे. डिजिटल गावांत 19 सरकारी दाखल्यांसह कॅशलेस बॅंकिंग कामकाज स्थानिक ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
पूर्वीच्या संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) योजनेत संबंधित गावांत संग्राम कक्ष चालविण्यासाठी घेतलेल्या नऊशे कर्मचाऱ्यांच्या मदतीने "आपले सरकार' उपक्रमात ही गावे डिजिटल करण्याचे नियोजन आहे. त्यात रेल्वेचे तिकीट आरक्षण, तिकीट बुकिंग, पारपत्रासाठीचा अर्ज, आधार कार्डची नोंदणी, बस तिकिटांची नोंदणी अशा वेगवेगळ्या सुविधा मिळतील. त्यासाठी प्रशिक्षणाचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 936 ठिकाणी सरकारी, दैनंदिन आणि व्यावसायिक अशा तिन्ही स्वरूपांच्या सुविधा देणारी ही केंद्रे उभारून गावांचे डिजिटायझेशन केले जाणार आहे.
डिजिटल गावांतील सुविधा
जी टू जी - गव्हर्न्मेंट टू गव्हर्न्मेंट सुविधा
जी टू सी - गव्हर्न्मेंट टू सिटिझन
बी टू सी - बिझनेस टू कस्टमर
नवीन वर्षातील गावांतील संगणकीय व मोबाईल यंत्रणा अधिक सक्षमपणे चालण्यासाठी 128 मोबाईल टॉवरची गरज आहे. ग्रामीण व आदिवासी भागात वाड्या-पाड्यांवर व महामार्गावर ठराविक ठिकाणी जोडणी तुटते, ही समस्या दूर होण्यास त्यामुळे मदत होणार आहे.
- सुरेशबाबू प्रजापती, महाप्रबंधक, भारत संचार निगम
|