पतीला "मवाळ' करत पत्नीने गाडी आणली रुळावर 

residenational photo
residenational photo


पतीला "मवाळ' करत पत्नीने गाडी आणली रुळावर 

नाशिकः कट्टर, डाव्या विचारसरणीच्या अधीन गेलेल्या किंबहुना आपले आयुष्य म्हणजे डावी चळवळच मानणाऱ्या डॉ. भारत कारिया या ध्येयवेड्या व्यक्तीला लग्नानंतर त्यांच्या पत्नीने परावृत्त केले. एवढेच नव्हे, तर मवाळ विचारांकडे नेत संसाराचा गाडाही रुळावर आणून कुटुंबाला स्थैर्य प्राप्त करून दिले. त्यानंतरच "संसार करावा नेटका' हे संतांचे विचार नक्षलवाद्यांनाही पटले आणि त्यांनी कारीया यांना चळवळीतून मुक्त केले. 


भारत-पाकिस्तान फाळणीनंतर नाशिकमध्ये स्थायिक झालेल्या अनेक सिंधी कुटुंबीयांपैकी एक कारिया कुटुंब. "महाराष्ट्र पुस्तक भांडार'च्या निमित्ताने साऱ्या नाशिकला सुपरिचित आहे. याच कारिया कुटुंबातील डॉ. भारत कारिया यांनी 66 वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. तारुण्यात मार्क्‍स, लेनिन विचारांचा प्रचंड प्रभाव होता. त्यांचे वडीलही कट्टर डाव्या विचारांचे होते. तोच पगडा त्यांच्यावर होता. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणावरही त्याचा परिणाम झाला. आचलपूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारी नोंदविणे सुरू केले. कारिया जहाल डाव्या नक्षलवादी विचारांचा आहे. त्यामुळे त्याला अनुत्तीर्ण करा, महाविद्यालयात ठेवू नका, असे पोलिसांकडून सांगितले जाऊ लागले. परिणामी चांगल्या बीएचएमएस डॉक्‍टर होण्यापासून दूर जावे लागले. अर्धवट शिक्षणामुळे "आयुर्वेदरत्न' हा अभ्यासक्रम पूर्ण केला. 

वाचनाचा पगडा अन्‌ तुरुंगवास 
नाशिक तालुक्‍यातील देवरगाव येथे छोटा दवाखाना सुरू केला. तेथेही दारूबंदी चळवळ सुरू केली. त्यामुळे मद्यपींचा व गावगुंडांचा त्रास सहन करावा लागला. आणीबाणीच्या काळात तर चक्क राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखालीच पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्र बुक भांडारमधील मार्क्‍स व लेनिनची पुस्तके जप्त केली. तुरुंगावास सहन करावा लागला. त्यानंतर नामदेव ढसाळ यांची पॅंथर चळवळ सुरू झाली. त्यात सक्रिय सहभाग घेतला. दलित समाजाचे कष्ट, दुःख जवळून पाहिले. या डाव्या विचारांच्या कट्टरतेमुळे अगोदर बीएचएमएस डॉक्‍टर होण्याचे स्वप्न भंगले. नंतर साधे रिक्षाचे परमिटही मिळेनासे झाले. शेवटी संगमनेरच्या गुंजाळ ट्रस्टच्या माध्यमातून होमिओपॅथी शिबिरे गावोगावी घेण्यास सुरवात केली. त्यातून अर्थार्जनाचा मार्ग सापडला. 

पत्नीला नक्षलवादी चळवळीचे दर्शन 
डॉ. कारिया यांचे लग्न एका गरीब घरातील तरुणीशी झाले. तिला घेऊनही थेट हैदराबादला जहाल नक्षलवाद्यांच्या बैठकीला गेले. मात्र मी गरिबी जवळून पाहिली आहे. आता मला सुखी संसार करायचा आहे. तो करणार की नाही, तेवढे सांगा. नाहीतर मी सोडून जाते, असा निर्वाणीचा इशारा सौ. कारियांनी दिला. त्यानंतर कारियांनी आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

"अगोदर संसार करावा नेटका' 
संसाराबद्दल संतांनी वेगवेगळी तत्त्वे सांगितली आहेत. अगोदर संसार करावा नेटके, हे तत्त्व पत्नीने सांगत जहाल विचार सोडून मवाळ धोरणाने काम करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून ते काम करू लागले. त्यानंतर कलावंत म्हणूनही ते सुपरिचित झाले. आजही गावोगावी शिबिरे घेऊन ते आरोग्यसेवा देतात. दारूबंदीचा प्रचार करतात. मुलगा एमबीए झाला आहे. पत्नीने कधी शिकवण्या घेऊन, कधी पीठगिरणी चालवून संसारास हातभार लावला. आता कारिया सुखी-समाधानी, संतुष्ट, जीवन जगत आहे. आयुष्यात जहाल विचारांमुळे खूप त्रास सहन करावा लागला. मात्र डगमगले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com